मिटल्या डोळ्यात आठवणी
अजूनही दाटतात
चिरणाऱ्या काळजाला
कालपरवाच घडल्यासारख्या ताज्या वाटतात
तसं पाहिलं तर...
काल सहा वर्ष झाली
तू मला सोडून गेलास त्याला
सकाळी कामावर गेलेला
तू, रात्री मात्र तू गेल्याचाच फोन आला
पायाखालची जमिन सरकली
डोळ्यातली आसवं डोळ्यातंच
आटली
पदरात दोन लहान मुलं
अन वयस्कर सासू सासरे
वाटायचं हा संसाराचा
गाडा एकट्यानं रेटायचा कसा रे?
"बाबा कुठे गेला?"
चिनूच्या निरागस प्रश्नानं डोळे टचकन भरुन यायचे
पण नेहमी त्याच्याकडे
पाठ फिरवून खोटंच हसून त्याला खोटंच उत्तर द्यायचे.
वरवर सावरलेली, निश्चयानं
उभी राहिलेली मी आतून मात्र हादरले होते
तुझ्या पंखाखाली जगताना
स्वतंत्र उडायलाच विसरले होते
उभी राहले कारण...
कारण चालणारंच नव्हतं
हात पाय गाळून
काय मिळणार होतं सत्यापासून
दूर पळून?
वाटायचं आपली गरज आहे
घराला
म्हणूनंच भीती वाटली
तरी मुंबईच्या गर्दीत झोकून दिलं स्वतःला
लोकलची भीती वाटायची
म्हणून ठरवलेलं बसनंच प्रवास करायचा
लोकलमधे पाऊल ठेवल्या
ठेवल्या डोळ्यासमोर तुझा छिन्नविछिन्न देह यायचा.
आजकाल चिनूला मात्र
कॉलेजला जायला लोकलंच सोयीस्कर वाटते
त्याला परतायला १०
मिनिट उशीर झाला तरी मनी नसत्या विचारांचं काहूर दाटते.
लोकांची सहानूभूती,
नेत्यांची आश्वासनं
विरोधकांचा निषेध,
मेडियाच्या ब्रेकिंग न्यूज...
सगळं सगळं चारदोन दिवसातंच
विरु लागलं
अन रुटीन आपसूकंच त्याच्या
त्याच्या वेगानं फिरु लागलं
लोकांनी मात्र
"रुटिनला" उगाचंच मुंबईच्या स्पिरीटचं नाव दिलं.
गरीबांच्या असहाय्यतेला
आणि नाईलाजाला "सलाम मुंबई" म्हणत गौरवलं
घराकडे बघून मला जमवावंच
लागलं सगळं
निसर्गाचाच नियम तो,
मुंबईनं असं काही केलं नाही वेगळं
आज पाच वर्षांनी पुन्हा
कानठाळ्या बसवणारा आवाज आलाय
चिनू व्यवस्थित आहे
आत्ताच त्यानं फोन केलाय
तरीही काळजाचा ठोका
मात्र चुकलाय
आता पुन्हा आरोप प्रत्यारोप,
लोकांच्या वांझोट्या चर्चा, सरकारचं निर्लज्ज स्पष्टिकरण
विरोधकांचं स्वार्थी
राजकारण... सगळ्याला ऊत येईल
मिडियाही अमानुषपणे,
"पहिल्यांदा अमुक तमुक चॅनेलवर" म्हणत आठवडाभर हिच ब्रेकिंग न्यूज
देईल
आज पुन्हा कित्येकांच्या
डोक्यावरचं छत्र हरवलं असेल
पण लोकांना संकटग्रस्तांनी
खांद्दावर आभाळंच पेललेलं दिसेल
त्यांच्याही घरी येईल
फोन.. शेवटचा
सुरु होईल फाटक्या,
विखुरल्या संसाराला गोळा करण्याचा प्रवास तिचा एकटा
खोटी उत्तरं... निरागस
प्रश्न
खरं माहिती असूनंही
पोरांचं घरासाठी खोटं हसणं
हालाखीमधे असंच पोरं
शिकतील
घरटं वाचवण्यासाठी
"त्याही" घरट्याबाहेर पडतील
तुम्ही रक्त सांडलं
पण त्या डोळ्यात टिपूसही येऊ देणार नाहीत
अवसान गळलं पायातलं
तरीही कुणाला खचू देणार नाहीत
थोडं असं थोडं तसं..
आयुष्य चालूच राहील
कसंनुसं
थोड्याच वेळात सगळं
मनात साठवून.. नाईलाजानंच.. मुंबई जगण्याच्या शर्यतीत पुन्हा धावू लागेल
कुणी आमच्यासारखांच
असहाय्यपणे, कुणी कौतुकानं तरं कुणी चक्क स्वार्थासाठी मुंबईच्या स्पिरीटला परत
"सलाम" ठोकू
लागेल..
हं... चालायचंच...
कुणाल प्रकाश रुद्राके
