Saturday, January 17, 2026

प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा अट्टाहास करु नये - कुणाल

 खरं सांगू? या खरं सांगू नंतर मी घेतलेला पॉज पत्रात दिसत असता तर… 

खरं सांगू विचारल्यानंतर डोक्यात आलं नको खरं बोलायला, काट मारुन टाकूया या वाक्यावर. मग परत लक्षात आलं काट मारलेलीही कळेलंच, त्याखालचं खरं सांगू दिसेलंच. त्यापेक्षा हे पानंच डिस्कार्ड करुया दुसऱ्याच पानावर लिहायला घेऊ. पण खूप विचार केल्यावर कळलं आताही आडपडदा ठेवण्यात काही अर्थ नाही, मुखवट्यामागे लपून लिहिण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे खरंच बोलूया. 

खरं सांगायचं तर तुला मी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा त्याचं उत्तर येईल असं मला आजिबातंच वाटलं नव्हतं. म्हणजे तुला ते मिळेल की नाही आणि मिळालं तर उत्तर देशील की नाही… नकोच त्यात पडायला.


पण, मला वाटलं होतं हे शेवटचं किंवा कदाचित जर ८-१० दिवसांत पत्ता चुकीचाए म्हणून पोस्टमन ने परत आणून दिलं तर किंवा नाही दिलं तर परत एक पत्र टाकून बघूया का? याच्यापेक्षा जास्त विचार मी केला नव्हता. आणि खरं सांगायचं तर असं वाटलं होतं दीड वर्षाचा जो मी उल्लेख केलाय पत्रात त्यावर तू आक्षेप घेशील कारण आपल्याला कुठल्याही प्रकारे शेवटचा संपर्क करुन दीड नाही तर चार वर्ष झाली आणि मागचं पत्र लिहिताना अनावधानानं मी दीड वर्ष लिहून गेलो कारण गेले दीड वर्ष मी विचार करतोय तुला पत्र लिहिण्याचा, पत्र लिहिण्याचाच असं नाही पण कॉंटॅक्ट करण्याचा. 


आणि पहिले काही महिने तर मी का करु… मीऽच का करु याच्यामध्ये गेले. त्यानंतरचे काही महीने अकारण माझा राग तुझ्यावर काढण्यात गेले. तुझ्यावर रागवायचा बराच प्रयत्न केला, खूप विचार करुन बघितला काय केल्याने हिला त्रास होईल, हिची चिडचिड होईल, संताप होईल. कॉंटॅक्टंच नाही, एकमेकांना बघतंही नाही, चुकून कुठे दिसतंही नाही, कोणाकडून काही कळण्याची शक्यताही नाही तर हे कसं साधता येईल. 


हळूहळू राग निवळत गेला किंवा आपण म्हणूया कि कळत गेलं की तो अकारण आहे. आणि मग सुरुवात झाली की यार चुकलोच आपण हे हळूहळू ॲक्सेप्ट करण्याची. चुकलो याची जाणीव होऊ लागली हळूहळू. म्हणजे डोक्यात आलं की आपण चुकलो का आणि ते ॲक्सेप्ट करण्यात बाकीचा वेळ गेला. 

तर हे असं एकूण ॲक्सेप्टंसच्या किंवा उपरतीच्या प्रवासात वर्षदीड वर्ष गेलं आणि लिहिताना डोक्यात तेच असल्यानं चुकून मी दीड वर्षाचा उल्लेख केला. 


