Saturday, March 29, 2008

स्वयपाकघरात थोडी लुडबूड


स्वयपाकघरात थोडी लुडबूड
हल्लीच्या मुलींना स्वयपाकही येत नाही....
कविता वगैरे ठिक आहे, पण सांगा त्यांना कवितेनं पोट मात्र भरत नाही.
स्वयपाकच काय.... सगळ्याच गोष्टीत बायकोला मदत आम्ही करु.
स्वयपाक तिने केला तर भाजी आणायची जवाबदारी हाती आमच्या धरु.
पण स्वयपाकही आम्हीच केला तर ती काय फ़क्त कविता करेल?
बिचाऱ्या नवऱ्यासोबत त्या शब्दांनाही तव्यावर धरेल....
यमक जुळवता जुळवता भाजी खुडायची राहते
दूध ऊतू जाऊन गॅसवरुन मग किचेन ओट्यावर वाहते....
भातात किती पाणी घालू? अजून आईला विचारता....
अरे वरणभातही शिजवता येईना, पण मुलांना कवितेतही धारेवर का धरता?
प्रत्येक सणाला सासुरवाडिवरुन आईला येतो फोन....
सगळ्या सणांना पुरणपोळीचा नैवेद्य का गं.... त्रासिक असतो टोन.
आर्धा किलो गुळ, दिड किलो डाळ, दोन-चार वेलदोडे अन टाकू का जायफळं दोन????
(दोन जायफळं????) अगं जेवतानाच झोपतील जावाईबापू, आईनं सांगताच आदळते तिकडून फोन.
ईडलीचं पिठ किती दिवस भिजवायचं?
आईनं भिजवून दिलं तर किती वेळ शिजवायचं?
पोळ्या म्हणजे तर एकेका राज्याचा नकाशा असतो....
जेवण म्हणजे भूगोलाचा तास.... अन ऑफिसात डबा ऊघडल्या ऊघडल्या हशा पिकतो.
कधीतरीच घरी ईडली किंवा जरा वेगळा बेत असतो....
आर्ध कच्चं आर्ध पक्क शिजलं की पुरता बेत फसतो....
हा फसलेला बेत अन तिचा त्रागा पाहून नवरा बचावात्मक पवित्रा घेतो.
अन स्वयपाकघरातला राडा तसाचं ठेवून मग तिला घेऊन हॉटेलात जेवायला जातो.
जेवता जेवाता विचारतो मग, ए एवढ्यात कवित केली नाहीस का कुठली नवी....?
विसर जरा ते स्वयपाकघर अन घरकाम (ते तर रोजचंच आहे)... एक खरं सांगू, तुझ्यासारखी रसिक बायको मिळायला खरंच नशिबाची साथ हवी....
कुणाल

