Tuesday, February 20, 2018

टेक न्यू गोल्ड

आपल्या देशात लोकांना म्हणजे बऱ्याचशा लोकांना भूतकाळात रमायला आणि रहायला फार म्हणजे फार्फार आवडतं. स्वतः काहीही न करता पुराणाचे, भव्य इतिहासाचे गोडवे गाणं, आपल्या अस्मिता त्याच्याशी जोडणं हे यांचं प्राथमिक काम असतं. कोणा थोर पुरुषानं/स्त्रीनं समाजासाठी आयुष्य वेचून अचाट अफाट असं काहीतरी केलेलं असतं आणि हे सर्वश्रुत असलं किंवा आख्ख्या जगाने त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची योग्य ती दखल घेतलेली असली तरी हे महाभाग रात्रंदिवस फक्त थोर व्यक्तिमत्वांचा जप, जयजयकार करण्यात आणि त्यांच्या नावाने अरेरावी करण्यात धन्यता मानत असतात. बरं बऱ्याचदा हा जयजयकार अगदी चुकिच्या पद्धतीने केलेला दिसतो, महापुरुषांनी/स्त्रीयांनी जी शिकवण दिलेली असते किंवा जे महान कार्य केलेले असते त्याच्याशी काडीमात्र संबध नसल्यागत हे सगळे बिथरल्यासारखे वागत राहतात आणि याउपर यांचं असं म्हणणं असतं की या दिड शहाण्यांना आपल्या इतिहासाचा जाज्वल्य (?) वगैरे अभिमान असतो. त्यांच्याकडून प्रेरणा वगैरे घेऊन आपण काही करणं तर फार लांबची गोष्ट पण हे महाभाग त्यांचीच नितीमूल्य पायदुळी तुडवत असतात आणि हे यांच्या गावीही नसतं.

अरे किती दिवस आपण फक्त इतिहासावर बोलण्यात, इतिहासात रमण्यात, बेंबीच्या देठापासून फक्त जयजयकार करण्यात आणि एकूणातंच इतिहासाचे गोडवे गाण्यात धन्यता मानणार? किती दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांची पूर्वपुण्याई पुरणार. तुम्ही स्वतःही काही करणार आहात का फक्त जयंती, पुण्यतिथी, हा ऊत्सव तो ऊत्सव करत गाड्यांच्या सायलेंसरच्या नळकांड्या काढून, कर्णकर्कश्य हॉर्न्स वाजवून, भगवे, निळे, हिरवे झेंडे घेऊन गाड्या उडवत राहणार? आपला आपल्या स्वकर्तुत्वावर बिलकुल विश्वास नाहीये, आपण त्यापेक्षा सोपा मार्ग निवडतो, इतिहासाच्या कुबड्या वापरुन आयुष्यात खुरडत राहतो. बरं कोणी चार चांगले शब्द सांगायला गेलं तर अस्मिता, अभिमान, गर्व बिर्वाचं कार्डं वापरुन त्याला/त्यांना वेठीस धरता येतं, आपल्या भावना तर  कचकड्यापेक्षा नाजूक असतात आणि त्या पापणी लवेस्तोवर दुखावल्या जातात. ज्या महापुरुषांची नावं घेतो आपण त्यांना वर लज्जेने मान खाली घालावी लागत असेल असलं वर्तन करुन आपण आपला निषेध नोंदवतो, दंगे, तोडफोड करतो. शिवाजी, गांधी, सावरकर, आंबेडकर, नेहरु, टिळक यांना आत्ताची परीस्थिती बघायची सोय असेल तर निश्चितंच त्यांना आपण कोणासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं असा प्रश्न पडून लाज वाटत असेल.

मी गेल्या दहाएक वर्षात कित्येक पोरं बघितली जी नेहमी तक्रारीच्या सुरात सांगत असतात की आमच्या फादरला तेव्हा लै चान्स होता राव पैसे कमवायचा, तेव्हा एखादी जागाबिगा घेऊन ठेवायचा पण तेव्हा काय नाय केलं. तेव्हाची अमुकएक संधी एनक्याश करायला बाप कसा चुकला नाहीतर आम्ही कसे आज श्रीमंत वगैरे असतो हे सांगताना हे महाभाग सोयीस्कररीत्या विसरलेले असतात की आपण स्वतः या घडीला काहीच करत नाही, गुड फॉर नथिंग आयुष्य जगतोय. बरं बापानं यांच्यासाठी आयुष्यभर केलेला स्ट्रगल यांना दिसत नाही, वडीलांच्या आजोबाच्या वडीलांचं नाव काय ते माहीत नसतं पण शके १७२० ला काय झालं त्याचे २०१८मध्ये गोडवे गात रीकामटेकडं बसायला यांना जमतं. अरे त्या थोर स्त्री-पुरुषांकडून आदर्श घेऊन तेव्हाच्या गोष्टीतून आज प्रेरणा घेऊन आत्ताच्या काळाशी सुसंगत गोष्टी करणं एवढं कठीण आहे का? बरं राजकारण्यांचं ठीके त्यांना त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी तुम्हाला भूतकाळात रमवून, भावनांचं, अस्मितांचं राजकारण करणं गरजेचं आहे. असं केल्यानं लोकोपयोगी ठोस कसलीही कामं नाही केली तरी त्यांना त्यांची दुकानं चालवता येतात पण तुमची चूल कशी चालणार? तुमच्या आई-बाप, लेकराबाळांसाठी कोण झटणार?