तुला पत्र लिहीण्या आधी ना बरेच दिवस, बरेच महिने खरंतर असं छातीवर कोणीतरी खूप मोठा दगड ठेऊन दाबतंय असं वाटायचं आणि पत्र पोस्टात टाकेपर्यंत… नाही सांगता येणार मला नेमकं काय.  आत्ताच का हा प्रश्न माझा मेंदू सतत कुरतडत होता पण ॲट द सेम टाईम आता नाही तर कधी हा ही होताच. ते लहानपणी ना आम्ही पतंग अडकला ना झाडामध्ये की लिमजर बनवायचो, मांजाच्या एका टोकाला दगड बांधायचा आणि बरोबर जिथे पतंग मांजासाकट अडकला असेल त्याच्यावर हा दगड टाकून एकमेकांत अडकवून एक टोक ओढायचं. आणि हळूहळू पतंगाचा मांजा खाली घेऊन तो काढायचा प्रयत्न करायचा. कधी जमायचं बऱ्याचदा फसायचाही प्रयत्न. आणि आपल्या हातातला दोर तुटून वरच्या मांज्यामध्ये गुंतून दगड आणि मांजा तसाच अडकून राहायचा. येताजाता तो दगड डोक्यावर हलताना दिसायचा. माझ्या डोक्यावर सतत हे दोन प्रश्न हलत होते, आत्ताच का आणि आता नाही तर मग कधी? शेवटी इतक्या वर्षानंतर मनात सगळ्यात जास्त तीव्रतेने येणारा प्रश्न जो होता, कशी आहेस? एवढंच लिहून पाठवलं. उत्तराची अपेक्षा नव्हती त्यामुळे उत्तर आल्यानंतर आता काय लिहावं या विचारानं पुरता गोंधळून गेलो. 


ज्या कॅफेत बसून पत्र लिहितोय ना तिथे त्याने गाणी लावलीयेत आणि आत्ताच का आणि आता नाही तर मग कधी या एकूण दोलायमान अवस्थेत असताना माझे पत्र लिहिण्याचे स्किल जेवढे खराब आहेत त्यापेक्षा खराब आवाजात  सुशांतसिंग राजपूत विचारतोय के तेरे मेरे बीच मे क्या है? त्या ओळीवर थांबून विचार करायला नको म्हणलं तरी रेंगाळायला झालंच. पुढे काय लिहू हा प्रश्नंही होताच. 

हे असं काहीतरी भरकटल्यासारखं लिहिणं झालंय, म्हणजे एकूणात पत्राची सुरुवात असावी, त्यात काहीतरी गाभा असावा आणि मग शेवट असावा हे असं आपल्याला खरंतर चौथीपाचवी मध्ये पत्रलेखनामध्ये शिकवलं होतं. 


सुरुवात, गाभा…. शे व ट म्हणजे पूर्ण कसं करु पत्र हा ही प्रश्न आहेच. आणि मग तेवढ्यात परवा अंधाधुन बघितलेला आठवला. त्यात तो आयुषमान स्पर्धेसाठी पियानोची प्रॅक्टीस करत असतो. त्याचा एक पीस कंप्लीटंच होत नसतो, तो बराच प्रयत्न करतो, एका लेवलला आल्यावर त्याला सुचतंच नाही पुढे काय वाजवावं. राधिका आपटेला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तिला वाजवून दाखवतो आणि ती म्हणते कमाल आहे की. तो म्हणतो नाही पण पूर्ण नाही झाला ना.

पूर्ण नाही झाला? पण सुंदर आहे की हेच.

पण पूर्ण नाही ना झाला.

ती म्हणते पण काही गोष्टी म्हणूनंच चांगल्या असतात ना कारण त्या पूर्ण होत नाहीत, अपूर्ण राहतात. पूर्ण करायच्या नादामध्ये उगाच काहीतरी बोटं घालून खराब करु नकोस.

मला पटलंय ते… प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा अट्टाहास करु नये माणसानं.


सध्या तरी इतकंच!

विचारु नकोस कशी आहेस - अमृता

 



पत्र आल्याचं बघितलं आणि रेल्वे रुळाच्या अलिकडे उभ्या असलेल्या माझ्या स्तब्ध देहासमोरून एक रेल्वे धडधडत निघून गेली. त्या क्षणी स्तब्ध उभ राहून एका तालात आणि एका दमात डोळ्यासमोरचा पट बदलताना बघत बसणं या खेरीज काहीच नसतं आपल्या हातात. तसंच झालं.. 