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
आहो एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
कुणाचीतरी गर्लफ्रेंड बनून बघायचंय स्वतःला....
येता जाता आता तो माझे नखरे सहन करेल.
मी सॊडायचा म्हटलं तरी माझा हात हाती त्याच्या धरेल.
आठवण त्याची येईल तेव्हा त्याला मिस कॉल देईन
मिसकॉल देण्यासाठीही त्याच्याच सिमवर ऍडऑन सिमकार्ड घेईन.
छोट्या मोठ्या गोष्टींवर आता मीही बसेन रुसुन.
पिक्चरची दोन तिकिटं त्याच्या हातात बघून, देईन प्रतिसाद हळूच गालात हसून.
पिझ्झा काय बर्गर काय पंजाबी काय नि चायनिज काय.... भरपूर हॉटेलिंग करेन.
सूपपासून फिंगरबाऊल पर्यंत मला हवं तसं, फक्त बिल मात्र त्याच्या हवाली करेन.
वीकेण्ड्सला तर काय शॉपिंगची चंगळ..... शॉप टिल ड्रॉप.
क्रेडिट कार्ड आहे कशासाठी त्याचं, जिथे जाईन तिथे स्वॅप करेन नॉन स्टॉप.
फार नाही पण महिन्यात दोनचारदा लॉंगड्राईव्हचं प्लानिंग असेल.
क्रेडिट लिमिट संपलं तरी त्याच्याकडे कॅश अन पेट्रोकार्डही असेल.
हि सगळी बिलं चुकती करता करता त्याच्या डोक्यावरचे केस जातील
माझ्या घरी मात्र माझ्यासाठी रोज नवी-नवी अन त्याच्यापेक्षा सुंदर सुंदर स्थळं येतील.
मला मागणी घालायच्या गडबडीत हेअर विव्हिंगच्या भरमसाठ खर्चाचं ओझही तो डोक्यावर घेईल.
अन या सगळ्या धांदलीत माझं लग्न मात्र कुण्या एका सुंदर "एन. आर. आय" शी पक्क होईल.
एवढं सगळं भयाण स्वप्न पाहून मी आता जागा होईन.
गणपती बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून, गर्लफ्रेण्ड वगैरे नाही बनायचं मला अशी शप्पथ घेईन....
गंमत नाही नि स्वप्नातही नाही, कशासाठीच बदलून बघणार नाही स्वतःला.
माझी गर्लफ्रेण्ड नाहीये खर्चिक, लग्न करेन तिच्याशीच, सरतेशेवटी आम्ही दोघेच आहोत ना एकामेकाला......

कुणाल

Monday, March 24, 2008

"निर्माल्यं"

"निर्माल्यं"

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला....
आहो एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
पूजेचं फूल बनून त्या ईश्वराच्या चरणी अर्पण करायचंय स्वतःला.
येता जाता प्रत्येकजण आता हात जोडेल.
देव्हाऱ्यात मला वाहताना,माझ्याच रुपाने "भक्ती" त्यांची घडेल
माझं अस्तित्व तिथे एक दिवसंच असेल(२)
ऊद्या तुम्हाला तिथे नवं फूल दिसेल
एका दिवसांतच आता होईल माझं निर्माल्य.(२)
पण सुकलेल्या फूलाकडे पाहतानाही आठवेल तुम्हाला ते सारं मांगल्य
सुकलेल्या फूलाचीही पाकळी न पाकळी तुम्ही ठेवाल जपून(२)
असंच एके दिवशी मग द्याल मला गंगेमधे झोकून.
पण तिथेही माझ्या नशिबी गंगेचं निर्मळ पाणी असेल(२)
ऊद्या तुम्हाला माझ्या जागी एक नवं फूल दिसेल.
माझं निर्माल्य खऱ्या अर्थानं तेव्हा निर्मळ झालं असेल.(२)
गंगेत न्हायल्यावर कोमेजलेल्या फूलाची पाकळी न पाकळी हसेल
एकंच दिवस का असेना पण तो मी सन्मानाने जगेन.(२)
गंगेमधे मिसळताना तोच मंगलमय दिवस निरंतर मी स्मरेन....
निरंतर मी स्मरेन.......

कुणाल.

माझी कविता हरवलीए.........

माझी कविता हरवलीए.........

माझी कविता हरवलीए.........
नऊ ते पाच पाट्या टाकण्याच्या वेळापत्रकांत.
फक्त पैसांच कमविण्यासाठी जगणाऱ्या या मतलबी जगांत.
शब्दकोशांत ठासून भरलेल्या अवजंड शब्दांच्या गर्दीत.
व्यवसाय, नोकरी-धंद्याच्या गणवेश आणि वर्दित.
दररोज आकडेमोड करुन मांडयला लागणाऱ्या अनिवार्य अशा जमा-ख्रर्चात.
जागोजागी खेटे घालून चपला झिजेपर्यंत कराव्या लागणाऱ्या नोकरीच्या अर्जात.
खरं झाकून ठेवून, खोटंच दाखवणाऱ्या सुंदर मुखवट्यांत.
माझ्यावर रुसून मलांच दुरावलेल्या माझ्या शब्दांच्या दुखवट्यांत.
दिखाव्याखांतर साथ देणाऱ्या शेकडो माणसांच्या कळपांत.
सजीवांची सृष्टि असलेल्या पृथ्वी नावाच्या तथाकथित निर्जीव स्वर्गात.
माझी कविता हरवलीए..... खरंतर माझ्यांत.
कुणी देईल का शोधून, शब्द दुरावल्यापासून माझाच आवाज पोहचंत नाही माझ्यांच अंतकरणात.