मायला मोठा लोकप्रिय नेता होण्यासाठी विशेष काहीही काम न करता सतत फक्त आदर्श व्यक्तिमत्वांचा जयघोष करत रहायचं, पुतळे, स्मारकं उभी करायची ते करताना भाषा, प्रांत, धर्म नि जातीपातीचं राजकारण करायचं आणि तुम्हाआम्हालाही त्यात गुंतवून ठेवायचं ही ढोबळ पद्धत होऊन गेलेलीये आपल्याकडे. शाहूफुलेआंबेडकरशिवाजीसंभाजीटिळकगांधीसावरकर यांनी कोणाला अमुकतमुक माझे आदर्श/देव आहेत म्हणत हारतुरे घालून पुजत बसल्याचं ऐकीवात तरी आहे का? त्यांनी वेळ घालवला का या असल्या गोष्टीत? त्यांनी हेच केलं असतं तर आज आपलं आयुष्य कसं असतंय याचा विचार करुन बघा.

कोणीतरी काहीतरी बरळतो आपला माथा भडकतो, मरण्या-मारण्याची, कापण्याची, उडवण्याची भाषा, हातात दगड लाठ्या काठ्या हे सगळं क्षणात चालू होऊन जातं. कोणाही उपटसुंभानं आपल्या थोर व्यक्तीबद्दल अपशब्द उच्चारल्याने काहीही होत नसतं. ते सगळे सूर्य आहेत, वर तोंड करुन कोणी सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केल्यानं काय होतं हे वेगळं सांगायला हवं का?

हे सगळे थोर लोक थोर होतेच याबद्दल कणमात्रंही शंका किंवा दुमत असूच शकत नाही, कोणीही ते नाकारु शकत नाही आणि नाकारल्यानं काही फरकंही पडत नाही... आज जर का शिवाजी फुले आंबेडकर सावरकर टिळक असते तर त्यांनी काय केलं असतं? ते आमचा एक युगपुरुष होऊन गेला म्हणून ढोल बडवत नसते बसले, रीसर्च-डेव्हलपमेंटमध्ये आपला देश पुढे कसा जाईल, नवनवे शोध कसे लावता येतील, लोकहितवादी गोष्टी कशा करता येतील, बाल्मृत्यू दर कमी कसा करता येईल, साक्षरता कशी वाढवता येईल, रोजचं जगणं कसं सोपं करता येईल यावर विचार केला असता, कृती केली असती. आपापल्या महापुरुषांची वाटणी करुन फुले आमचे टिळक तुमचे, गांधी तुमचे सावरकर आमचे असले धंदे करत बसले नसते.

ओशोच्या एका उताऱ्यातली एकंच ओळ आठवतेय,  पूर्ण आठवत नाहीये आत्ता पण ती एक ओळंही बेस्ट होती. "आय नो ओल्ड इज गोल्ड बट नाऊ टेक न्यू गोल्ड"
आपण कधी नवं गोल्ड घेण्याचं धाडस करणार आहोत? आपण कधी जागे होणार? कधी आपण पुढचं पाऊल टाकणार? किती दिवस आपण दिवसागणिक मागे मागे मागेच चालत राहणार?


केपी आर

Friday, February 16, 2018

नीरव मोदी व्हाया नेहरु


माननीय परंपूज्य श्री श्री श्री नीरव मोदीजी  यांचा जन्म जरी १९७१ साली झाला असला तरी पण वास्तविक पाहता मोदीजींना पंजाब नॅशनल ब्यांकेकडून रुपये ११,३०० कोटी (फ....क्तं) चे कर्ज सन १९४० सालीच नेहरुंच्या सांगण्यावरुन देण्यात आले होते. हे कर्जप्रकरण ब्यांकेच्या संचालक मंडळापुढे आल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी या प्रकरणास कडाडून विरोध केला होता पण त्यावेळी मोटाभाई मोदी शेट नसल्यामुळे लोकांना सरदार पटेलांची खरी किंमत कळली नव्हती आणि म्हणूनंच असले राष्ट्रहितविरोधी निर्णय घेणाऱ्या नेहरुंना लोकांनी उचलून धरले होते. पुढे जाऊन आपला देश आणि पर्यायानं देशाच्या नागरीकांना या निर्णयाची भयंकर झळ पोहचू शकते, नव्हे तशी ती पोहोचेलंच याचा अंदाज आल्यानं सरदार पटेलांनी जीवाच्या आकांताने, प्राणपणाने या सगळ्याला विरोध केला पण भ्रष्ट लोक आणि चोरांना पाठीशी घालण्याची सवय असलेल्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या प्रभावाखाली येत नेहरुंनी देशाला आर्थिक संकटात टाकणारे अनेक निर्णय घेतले त्यातलाच हा एक निर्णय होता.

नेहरु, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी यांचा कारभार सुरु होण्याआधीच त्यांच्या कारभाराला कंटाळून सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, पटेलांनी त्यांना जोरदार पाठींबा दिला पण त्यांच्या दुर्दैवाने मोटाभाईचे उजवे का डावे हात आमितभाई शहा यांना काँग्रेसने कटकारस्थान करुन गुजरातमध्ये येण्यास मज्जाव केला होता त्यामुळे ते सुभाषबाबूंना काही मदत करु शकले नाहीत. होमग्राऊंडवर ब्याटींग करु देत नाहीत म्हणजे काय. तर या सर्वांनी प्राणपणाने नेहरु आणि काँग्रेसविरुद्ध आघाडी उघडूनंही त्यावेळेस हट्टाला पेटलेल्या नेहरुंनी माननीय परंपूज्य श्री श्री श्री नीरव मोदीजी यांना तब्बल रुपये ११,३०० कोटीचे कर्ज दिले आणि आज माननीय निरागस, निष्पाप नरेंद्रशेट मोदी यांच्यावर नालायक विरोधक चिखलफेक करतायेत...