पत्र न उघडता चक्क चुरगाळून भिरकावलं खोलीतच. सगळं संपलं आहे आता हे स्वतःला समजावूनही झालेत बरेच महिने मग हा त्रागा का होतोय? कसला होतोय? का मीच फेकून दिलेलं पत्रं भूत होऊन माझ्या मानगुटीवर बसतय?… 


नाही म्हणता म्हणता उघडलं पत्र आणि भिडायचं ठरवलं स्वतःलाच. रागाने तापलेली माझीच कानशिल आणि तितकाच गरम अश्रू. पण एकच. पूर्वी इतकं भडाभडा रडले नाही. हे नवीन होतं मलाच. अगदी लहानपणीची एक आठवण आहे माझी. बागेतल्या एका उभ्या खांबाला लटकत गोल गोल फिरत राहायचे. तासंतास त्या खांबा सोबतचे खेळ खेळायचे. त्या गरगरण्यात केवढी झिंग होती.. पुढे मुंबईत असताना  लोकलच्या खांबाला धरून दारात सुसाट वारं खाऊ लागले. ती एक वेगळी झिंग.. खऱ्या  आयुष्यात पण असाच एक खांब शोधला होता बहुदा मी… ज्याला घट्ट पकडून आजमावू शकेन स्वतःला. 


तो खांब कोसळला भसकन आणि सोबत मी ही.. 


असो.. पत्र वाचून जरा हसूपण आलंच मला. तुला खरच जमत नाही अजून पत्र लिहायला.. इतकी वळणं घेत घेत कधी बोलायला लागलास तू? “चुकलो मी.. मग? (सगळेच चुकतात)” चा माज पण आहेच.. तरी ‘कशी आहेस? पाशी थांबले आहे मी.  मी आहे हेच खूप आहे सद्ध्या. दिल्लीतली आर्ट क्युरेटर फेलोशिप संपवून नुकतीच आलेय  घरी परत. मी कशी आहे नाही विचारायचय मला.. तू ही नको विचारूस.


तूर्तास इतकंच.. 


Thursday, January 1, 2026

पत्र लिहिण्यास कारण की - कुणाल

 


मला हे पत्र बित्रं जमत नाही म्हणालो होतो पण तूच पत्र लिहिणं बंद केलंस. फोन हळूहळू कमी होत बंद झाले. नेहमीच्या ठिकाणच्या फेऱ्या तर कधीच बंद केल्या होत्या. भेट होण्याच्या सगळ्या शक्यता संपवून टाकल्या होत्या, तू कि मी यात पडण्यात काहीच अर्थ नाही. मान्य आहे तू फोन, मेसेज केले नाही म्हणून मी ही भेटण्या-बोलण्याचा प्रयत्न करु नये असं नाही पण असो. जे झालं ते कितीही उगाळलं तरी बदलता येणार नाहीये. 

दीड वर्ष मोठा पिरीएड असतो यार पण. दीड वर्षांनी तरी मी का पत्र लिहीतोय? तू तिथेच राहत तरी असशील का? तू कदाचित भेटायचा प्रयत्न केला असशीलही पण मीच काहीही न सांगता घर बदललं, आली असशील तर आय ॲम रीअली सॉरी आणि आली नसशील तर त्यात तुझी बिलकुल चूक नाही. साला कधी कधी कोणीच चुकीचं नसतं पण वेळ चुकीची असते असलं फिल्मी बोलावं वाटतंय पण तू म्हणशील स्वतःच्या चुका झटकून टाकण्यासाठी फिलॉसॉफी सुचतीये. तर असो… 

पत्र लिहिण्यास कारण की, कशी आहेस? काय करतेस सध्या वगैरे विचारणार नाही पण कशी आहेस हे मात्र विचारावं वाटतंय. हे विचारायला इतके दिवस लागले का किंवा आता का आठवण आली किंवा माझ्या या वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नाला तू अजून बरेच प्रतिप्रश्न विचारु शकतेस पण I leave that up to you. तुझी प्रतिक्रिया काय असेल हे ही मीच बोलू लागलो तर म्हणशील किमान मला काय वाटतंय हे तरी माझं मला ठरवू दे.