कुणाल.

Sunday, March 23, 2008

"भेट"

"भेट"
भेटशील ना तू मला कधीतरी अशीच????
हसशील ना नजरेस नजर मिळवताना कशीनुशी उगीच.
मी समोर असूनही तुझी नजर तो पूर्वीचा मी शोधत असेल.
पण तोच मी, मला मात्र तुझ्याच डोळ्यात दिसेल.
काहीतरी बोलायचं म्हणून विचारेन मी, कशी आहेस तू?
माझं जाऊ दे, तू कसा आहेस? उत्तरादाखल एक प्रश्नच विचारशील तू.
उत्तर माहित असूनही दोघे शांत ऊभे राहू.
आयुष्याच्या एका वळणावर अचानक एकत्र येतानाही, दोघांच्या वेगळ्या होणाऱ्या दिशा पाहू.
मग मी म्हणेन, कसला विचार करतेस एवढा?.... काहीतरी बोल.
तू म्हणशील, तू तरी कुठे बोलतोएस,...... तूही त्याच विचारात बुडलाएस ना खोल?
बोलावसं वाटलं तरी शब्द अपुरे पडतील.
अबोल राहूनही नजरेची भाषा समजून घेण्याची नाट्य मग घडतील.
गतकाळच्या आठवणींमुळे कंठ दाटून आला असेल.
डोळ्याच्या कडांमधे आसवं लपवत चेहरा मात्र खोटं-खोटंच हसेल.
क्षण गोठून जावासा वाटला तरी तेव्हा वेळेचं बंधन असेल.
"निघावंच लागेल आता" या स्वरुपाची असहाय्यता दोघांच्याही चेहऱ्यावर दिसेल.
चटकन निघून जाताना सवयीनं तू, येते मी म्हणशील.
ईतकावेळ डोळ्यात तरळणाऱ्या आसवाला मग टचकन गालावर माझ्या आणशील.
आता मात्र आसवं न रोखता मी तुला खूणेनंच निरोप देईन.
पाठमोऱ्या तुझ्या आकृतीकडे ठिपका होईपर्यंत भरल्या डोळ्यानं पाहत राहीन.
आजसारखं तेव्हाही तू मागे वळून पाहणार नाहीस.
आणि तेव्हाही माझं मन तू एकदातरी वळून पाहण्याची आशा सोडणार नाही.
पाय उचलता घेईन मी तिथून, असंच कधीतरी परत भेटायची वेडी आशा ऊरी घेऊन.
पण तेव्हाच कायमचा मावळला असेल आपल्या नात्याचा सूर्य, विरहाच्या पडद्याआड जाऊन. !!!!

कुणाल.

अनुभवलेलं जग - सुंदर तरुणी.


अनुभवलेलं जग - सुंदर तरुणी.

काल रस्त्यामधे एक सुंदर तरुणी दिसली.
फार पूर्वीची ओळख असल्यासारखी ती गालात गोड हसली.
तिनं माझ्याकडे, मी तिच्याकडॆ हळूच नजर चोरुन पाहिलं.
आता फक्त पुढे जाऊन तिच्याशी बोलायचंच राहिलं.
माझ्याशी बोलायलाही तीच पटकन पुढे सरसावली.
हे स्वप्नं की सत्य हा विचार करुन आता चक्करच यायची राहिली.
मन म्हणालं, "याआधीच तू मला का नाही गं दिसली.
"जरा.... हा पत्ता सांगता का?" असं लडिवाळपणे तिनं विचारलं.
कोमल आवाज ऐकून तिचा, मन कसं आनंदाच्या झऱ्यात न्हायलं.
पत्त्याचा कागद हातून तिच्या घेताना आपसूकच शहारलं.
"थॅंक यू भैय्या" म्हणून सांगितलेल्या पत्त्यावर तडक ती निघाली.
भैय्या ऐकून हिरमूसून, चेहरा पाडून मी ही घरची वाट मग धरली.
आता मात्र पक्क ठरवलंय मी, पत्ता कुणालाही सांगायचा नाही.
विचारलंच कुणी हटकून तर सांगेन, "मी ही ईथे नवीनच आहे, मला काहीच माहित नाही ताई"