शोधपत्रकारीतेचे वर्ग घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहनकाकांनी स्वतः पी.टी.आय.च्या त्यांच्या "वैयक्तिक शाखेतून" जीवावर उदार होत सन १९४९लाच ही बातमी बाहेर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण तात्कालीन पक्षपाती सरकार, पंतप्रधानांमुळे ते करणे शक्य झाले नाही. पण त्यावेळेस मोहनकाकांनी पी.टी.आय.च्या "वैयक्तिक शाखेत" करुन ठेवलेल्या नोंदी धक्कादायक असून त्यातली एक गोपनीय नोंद माननीय एडवर्ड स्नोडेन यांच्या सहाय्याने आम्ही आपल्यासमोर आणत आहोत. त्यामधला मजकूर काहीसा असा होता.

नीरव मोदींचे प्रस्तावित कर्जप्रकरण संचालक मंडळापुढे आल्यानंतर सरदार पटेल आणि नेहरुंमध्ये त्यावरुन खडाजंगी झाली आणि तुम्ही हे कर्ज देण्यासाठी एवढे का हट्टाला पेटला आहात असे सरदार पटेलांनी विचारले असता नेहरुंनी धक्कादायक उत्तर दिले, "ते काय का आसंना, मला नीरवला कर्ज देयचच्चे म्हंजे देयचच्चे कारन २०१४ मदी येनारं मोदीशेटचं सरकार मला २०१८ मदी गोत्यात आनायचंय, बाकी सगळं गेलं खड्ड्यात". असं ऐकिवात आहे की नेहरुंच्या या ऊत्तरानंतर पटेल आणि त्यांच्यातली दरी वाढतंच गेली आणि देशाची त्यानंतर झालेली अधोगती आपण अनुभवत आहोतंच.


(शेट तुम्ही आगे का काय म्हणतात ते बढत र्हावा ओ, तो यज्ञ करा सगळीकडची माती गीती आनून लालकिल्ल्यावं, हे उगं नीरव मोदी विजय मल्ल्या गिल्ल्या असल्या फालतुक बातम्यात वेळ घालवू नका तुमचा.)