तर पत्र लिहिण्यास एकमेव कारण हेच की कशी आहेस हे पत्र मिळालं तर नक्की सांग. बोलायची ईच्छा नसली तर तसेही स्पष्ट सांग कारण माझ्या लहरी प्रमाणे सध्या बोलायला नको, भेटायला नको म्हणत एकमेकांची सवय तुटेपर्यंत ताणलं असताना आता अचानक धूमकेतू सारखा समोर येतोय. खरंतर खूप बोलावं वाटतंय पण पत्र अजूनंही जमत नाहीच शिवाय जमलंच तरी तुझं म्हणणं काय आहे हे ही महत्वाचं आहेच नाही का? उगीच आपलं हुक्की आली म्हणून पत्राच्या नावाखाली इमोशनल मोनोलॉग खरडून पाठवण्यात काय हशील. त्यामुळे पत्र लिहिण्याचं कारण की कशी आहेस? 

नवा पत्ता देतोय, पत्र मिळालं आणि बोलायला हरकत नाही असं वाटलं तर नक्की उत्तर पाठव. 


कशी आहेस?


के-११०२, आयकॉन ग्रीनबर्ड

क्वालिटी कॉलनी, सोमवार पेठ

पुणे - ४११००१

पत्र बित्र - कुणाल

 



मला हे पत्र बित्र जमत नाही कधीच, तुला सुद्धा चांगलंच माहितीये हे. पण समहाऊ बोलण्यापेक्षा आज मी यातंच कंफर्टेबल आहे. कसंय ना तुझं, माझ्या चूका दिसतात तुला, नाही मान्य आहे मला चुकत असेन मी, नाही चुकतोच पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते बोलण्याची एक पद्धत असते. आपलं माणूस दुखावलं जाऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करावा लागतो. मी मनात ठेवत नाही कधीच, जमतंच नाही असं काही. 

पण माझे ही प्रॉब्लेम्स आहेत. आता तू म्हणणार शेअर केल्याशिवाय कळणार कसं? पण समजून घ्यायची तयारी असेल ना तर सगळं व्यवस्थित कळतं, किमान आपण ज्यांना ओळखतो त्यांच्या मनातलं तरी. किती चांगलंय नाही, तू ती डायरी तरी लिहितेस, कुठेतरी बाहेर पडतं. ईथे सगळंच कठीण आहे न लिहायला जमतं ना बोलायला कोणी. अन कोण असलंच तर आम्हाला एक्स्प्रेसंही करता येत नाही. डोक्यातले विचार वाढत वाढत डोळ्यात जमतातंच रोज रात्री. 

तुझ्या रुममधल्या वस्तू तुला चिडवतात समोर बसून अन मला डिवचतात ईथेही. मला सगळ्या आघाड्या सांभाळाव्या लागतात गं. आई दादा तू अन च्यायला हि मार्केटींगची नोकरी. कस्टमर सोबत बोलताना उगाचंच हसून आव आणायचा. रात्रभर रडून जळजळणारे डोळे अन जागरणानी सुकलेलं तोंड लपवायला दहा वेळा धुवायचं. आपण आपली समजूत काढली तरी तो बेसिनवरचा आरसा च्यायला कधीच खोट बोलत नाही. 

मी मात्र सगळ्यांशीच बोलत राहतो खोटं अगदी स्वतःशीही. काय करु सांग? ईतके दिवस गेले, काहीतरी कारणं आहेत गं माझ्या अशा वागण्यामागे. अजून थोडा वेळ मागायचा तुझ्याकडे असंच ठरवून आलो होतो पण परवाच्या तुझ्या बोलण्यानंतर मी सगळं तुझ्यावर सोपवलंय. आता कारणं कोणती हे विचारु नकोस, प्रत्येकंच गोष्ट बोलायची नसते. समजूनंही घ्यायला हवं.