कुणाल.

भाऊबीज - ओवाळणी


भाऊबीज - ओवाळणी

नाही गं ताई..... भाऊबीज कोरडी राहत नाही.
कारण कितीही दूर गेलं तरी काळजातला झरा वाहायचा थांबत नाही.
नीट बघ, निरंजन तिथेच नाही ज्योत ईथेही पेटली आहे.
मनाच्या आभाळातली सर आज भाऊबीजेला तुला न मला भेटली आहे.
उसासा दिर्घ असला तरी थंड नाही वाटत आज.
तुझ्याच प्रेमाची त्याला आहे गाज.
मन आठवांच्या हरेक क्षणात....
चिडलो भांडलो तंटलो तरी आजमन घुटमळे तुझ्याच अंगणात.
वेडे तुझं नि माझं अंगण वेगळं कधी नव्हतंच मुळी.
भावनेच्या भरांत आज काहीतरीच बोलतेय खुळी.
बघ हा गधडा आलाय तुझ्या अंगणात.
कर औक्षण माझं, चल ना भाऊबीज साजरी करुयात.
चल, सोबत बसून पुन्हा एकदा आठवांच्या क्षणांची करु ऊजळणी.
द्यायला बाकी काही नाही गं ताई, हे क्षणंच माझ्याकडून समज ओवाळणी.....

तुझाच (गधडा) भाऊ....
कुणाल.

नथुराम गोडसे का बोलतोय????


नथुराम गोडसे का बोलतोय????

नथुराम गोडसे देशासाठी मेला का?
गांधीजींना मारुन तो देशाचं भलं करुन गेला का?
त्याच्या तीन गोळ्य़ांनी एक शरीर मेलं.
त्याच तीन गोळ्य़ांनी गांधीजींच्या विचारांना अजरामर केलं.
अंग झाकायला एक पंचा अन हाती काठी घेऊन सत्याग्रह कोण करतो?
एका हाकेवर जनतेला एकत्र आणणारा, देशासाठीच मरतो.(दुसऱ्याला मारुन नव्हे)
विलायतेहून शिकून आलेला वकिल, गोऱ्यांच्या विरोधात अहिंसेचे शस्त्र घेऊन ऊभा राहतो.
घरची श्रीमंती लाथाडून, एका आश्रमातून देशाच्या स्वातंत्र्याला त्याचा प्रत्येक श्वास का वाहतो?
जहाल काय नि मवाळ काय, सर्वांचेच ध्येय होते समान.
फक्त बापूच नाही, टिळक, नेताजी अन भगतही होते महान.
शिवबांच्या तलवारीची आठवण नथुरामने करुन देऊ नये.
त्या शूर वीराचं पवित्र नाव एका कटकारस्थानि खुन्याने घेऊ नये.
सत्याग्रह अहिंसा सगळं साफ झूठ आहे, हे आता नथुराम आम्हाला शिकवणार का?
सत्याग्रह, म्हणजे सत्याचा आग्रह आम्ही नथुरामच्या सांगण्यावरुन सोडणार का?
एका निशःस्त्र माणसावर गोळ्या झाडून त्यानं काय अटकेपार झॆंडा लावला?
याउपर बापूंना महान म्हणून, त्यानं मनाचा किती मोठेपणा दावला....
कोणी म्हणावं असं की, देशासाठीच जन्मणार अन देशासाठीच मरणार????
मनातंच ज्याच्या राम नाही तो कुणाला मारुन रामराज्य काय आणणार?
नथुराम गोडसे बोलतोय म्हटलं की सगळे कान टवकारुन ऐकणार.
गांधीजींवर टिका करायची एकही संधी कशी काय सोडणार????
उचलली जीभ लावली टाळ्याला,
पण ....बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही ही खरी भ्रांत आहे.
म्हणूनंच डोळे, कान, तोंड बंद.... आणि सगळे शांत आहे.
कुणाल.