केपी आर


Tuesday, February 13, 2018

व्हॅलेंटाईन डे


कॉलेजात असताना आमचा एक दोस्त होता. मुंगेरीलाल आणि त्याच्यात फार म्हणजे फार्फारंच साम्यं होतं. तर या आमच्या मुंगेरीला कॉलेजातली प्रत्येक पोर्गी त्याच्या मागे हातंच काय तर हात पाय नाक तोंड सग्गळं सग्गळं धुवून मागे लागलीये असं वाटायचं. त्याचं स्वतःचं असं एक कल्पनाविश्व होतं, ह्यॅटतेच्यायला कल्पनाविश्व म्हणण्यापेक्षा भ्रामकविश्व होतं. कॉलेजातली कोणतीही पटाख्खा पोर्गी ही कशी त्याच्या मागं लागलीये, कितीवेळा कधीकधी कोणीकोणी त्याला फोन केले, ब्लँक कॉल मारले, रात्रीअपरात्री मेसेजेस केले निनावी पत्रं आणि ग्रिटींग कार्ड्‌स दिले याच्या सुरस कथा ऐकायला लै मजा येयची. पहिल्या वाक्यात आम्हाला कळलेलं असायचं की थापा चालू झाल्यात पण आमच्या कपाळावर बोल्ड आणि क्यापिटलमध्ये "चुतिया" लिहिलं असल्यासारखं हा आम्हाला स्वरचित कथा आणि मनाचे श्लोक ऐकवत बसायचा आणि आम्ही मोठ्या भक्तिभावानं त्याच्या या प्रवचनाचा परमानंद घेतंच रहायचो.
सगळ्या मित्रांकडे तेव्हा मोबाईल फोन नव्हते, तुरळक चार-दोन टाळक्यांकडे मोबाईल असायचा. एकेक करत प्रत्येकजण फोन घेऊ लागला आणि ज्याने कोणी नवीन फोन घेतला असेल त्याच्या फोनवरुन आम्ही मुंगेरीलालला मेसेज आणि मिस्‌ड कॉल मारायचो. तो तेच मेसेजेस आम्हाला दाखवायचा आणि प्रत्येकवेळेस कॉलेजातल्या वेगवेगळ्या पोरींची नावं सांगायचा. बघ अमुकनी मेसेज केला, बघ तमुकनी मिस्ड कॉल मारला. वास्तविक पाहता हे मेसेजेस आणि मिस्ड कॉल आम्हीच त्यावेळेसंच मारलेले असायचे.
एकदा असंच एका मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो असताना तिकडे दुसऱ्याच मित्राचा लहान भाऊ भेटला. बरं तेव्हा मोबाईल फोन घेणं ही एक बातमी असायची. लहानपणी जसे नवे कपडे घेतले की ते नवे कपडे घालून ताबडतोब शेजारीपाजारी चक्कर टाकून सगळ्यांना नवा ड्रेस घेतला, कसाय? असं सांगत, विचारत फिरायचो तसं त्याकाळी मोबाईलबद्दल होयचं. तर तो मित्राचा लहान भाऊ भेटल्या भेटल्या लै कौतुकानं माझ्यासमोर मोबाईल नाचवत म्हणाला, "कुण्या नवीन घेतला". अरे वाह म्हणता म्हणता माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. एव्हाना आमच्या जवळपास सगळ्या मित्रांनी फोन घेऊन झाले होते आणि आपापले नंबर एकमेकांशी शेअरही करुन झाले होते त्यामुळे मुंगेरीला मेसेज आणि मिस्ड कॉल देण्यासाठी नवा फोन नंबर मिळणं दुरापास्तं झालं होतं. मित्राच्या भावाचा फोन बघितल्या बघितल्या नवा खजाना गवसल्यागत आम्ही खुश झालो. त्याला नीट समजावून सांगत हजारदा बजावलं आत्ता मी एक मेसेज तुझ्या फोनवरुन करणारे तर त्याला रीप्लाय आला किंवा त्या फोन नंबरवरुन परत कॉल आला तर रीसिव्ह करायचा नाही किंवा एखाद्या मुलीला बोलायला लावायचं. बर, लग्न होतं १४ फेब्रुवारीला... "व्हॅलेंटाईन डे" वगैरेचं तेव्हा लै अप्रुप. मग आम्ही मेसेज टाईप केला, "विल यू बी माय व्हॅलेंटाईन" आणि परत करकच्चून ब्याकस्पेस हाणून आख्खा मेसेज डिलीट हानला आणि मेसेज टाईप करुन गप्पकन्‌ सेंड केला... "हाय हँडसम". डिलीव्हरी रीपोर्ट येतो न येतो तोवर जेवणाच्या रांगेतून आपला आलेला नंबर सोडून मुंगेरी धावतपळत आम्हाला शोधत आला, मला बाजूला ओढून नेत मोबाईलवरचा मेसेज हळूच दाखवला, "हे बघ, तिच पाठौवतीये परत"
कोण ती
तीच रे, ती मुंबैची
आ.... य.... ला, ती... घंटा कोण ते न कळताही जस्काय दिवसरात्र तिच्याबरोबर असल्यागत माझी प्रतिक्रीया
मग, किती दिवस तुला सांगत होतो, तुझा विश्वासंच नाही
विश्वास नाही असं कुठे झालंय काय, आमच्याबाबतीत असलं काय होत नसतंय म्हणून जरा वेगळं वाटतंय रे
हसू दाबत दाबत हा गंभीर संवाद चालू असेपर्यंत मित्रांनी दुसरा मेसेज टाकला
कॅन आय बी यो’र व्हॅलेंटाईन, हँडसम
तो मेसेज स्क्रीनवर दिसला न दिसला तोवर मी बोभाटा केला.
एय, आयला... कसले मेसेज यायलेत बघितलात काय दाद्याला... सेलिब्रीटी झाला आयच्या गावात. आपण मरायलो, झुरायलो पोरीशी न बोलताच आन हितं दादूला कनाकन मेसेज यायलेत व्हॅलेंटाईन डेचे.
एय गप गप, ओरडू नको असं उगंच म्हणत मुंगेरीनं फोन खिशात ठेवायची फक्त अ‍ॅक्शन केली.
सगळे कार्यकर्ते जमून, त्याच्याबाजूनं कोंडाळा करुन यथासांग त्या मेसेजेसचं जाहीर वाचन झालं, मग मोबाईल खोदून खोदून आम्हीच पाठवलेल्या मागच्या मेसेजेसचं जाहीर वाचन झालं. मुंगेरी खुश होऊन होऊन लालेलाल झाला. ग्रुपमधल्या प्रत्येकानं त्याला जमल तेवढा हरभऱ्याच्या झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीच्या सगळ्यात वरच्या पानाच्या वर चढवला, एवढा चढवला की त्यानं आम्हाला सगळ्यांना खुशी खुशीत त्या रात्री आईस्क्रीम खायला घातलं.
आईस्क्रीम खाता खाता, आयला दादू काय हिरोए राव असल्या कचकून चर्चा पार पडल्या, हसू दाबून धरण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले पण तरी दादू सातवे बितवे सोडा तेच्यायला लैच वरच्या कोनच्यातरी आस्मानात पोचलावता त्यामुळं त्याला आमचं हसणं नोटंच नाय झालं.
मग कोणतरी म्हणलं, थांबे च्यायला ही कोने ते मला बघैचंच्चे.. फोन लाव त्या नंबरला.
चुतिया ए का रे, पावणे बारा झाले रात्रीचे, एवढ्या रात्री पोरीला फोन लावतात होय रे, अक्कल चालव जरा
एवढ्या रात्री पोर्गी मेसेज करु शकती, आपण फोन नाय लावू शकत होय
मला म्हायतीये ती कोने सोड आता
काय म्हायती तुला, वायझ्येड, पोर्गी ए का पोर्गा ए हे पन म्हैत नसलं, म्हणे कोने ते म्हैतीये
अरे कालंच कॉलेजात भेटलीवती, म्हनली मी सगळ्यात हँडसम मित्राला प्रपोज कर्नारे उद्या
मंग तर नक्कीच ती नाय्ये. हँडसम म्हनलीये बे ती
भाड्या, आयस्क्रीम संपत आल्यावर लक्षात आलंय होय रे हँडसम म्हनलीये म्हन्जे मी नसंल ते
तू नाय रे, ती नसल पलिकडं.. फोन तर लाव.
अबे, कालंच सांगितलं होतं तिनी, उद्या दिवसभरात त्यानंच प्रपोज नाय केलं तर मी त्याला बरोबर साडे नौ वाजता एसेमेस कर्नारे म्हणून. मोबाईलमधला पहिल्या मेसेजचं टायमिंग चेक करता करता आमच्या माहीतीत त्यानी भर घातली.
कोणी त्याच्या बाजूने कोणी विरोधात बोलायचं असं आमचं तंत्र होतं. मग तो जोशात तो बोलतोय तेच कसं खरंय हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.
आम्ही मग शेवटी दोन्दोन मस्तान्या हानून कबूल केलं की होय तो "ती"चाच्च मेसेज होता. दादूला व्हॅलेंटाईन मिळ्ळ्याबद्दल कडकडून मिठ्या हाणल्या, काँग्रॅच्युलेट केलं आणि घरी गेलो.
दादू मग मुंगेरीलाल के हसीन सपने बघत झोपला आणि आम्ही नवा नंबर शोधत बसलो त्याला पुढचा मेसेज करण्यासाठी.

