एखाद्या खूप महत्वाच्या प्रवासाला निघताना जसं बॅग पॅक करताना गोंधळ उडलेला असतो तसंच काहीसं नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर होतंय.
काय काय सोबत न्यायचं, काय नाही, काही गोष्टी अशा असतात की पूर्ण सोडून जाता येत नाही, काही हव्या असतात पण सोबत नेता येत नाहीत तसंच अगदी तसंच आज झालंय.
मग मीही विचार केला की नव्या वर्षात सरत्या वर्षातलं काय काय घेऊन जायचं अन काय मागे सोडायचं?
विश्वासघात, कटू आठवणी, भांडणं, गैरसमज, नाराजी - कितीही अन काहीही केलं तरी डोक्यातून जाईनात. म्हणजे जे सामान पूर्णपणे मागे सोडून जाता येत नाही त्यातलंच हे. मग ठरवलं हे सोबत तर न्यायचं नाहीये पण सोडता सोडवतंही नाहीये तर काय करावं. म्हटलं ठिके सोडूया मागे पण यातून मिळालेला धडा, अनुभव अन शहाणपण नव्या वर्षात नक्कीच घेऊन जायचं ते मागे नाही सोडायचं.
दोस्ती, प्रेम, कष्ट, जिद्द, माया, जिव्हाळा, घरच्यांचे आशिर्वाद - हे तर आपसूकंच आतूर आहे माझ्यासोबत नव्या वर्षात येयला, हे तर घेऊन जायलाच हवं.
सगळ्याच गोष्टी आपल्याकडे नसतात प्रवासाला निघताना म्हणूनंच आपण ठरवतो कि तिकडे पोहोचल्यावर तिथेच घेऊ नव्यानं. तसंच काहीसं नव्या वर्षात उत्तरोत्तर अन नवी कोरी प्रगती करायची, आहे यापेक्षा तब्येत ऊत्तम करायची, मागल्या वर्षात न सापडलेल्या प्रश्नांची ऊत्तरं शोधायची, जुनी स्वप्नं तर जोपायसाचीच पण नव्यानं सुद्धा बघायची, नवी ऊमेद, नवा जोश, धमाल मस्ती धिंगाणा... अन जे जे काही या वर्षात जमलं नाही ते नव्या वर्षात नव्यानं का असेना हवंच ना यार.
अन पुढल्या वर्षी असं काही करु की ते वर्ष सरताना मनाविरुद्ध काही मागे सोडून जावं लागणार नाही किंवा मनाविरुद्धंच पुढेही घेऊन जावं लागणार नाही.
चला तर मग, निघूया..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
के पी आर आणि परिवार