Tuesday, March 18, 2008

"तू होतीस तेव्हा"....

"तू होतीस तेव्हा"....

तू होतीस तेव्हा.....
तो चंद्रही चांदण्याचं लेणं लेऊन रोज रात्री सजत होता.
खिडकितून तुझं सौंदर्य चोरुन पाहण्यासाठी रात्र रात्र जागत होता.
पाऊसही तुझ्याच भेटिसाठी धरणीवर बरसत होता.
तुझ्या गालावर रेंगाळण्यासाठीच तो थेंब थेंब बनून तरसत होता.
तू गेलीस नि बघ,
आपल्या नात्याच्या धरतीवर प्रेमाचा दुष्काळ पडलाय.
आता तर पाऊसही पडत नाही.
चंद्रही दडून बसला कुठे, चांदण्यांच दर्शनही मला आता घडत नाही.
तू गेल्यापासून आसवांनीही माझी साथ सोडली.
सुख दुःखात समान साथ देणाऱ्या अश्रूंनीही साथ सोडावी अशी सांग,
माझ्याकडून गं काय चूक घडली.
तुझ्या साथीत थंडी नेहमीच गुलाबी वाटायची,आता नुसताच बोचरा वारा असतो.
स्मृतीभ्रंश झाल्यापरी त्या गुलाबी आठवणींनाही आता या शुष्क मनांत थारा नसतो.
तुझ्यासवे माझा प्रत्येक दिवस नवा होता.
तुझ्या प्रेमाचा नि सहवासाचा प्रत्येक क्षण मला पुनःपुन्हा हवा होता.
आता मात्र दिवसही वाटतो मला काळरात्र.
रोजंच ऊगवतो सूर्य माझ्यासाठी घेऊन न संपणारं हे काळोखाचं सत्र.
आता मात्र एकंच सांगणं आहे तुला.....
परत तू येऊ नको...अर्ध्यावर सोडण्यासाठी माझा हात आता हाती तुझ्या घेऊ नको.
तुझ्याशिवाय आताशा जगायलाही मी शिकलोय.
हसू येत नाही ओठी पण, मनावरचा घाव दाबून धरुन सर्वांसमोर खोटं खोटं हसायला मी शिकलोय.
येऊ नको परत, माझं नातं नव्यानं त्या आसवांशी जोडण्यासाठि.
शुष्क डोळ्यांनीच जगू दे आता , दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....
दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....
कुणाल.

पाऊस

पाऊस
असं वाटतं....
सगळी दुःख वाहून जाईपर्यंत
या पावसांत एकट्यानंच चिंब भिजावं.
सोबत फ्क्त तुझ्या आठवणी असाव्या,
बाकी कुणीच नसावं.
बरसणाऱ्या या धारांमधे
आसवं सगळी मिसळून जावी.
आसवं माझी पुसायला
तूच परत माझ्याकडे यावी.
अधुरं हे स्वप्नं माझं
आज ना ऊद्या पूर्ण व्हावं
अधुरंच राहणार स्वप्नं हे जाणवतांच
आसवं गाळून जडावलेल्या पापण्यांनी कायमचंच निजावं......

वाट पाहतोय.....
कुणाल.

परतून तू येशील का????


परतून तू येशील का????