लै भारी होते राव ते दिवस, लाल भडक कपड्यात फिरणारे कपल्स, एफ्सी रोडवर जमलेली जंता, त्यात आमच्यासारखे मित्राला खोटीनाटी गर्लफ्रेंड मिळवून देऊन पार्टी झोडणारे आणि हात चोळत बसून डोळे शेकणारे निम्मे आर्धे मेक्यानिकल इंजिनिअरींगचं उपाशी मित्रमंडळ, काहीच नाही जमलं तर बघंय भावा ती तुझ्याकडेच बघायली म्हणून एखाद्याला खुश करुन गेला बाजार रीलॅक्स्ची कॉफी किंवा दुर्गाची कोल्ड कॉफी पदरात पाडून घेणारे मित्र, शाळेतल्या मैत्रिणीला पुढच्या व्हॅलेंटाईनला प्रपोज करायचाच म्हणत झुरत बसणारा एकेकजण, नीट दाढी येत नसतानाही तिच्यायला तिला मनातलं सांगायच्याआधीच तिचं लग्नं ठरलं म्हणून मित्रांच्या घोळक्यात खुरटी दाढी वाढवून देवदास बनून मी लै लेट केला रे बोलायला, तिला मीच आवडायचो म्हणत नसलेल्या आठवणी सांगणारे कार्यकर्ते.... पुढच्या व्हॅलेंटाईनला मी तुमच्यात नाय रे तिच्याबरोबर असेन म्हणून टेर बडवून खुश होणारे, ती आपल्याला घंटा हो म्हणत नाही हे माहिती असतानाही एय वैनीये तुमची म्हणून मिरवणारे, त्यांच्या भावना दोस्तांपलिकडे तिच्यापर्यंत तर सोडाच पण तिच्या कुत्र्यापर्यंतही कधी न पोहचवू शकणारे दोस्त, व्हॅलेंटाईन डेची ग्रिटींग कार्ड आर्चिस आणि हॉलमार्कमधून घेऊन कपाटात ठेवणारे, यश चोप्राच्या पिक्चरमधल्या पुरनमासी को व्हॅलेंटाईन डे आला तर लै मोठा योग असतो मानणारे सगळे, आयला किमान ब्रेक‌अप होण्यासाठी तरी तिनी हो म्हणू दे म्हणजे तेरे नामची गाणी मनापास्नं म्हणता येतील असा विचार करणारे महाभाग वगैरे आणि थंड हवेत उडणारे उंचंच उंच लाल रंगाचे फुगे....आणि एका अर्थाने सगळ्यांचेच मुंगेरीलाल के हसीन सपने.

गर्लफ्रेंड नव्हती तेव्हाचे व्हॅलेंटाईन्डेच खरे बेस्ट होते... ती हुरहुर आता परत नाही...

केपी आर

Wednesday, February 7, 2018

प्रपोज डे

मागच्या वर्षी मित्रासोबत कामानिमित्त लातूरला गेलो होतो एक दिवस. मित्राने आदल्या दिवशीच बजावून बजावून सांगितलं होतं की काहीही झालं तरी सकाळी सहा-सव्वा सहाला हडपसरला ये, तिथे तुझी गाडी लावून माझ्या गाडीतून आपण जाऊया. माझ्या लौकिकाविरुद्ध वागत मी कधी नाही ते ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी पोहचून मित्राची वाट बघत उभारलो होतो. पाचेक मिनिटांत हा पठ्ठ्या आला, गाडीत त्याच्या शेजारच्या सीटवर आणखी एक माणूस बसलेला होता. मी मागचं दार उघडत असताना मित्र म्हणाला, "ए कुण्या तू पुढे ये रे, मामा आता तू मागे बस". मी पुढे जाऊन बसेपर्यंत मित्राने ओळख करुन दिली, हा माझा मामाए. आमची नमस्काराची देवाण-घेवाण होयच्या आत तो म्हणाला याचंही लातूरला काम आहे, म्हटलं चल माझ्याबरोबर तसंही आपण दोघंच तर चाललोय, नाय का?