मी काय बोलतोय मलाच कळत नाहीये. हे पत्र तुला पोस्ट करावं की नाही या द्विधा मनस्थितीमधे ईथवर आलोय.

पोस्ट केलंच तर... तर समजेल का तुला माझी अवस्था की परत..

एक लक्षात ठेव मी आज रुमवर येणार नाही असं सांगायला का होईना तुला मैत्रिण आहे. माझी मित्र मैत्रिण गर्लफ्रेंड सगळं तूच.. तूच पाठ फिरवलीस तर...!!

तीखा पानी - अमृता



 

एवढं आ वासून बघू नकोस पत्राकडे. मला माहीत आहे, तुला हे अजिबात अपेक्षित नाही. तू प्रोजेक्टसाठी बंगलोरला गेलास, एवढचं नाही तर भांडून गेलास, दोन - तीनच दिवस झाले पण आज डायरी लिहिली नाही तर डोक फुटून जाईल.. तुझ्या आठवणींनी आणि शेवटी नेहमी प्रमाणे मलाच नही रहावलं विचारात असतोस ना काय लिहिते डायरीत मग विचार केला डायरी पेक्षा पत्रं लिहुयात,

        सो, पत्र लिहिण्यास कारण की, परत कधी येणार आहेस? मनातल्या मनात हा प्रश्न कितीदा विचरला असेन मलाही माहीत नाही. "तीखा पानी बहोत कम डाला, फ़िरभी ऑंख में पानी?" शिवा चक्क "पूरा मीठा" पाणी पूरी समोर धरत बोलला. मंजु आणि श्री नेहमी प्रमाणे त्यांच्याच नादात. मी त्यांची नजर चुकवतानाच जोरात ठसका लागला... एक प्लेट सुद्धा पूर्ण न खाता मी रूम वर आले.

        रूम कालंच आवरलेली... आज सगळं अस्ताव्यस्त करून टकावस वाटलं परत. काहीच खाण्याची ईच्छा नव्हती. कामाचा शीण घालवण्यासाठी कॉफी घेउयात असं वाटलं पण बघते तर दूध नासलेलं आजही!.. विसरले फ़्रीज मध्ये ठेवायला आजही!.. तुझ्यामुळे होतंय हे सगळं शेवटी तांब्याभर थंड पाणी प्यायलं माठातलं. २-३ घोटात शांत शांत वाटलं एकदम. माझ्या डोक्यावर हात ठेऊन "वेडाबाई" म्हणतोस ना, अगदी तसंच

  पुन्हा हॉल मध्ये आले.. तू दिलेली उशी मज्याकडे बघून हसत बसली होती, बाजूच्या कपटावर तू दिलेला पेन स्टँड. भिंतीवरचं आपल्या आवडीचं घड्याळ, कोप-यात्ल्या जाळीत तू इथेच विसरून गेलेला वॉली बॉल... भिंतीवर केलेलं कॉलेज पिक्स चं कोलाज... आणि टेबलावरच्या पुस्तकांमध्ये माझी डायरी.. त्यावर फ़क्तं नाव माझं...आतली सगळी पानं तुझीच..

बाजुला मंजुच्या पलंगावर थोडासा पसारा होता. तीही आज रूम वर येणार नसल्याचा मेसेज वाचला आणि अजूनच रिकामं रिकामं वाटू लागलं


तसा तू पहिल्यांदाच नाही गेलास बंगलॊरला, पण आधी २-३ दिवसात काम संपायचं आता तसंही नाही.. आपल्या भांडणाच्या रागात तूला सी ऑफ़ करायला ही नाही आले मी.. तुलाही एका कॉल ने आग्रह करावा वाट्लं नाही??? ३ दिवस झाले तुझा काही कॉल नाही .. मेसेज नाही.. मी उगाचच कामात बिजी करून घेतलं.. म्हणजे भासवत राहीले स्वतःलाच!

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...