तू गेलीस अन बघ,माझ्या कवितेचा विषय संपला.
आयुष्याचा ईथे आशय संपला.
श्वासांशीही चालू आहे अंतिम झगडा,
आता जगण्याचा माझा निश्चय संपला.
जाताना तू, मागे आठवणी का ठेवून गेलीस?
जगण्याची शपथ माझ्याकडून घेताना, आयुष्यभर सोसायला मरणयातना देऊन गेलीस.
खरंतर जीवघेणीच ठरलीए तुझी हि देवघेव.
काळीजंच ऊरलं नाही आता, पण तू सांगतेस
आपल्या प्रेमाची ज्योत या काळजाच्या कोपऱ्यांत सदैव तेवत ठेव.
एक काळ होता असा, माझी स्वप्नंही तुझ्यांच तालावर नाचू लागलेली.
पण आता मात्रं स्वप्नांची फूलं आसवं बनून या डोळ्यांच्या कडांमधे साचू लागली.
काटेरी निवडुंगातही सौंदर्य पाहणारा मी, पण आता मला कोमल फूलही टोचू लागली.
जीवनाच्या सगळ्याच रंगात मला आता दाहकताच दिसू लागली.
अजूनही आठवतो मला तो दिवस.....
त्या मंगलमय सोहळ्यात सारा साज-श्रुंगार माझ्या मनालाच नाही तर तुलाही टोचत होता.
आणि सनईचौघड्याचा मंगलमय सूरही मला भेसूरंच भासत होता.
तुझी जवाबदारी पेलण्यास समर्थ असणारे खांदे आज मात्रं झुकले होते.
कारण मला बिलगलेले पारीजातकाचे फूल आज कुणी परक्यानेच खुडले होते.
तुझ्या नजरेतल पाऊस, तेव्हापासून माझ्या काळजांत बरसतो आहे.
शुष्क डोळ्यांनी जगताना, मी मात्रं तुझ्या ओंजळीत गाळलेल्या माझ्याच आसवांच्या दोन थेंबांसाठी अजूनही तरसतो आहे.
एकदाच मला तू माझ्याच अश्रूंचे दोन थेंब परत देशील का?
माझ्या पापण्यांना ओलावा देण्यासाठीतरी, एकदाच तू परत ईथे येशील का......
परतून तू येशील का????
कुणाल

Monday, March 17, 2008

कॉलेज, कट्टा, कॅंटिन..... = लाईफ.

कॉलेज, कट्टा, कॅंटिन..... = लाईफ.