सक्काळच्यापारी हडपसरवरुन आमची गाडी पुढे निघाली तेव्हा गाडीत पहिलंच गाणं लागलं, "लगी आज सावन की फीर वोह झडी है", आयच्या गावात ते बाजीगरमध्ये जॉनी लिव्हर नाही का जेवणाआधीच दिलीप ताहीलला गरम पाण्यात लिंबाचे तुकडे टाकून आणून देतो तसं वाटलं. जे गाणं परतीच्या ओरवासात रात्री वाजवून माहौल बनवायला पाहिजे ते गाणं सकाळच्यापारी लागल्यानं सुरुवातंच शेवटापासून झल्यासारखं वाटायला लागलं होतं. कुण्या पाहिजे तर गाणं बदल असं अभयनं सांगताच पडत्या फळाची आज्ञा म्हणत मी पटकन गाणं बदललं. सकाळी ऐकण्यासारखी सुरेश वाडकरांची कित्येक सर्वांगसुंदर गाणी असताना प्रवासाच्या सुरुवातीलाच आयुष्यात काही राम न राहील्यासारखं मला "लगी आज सावन की फिर वोह झडी है" ऐकण्यात काडीमात्र इंटरेस्ट नव्हता. मी गाणं बदलत असताना मामाचा चेहरा एरंडेल पिल्यागत झाला होता, ए अरे असू दे की असं दबक्या आवाजात सांगणाऱ्या मामाला मी पटकन म्हणालो ओ मामा हे गाणं रात्रीसाठी राखीवंय. काय लका गाण्याला काय वेळापत्रक असतंय होय म्हणत मामानं आपला निषेध नोंदवायचा अयशस्वी प्रयत्न केला तोवर पुढच्या गाण्याचं म्युझिक चालू झालं होतं.

आरं तेच्यायला हे रीमिक्से की गड्या, जुनंच चांगलं होतं असं मामा म्हणतो न म्हणतो तोवर अभय म्हणाला, गपंय मामा, तुला काय कळत नाय, लै भारी केलंय रिमिक्ससुद्धा. गाणं कोणाचंय हे तरी म्हायतीये का?
ए.आर. रेहमान
श्रद्धा कपूरचंय लका, रयमान म्हने
येड्या हे रिमिक्स होय, ते पण रेहमानचंच्चे, आनि हिरो हिरोईन म्हनशील तर ओरीजिनल गान्यात अरविंद स्वामी, सोनाली बेंद्रे आणि मनिषा कोईराला होते. तसं हे रिमिक्ससुध्दा रेहमाननीच केलंय. कळली तुझी अक्कल गाणं हिरो-हिरोईनचं असतंय मग गीतकार, संगीतकार, गायक बियक काय भजे तळायला असतात होय रे?
अभय मुस्काटात जोडा हाणल्यागत तोंड करुन गप बसला.
मामाचं आपलं चालूच होतं, ओरीज्नल हंमा हंमा लै मस्तं होतं राव, बाँबे पिक्चरंच बेस्ट होता, पंच्याण्णव साली आल्ता. तो आपला अरविंद स्वामी हिंदू पोरगा असतो, त्याला मनिषा कोईराला मुस्लिम पोर्गी आवडलेली दाखौवलीये. बाबरी मशिद पाडल्यानंतर मुंबैत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम लव श्टोरीवर होता पिच्चर. मनिरत्नम डायरेक्टरंय आणि रामलखनवाला सुभाष घै निर्माता होता. मामाचं बॉलीवूडबद्दलचं ज्ञान अगाध होतं, अधून मधून चूका होत होत्या पण त्या तो काँफिडंटली ठोकत असल्यानं लक्षात येणं कठीण होतं.
ओ मामा, सुभाष घई नाही काय झामु सुगंध होता ओ निर्माता, मी मामाचा टेंपो बिघडवत मामाला सांगितलं.
ए नाय राव मला चांगलं आठवतंय, सुभाष घईच होता, मी सांगलीला बघितला होता पिक्चर, विसरणार नाय मी. मामा मात्र त्याच्या माहितीवर ठामंच होता.
दाद्या आमच्या मामाला पिक्चरच्याबाबतीत चॅलेंज करु नको काय, लै दर्दी माणूस ए. अभयला जास्तं काही माहीत नसल्यानं त्यानं आपलं एक जनरलाईस्ड वाक्य हाणून दिलं.
आण्णा आपण काय कमी दर्दी ए का? निर्माता सुभाष घई नव्हताच, मला चॅलेंज करतो म्हणजे काय अशा अविर्भावात मी पण एक वाक्य चिकटवलं
लाव शर्यत च्यायला सुभाष घईच होता.
मामा हारणार राव तुम्ही कशाला पैज लावताय उगं
नाय राव शंभर टक्के ग्यारंटीए मला, मी हारलो तर आजचं जेवण माझ्याकडनं तुम्हाला. मामासुद्धा आता ईरेला पेटला होता.
मी शांतपणे मोबाईल बाहेर काढून गूगलवर बॉम्बे’ज प्रोड्युसर टाईप करताच झामु सुगंधचं नाव स्क्रीनवर आलं. मी मोबाईल मामा समोर नाचवत म्हणालो मामा कुठल्या हॉटेलात नेणार जेवायला. जेवायला काय म्हणशील तिकडं जाऊ की पण हे गुगल बिगलंच कायतरी चुकतंय राव असं हळूच म्हणत मामानं पराभव मानण्यास परत एकदा नकार दिला. विषय अजून न ताणता मी मोबाईल खिशात ठेऊन दिला तोवर अभय म्हणालाच एय मामा हारलायेस लका मान्य कर की आणि तिच्यायला सारख्याला वारखे मिळालात आज तुम्ही.