कट्टा, कॉलेज, कॅफे, हॉस्टेल अन
गर्ल्स हॉस्टेलच्या त्या पायऱ्या.
यारी, दोस्ती, पोरी, टिंगल अन
आयुष्यभर साथ देण्याच्या वाहलेल्या शपथा गहिऱ्या.
अभ्यास? अरे हट... अभ्यास कसला????
तेव्हा होतं फक्त कॅंटिन.
वयंच होतं अल्लड तेव्हा,
सगळ्यांचं जेमतेम नाईन्टीन....
दिवस-रात्र टाईमपास फक्त
सिन्सिअरीटीला मात्र सुट्टी सक्त.
मित्र म्हणायचे..... मित्र म्हणायचे, तू नसलास तर कट्ट्याचा ईतिहास कोण घडवेल?
येणाऱ्या जाणाऱ्या पोरींना आज कोण चिडवेल?
कुण्या तुझ्याशिवाय कट्टा सुनासुना वाटतो यार.
लेक्चर सोडा ओ पण कट्ट्यासाठी तरी कॉलेजला जायचोचजरी दुपार झाली पार....
एक दिवस दांडी मारली तर मित्रांचे शंभर फोन.
अरे भ***, अरे एकटा काय करतोस घरी?त्रासिक असायचा टोन....
एखादी तरी पोरगी आवडायची प्रत्येकाला.
चकाचक कपडे, झक्कास शूज.... मग
तिच्यासाठीच आवरुन बसायचे कट्ट्यावर मिरवायला.
स्वयंघोषित गर्लफ़्रेंड आली की सर्वांच चिडवणं सुरु.
बॅड ईंम्प्रेशन टाळण्यासाठी तोंड लपवूनंच बसायचा मग लव्ह गुरु.
कट्यावरंच जायचा तेव्हा सारा दिवस.
एखादंतरी लेक्चर करावं आम्ही म्हणून शिक्षक बोलायचे देवाला नवस.
लोकलाईट असूनही रात्री होस्टेलची रुम ठरलेली.
दिवसभराच्या धिंगाण्यानंतरही असायची थोडी मस्ती ऊरलेली.
शिव्या वाचवण्यासाठी नेहमीचं होतं घरात छतावरुन शिरणं.
आईबापाची होती भीती पण तरीही सोडलं नाही रात्रीअपरात्री फिरणं.
खरंच तेव्हा मी माझ्या मनाचाच नाही कॉलेजचाही राजा होतो.
कसलंच टेंशन नाही, "अपनी यहा चलती है" म्हणत आम्ही फक्त मजाच करत होतो.
वाटायचं तेव्हा खरंच माझ्याशिवाय कॉलेज बंद पडेल.
मी नाही आलो ईथे तर सगळ्यांचंच अडेल.
रीझल्ट???? पास, फेल, सेकंड क्लास, तुरळकंच फर्स्ट क्लास तरी सारे एकदम खुश.
आज शेवटचा रीझल्ट, मित्रांच्या ताटातुटीच्या विचारानं मात्र सारेच मनातून नाखुश.
मार्कांसाठी ईथे कोण कॉलेजला आलं होतं.
धमाल, मस्ती, धिंगाण्याची चार वर्ष पण आता मात्र एकटेपण ऊरलं होतं.
कॉलेज संपून आज चार वर्ष पूर्ण झाली.
पण नेमकी कालंच त्या आठवणींनी आसवं बनून डोळ्यात का गर्दी केली????
म्हणून काल एकटाच कॉलेजला जाऊन आलो.
कट्टा, कॅफे, हॉस्टेल, कॅंटीन सारं जसच्या तसं पाहून आलो.
अजूनही तिथे तेचं रुटिन पाहून हबकून गेलो.
कारण कॅंटीन, मुलं, मुली सारंच पूर्वीसारखं....फक्त मीच त्यातून ऑड मॅन आऊट झालो.
कट्ट्यावर तशीच गर्दी, पण कट्ट्याचा ईतिहास कुणी दुसराचं "कुण्या" चालवत होता.
माझ्यातला "कुणाल" मात्र आठवणीतून जागा करण्यासाठी मलांच गदागदा हलवत होता.
डोळ्यातल्या पाण्याच्या जागी अचानक चेहऱ्यावर स्मितहास्य आलं....
नव्या कट्टागॅंगनं शब्दाविनांच माझ्या सोनेरी काळाशी भाष्य केलं....
कुणाल.

Saturday, March 15, 2008

अनामिक भटकंती



ती निरव शांतता भंग करत फोन वाजला....
"हाय" पलिकडून आवाज तिचा.
कुठे आहेस तू? आवाजातलं आश्चर्य लपवत प्रश्न माझा.
मी???? मी अजूनही ऊभी आहे रे तिथेच वाटेकडॆ डोळे लावून.
ऊत्तरादाखल फक्त एक सुस्कारा सोडू शकलो मी, न रहावून.
सोड, नको तो विषय, तू कसा आहेस बोल.
हं..... मस्त मजेत, खोटंच बोलताना आवाज गेला खोल.
दोन मिनिट दोघेही शांत, स्तब्ध.
भेटशील का रे एकदाच, शांतता चिरत कानावर, अहं.... काळजापर्यंत पोहोचले ते शब्द.
मी खूप खूप दूर गेलोय गं, परतणं आता शक्य नाही.
अरे जाण्याआधी चार क्षण हवे तुझ्या सहवासाचे,नाहीतरी मलाही माहित्येय आता परतण्यात तसं तथ्य नाही.
ती... माझ्या मनावर गोंदून ठेवीन मी, शेवटचे हे क्षण.
मी.... बर भेटूया, नाही तरी यापेक्षा काय देऊ शकतो मी तुला, या आठवणीच तुला माझ्याकडून आंदण.
ती संभ्रमावस्थेत.... आपली ही शेवटची भेट????
मी.... काय समजावं मी, हा एक प्रश्न कि तुझा निर्णयच थेट?
तिच्या नजरेतील असहायता सारं काही सांगून गेली.
पहिल्यांदाच शब्दाच्या भाषेवर नजरेची भाषा मात करुन गेली.
भेट तर आम्ही काळाशी लढून घडवून आणली...
मात्र नियतीने विरहाची बीजे पेरली...
आगतिकता डोळ्यांत, शब्द मनाच्या कोपऱ्यात...
विचारांची आणीबाणी...अन कर्तव्य हृदयात...
मग कर्तव्याची अबोल शाल पांघरुन,ती निघाली...
न रॊखता तिला, मीही माझी परतीची वाट धरली....