मी हसत हसत गाणं बदललं.
उदीत नारायणच्या आवाजातलं तुमही हमारी हो मंझिल माय लव्ह लागलं तसं मामा म्हणाला हे कोणत्या पिक्चरमधलंय सांग अभ्या.
एय तसलं मला काय कळत नाय, ते तुम्ही दोघं बघून घ्या, ओळखा ओळखी, शर्यत पैज आयला.
मामा यारा दिलदारा मधलंय, मी निर्विकार चेहऱ्यानी उत्तर दिलं
हां पर्फेक्ट, यातलं अजूनेक गाणं लै फेमसे कोणतं सांग तर मानलं तुला.
बिन तेरे सनम मर मिटेंगे हम आ मेरी जिंदगी
ए दुनियेचा भारी दोस्तंय लका अभ्या तुझा, लै दिवसानी आसलं कोनतरी भ्येटलंय म्हणत मामानी टाळीसाठी हात पुढे केला, मी मामाला टाळी देत खळखळून हसलो.
बाकी मामा होता मात्र खरंच दर्दी, एकेक गाणं, गायक, संगीतकार, हिरो हिरोईन सगळ्यावर चर्चा करायचा. गाणं कोणतंही असो मागच्या गाण्याएवडाच खुश होयचा तो. आणि त्या गाण्याचा पिक्चर कसा बेस्ट होता, कास्ट काय होती, कुठे बघितला वगैरे आठवणी डिटेलवार सांगायचा. गाणं लागलं रे लागलं मामा विचारायचा सांग कोणत्या पिक्चरमधलं गाणंय? आपण सांगायचं मामा त्रिदेव
आवाज कोणाचाय?
मोहम्मद अझिज

आम्हाला दोघांनाही सिनेमा आणि गाण्यांसाठी दुसरा एक्वली येडा माणूस भेटला म्हणून परमानंद झाला होता. मधे नाश्त्याला वगैरे थांबल्यावरंही आमची चर्चा थांबत नव्हती. एका गाण्यावरुन दुसरं, एका सिनेमावरुन दुसरा आमचं आपलं चालूच होतं. मधेच मामा विचारायचा काय रे तू अफसाना प्यार का बघितलायेस का?
टीप टीप टीप टीप बारीश शुरु हो गयी गाणंवाला का? आमिर खान आणि नीलम ए त्यात
हां... तोच. मला लै आवडायची राव नीलम. मी गावाकडं विडीओ पार्लरमध्ये बघितला होता तेव्हा.
ऐंशी नव्वदच्या दशकातले पिक्चर आणि गाणी वीकपॉईंट होते मामाचे. गोविंदा, सनी देओल, संजय दत्त, रोनित रॉय, सुमित सैगल, अविनाश वधावन, विवेक मुशरन, मिथुन, अनिल कपूर वगैरे हिरो, त्यांचे पिक्चर, गाणी, गायक, संगीतकार वगैरे बद्दल मामा एखाद्या जुन्या मित्राबद्दल बोलावं तसं जाम आत्मीयतेने बोलत होता. या सगळ्याशी त्याचा जाम स्ट्राँग कनेक्ट आहे हे त्याच्या प्रत्येक वाक्यातून जाणवत होतं. एखादं माणूस नॉस्टॅल्जिक होतं म्हणजे नेमकं काय होतं याची देही याची डोळा अनुभवत होतो मी. कोणी एखाद्या गोष्टिबद्दल भरभरुन बोलत असलं की मला ऐकतंच रहावंसं वाटतं. गुगल बिगल येयच्या आधीचा रसिक माणूस, पिक्चरबद्दल सगळी माहीती त्याच्या डोक्यात साठवलेली होती आपल्यासारखं क्रॉसचेक करायला त्याला खिशातून फोन काढून गुगलवर जायला लागत नव्हतं. सिनेमाच्या चालत्या बोलत्या एनसायक्लोपिडीयासोबत प्रवास करताना जाम मजा येत होती.