....कुणाल.


Wednesday, March 12, 2008

"आमचा बाप"

"आमचा बाप"
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.
"भाऊ" तुमचांच
कुणाल
१२/०६/०७

Sunday, March 9, 2008

भेकड शौर्य.
लहानगे ऊभे असहाय्यपणे आभाळाकडे हात करुन.
वाहता वाहता सुकले अश्रू त्या दोन गालावरुन.
निपचित पडली भावंडं उथळ त्या थडग्यात.
अन्यायाच्या रणावर शोधताहेत पित्याला, अडकले दुर्दैवाच्या रहाटगाडग्यात.
अपमानित राष्ट्र आज दृष्टीहीन झालं.
संकट असं रे का यांच्यावर आलं???
कुणी म्हणे तो शूर ईथे येऊन गेला.
पण तोच शूर आज शूर न दिसला मला.
शूरांचा शूर आज भासे भेकड.
झुकल्या खांद्यावर मिरवतो निष्पापांच्या दुःखाचं जोखडं.
दिसतंय अन्यायाच्या धरतीवर निष्पापांचं रक्त शिंपलेलं.
राक्षसी सुखाच्या हव्यासापोटी त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.
डागडूजी तरी कशी करावी, सारी घरही जळून झाली खाक.
सुवासिनीच्या भाळी कुंकवाच्या जागी दिसते आता राख.
मरणाचा वास साऱ्या आसमंतात पसरला.
रक्ताचे अश्रू सांडताना सांगते ती, तो शूर ईथे येऊन गेला.
कायमचे मालवले दिवे दारुगोळ्यानं जाळून आकाश.
मरणाच्या दारी उभं अजून एक कुटुंब हताश.
धास्तावलंय पोर ते, त्याच्याच आसवाला आपलंसं करायला.
कारण सांगतंय कुणीतरी..... तो आज ईथे येऊन गेला.
पण तोच शूर आज शूर न दिसला मला.
दिसतंय अन्यायाच्या धरतीवर निष्पापांचं रक्त शिंपलेलं.
राक्षसी सुखाच्या हव्यासापोटी त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.
लहानगे ऊभे असहाय्यपणे आभाळाकडे हात करुन.
पण कुणीही करत नाही प्रतिप्रश्न, आमच्यावरंच का हा अन्याय म्हणून???????
अबालवृद्ध झुकले गुडघ्यावर नशीबाचा फेरा स्वीकारुन.
बायकापोरीही कापल्या गेल्या अत्याचार करुन.
एका पिढीचा सूर्य तिरस्कारानं काळवंडला.
होय खरंच तो आज ईथे येऊन गेला....पण तोच शूर आज शूर न दिसला मला.
दिसतंय अन्यायाच्या धरतीवर निष्पापांचं रक्त शिंपलेलं.
राक्षसी सुखाच्या हव्यासापोटी त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.
त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.........
कुणाल.
(प्रेरणा - नो ब्रेव्हरी हे ईंग्रजी गाणं)

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...