थोड्यावेळानं सिनेमा गाणी यावर भरपूर बोलून झाल्यावर मी मामाला म्हणालो, मग मामा लातूरला काय काम काढलं आज?
काय विशेष नाही रे बाबा, अभ्याची गाडी रीकामी चाल्ली होती म्हणलं जाऊया, जुने मित्र भेटतील तेवढेच, म्हणून आलो.
अभय हसला म्हणाला, आमचा मामा येडाय जरा त्याच्याकडं लक्ष नको देऊस. तुम्ही आपले पिक्चर गाण्यांच्या गप्पा मारा त्यापेक्षा.
मामानं तळहातावर तंबाखू मळता मळता पुढचं गाणं गुणगुणायला सुरुवात केली, मोहब्बत ईनायत करम देखते है. मी नेहमीचा प्रश्न फेकला, सांगा मामा कोणता पिक्चरंय हा. यारा दिलदाराय लका मळलेली तंबाखू ओठामागं दाबून हात झटकत झटकत बोलला मामा. परत चुकलात राव, बहार आनेतकंय हा, सुमित सैगलचा मी जास्त कोडी न घालता सांगून टाकलं. आयला हो की रे, रुपा गांगुली होती याच्यात माहीतीये का अभ्या मामानं प्रश्न विचारण्यासाठी सेफ टार्गेट निवडलं. ए तेच्यायला राव मला कळत नाय, मला नका काय विचारु कितीवेळा सांगायचं तुम्हाला, नसल जमत तर च्यायला खाली उतरा आणि एश्टीनी या दोघं. ह्याटतिच्यायला चिडतो कशाला, आपली महाभारतातली द्रौपदी रे म्हणत मामानं खिशातला मोबाईल काढून मित्राला फोन लावला.
कुठंय रे? हाय ना लातूरात? हा मी येतोय.. अभय किती वाजता पोचू रे आपण? आरे बाबा दिड वाजेपर्यंत येतो. थांबतो की चार साडेचार-पाच पर्यंत वेळ आहे माझ्याकडं
एय मामा आज परत जायचंय पुन्याला, साडेचार-पाच वाजवायचे असतील ना तर ये एश्टीनी तुझा तू. आयला एकतर बारा साडेबारा पर्यंत पोचू म्हणलं तरी मित्राला सांगतोस दिड दोन वाजतील. आमचं काम झालं की आम्ही निघणार हायवेवर नाय भेटलास ना तर तुला फोन पण करायच्या फंदात नाय पडनार हा आधीच सांगतोय.
ए अभ्या थांबशील रे... आजच्या दिवस कर की अ‍ॅडजस्ट.
तसलं काय होणार नाय आ मामा म्हणत अभयनी गाडी अजून जोरात पिटाळली

पुढच्या प्रवासात परत आम्ही भरपूर गप्पा मारल्या, गाणी म्हटली. आजंच दोन तासापूर्वी आपली ओळख झालीये असं बिलकुल वाटत नव्हतं. लातूर येईपर्यंत मामानं साताठ फोन ट्राय केले पण एकतर लागले नसावे किंवा कोणी रीस्पाँड केलं नसावं कारण त्याचं बोलणं एकाच फोनवर झालं. हायवेवरच्या चौकात त्याला ड्रॉप करुन अभयनी परत एकदा मामाला डेडलाईनची आठवण करुन दिली, मामा परत एकदा म्हणाला ए अभ्या असं नको करु राव, कर की माझ्यासाठी अ‍ॅडजस्ट... आधीच सांगतोय थोडा वेळ लागला तर थांब मी तुझ्याबरोबरंच परत येणारंय.
गाडी काढता काढता अभय म्हणाला यडाय आमचा मामा, बायकोबरोबर भांडण झालेलंय त्याचं, ती राहती हितं त्याला सोडून. तिला भेटायला आलाय, म्हणतोय तिला समजवून सांगतो ये म्हणतो परत पुन्याला. ती काय याला दाद देत नसती, तीन साडेतीन वर्ष झाली रे आता वेगळं रहायला लागून, आता काही नसतंय होत. उगं तुझ्यासमओर बोलायला नको म्हणून मित्रांना भेटायला आलोय म्हणत होता तो मगाशी. अभयनं थोडक्यात सगळं सांगेस्तोवर कस्टमरच्या दारात पोहोचलो होतो आम्ही. पुढचे तीन-चार तास कामात मामाचा विषयंही नाही झाला. कस्टमरशी बोलताना उलट मामाचाच दोन-तीनदा फोन येऊन गेला पण अभयला उचलता नाही आला. आम्ही काम उरकून हायवेवर येयच्या एक तास आधीच मामा ठरलेल्या ठिकाणी येऊन थांबला होता. गाडीत बसता बसता "भ"वर विशेष जोर देत मामानं शिवी घातली, भेंsssचोद, दिग्या आलाच नाय रे गैबाना, तिच्यायला दिड तास वाट बघितली. पुढचे दोनेक तास मामा अधून मधून गाणी पिक्चरवर गप्पा मारत आणि अधून मधून जशी आठवण येईल तशी दिग्याला कचकून शिव्या घालत राहीला. मधेच म्हणाला राव सकाळी म्हणला होतास की हे रात्रीचं गाणंय लाव की लका आता. लगी आज सावन की फिर वोह झडी है गाणं शेवटी मामानं सुरेश वाडकरसोबत डोळे झाकून पूर्ण म्हटलं. गाणं गाता गाता मधेच मला म्हणाला, बरोबरंय लका तुझं, रात्रीचंच गानंय हे, माहौल बनला एकदम...आणि गाणं कंटिन्यू केलं कभी टूटकर चीज कोई जुडी है.

एय भेटली का नाय ती, पिक्चर गाण्याशी काही घेणदेणं नसल्यानं माहौल ब्रेक करत अभयनं डायरेक्ट मामाला विचारलं.
खिडकीतून बाहेर एकसंध गिरवलेला अंधार बघत मामा म्हणाला नाय ना राव
अरे तेच्यायला ती पण नाय दिग्या पण नाय मंग केलं काय तू ईतका वेळ?
अरे अभ्या लका लै वेळा फोन लावला तिला पण नुसतं टूंग टूंग वाजतंय, ना एंगेजंय ना स्विचॉफंय. काय समजंना लका.
आरे येडाय का रे मामा तू? नंबर  बदललाय म्हणजे तिनी, कितीदा सांगायचं तुला दे की नाद सोडून
आरे असा कसा नाद सोडू अभ्या, माझं पोरगं पण ए रे तिच्याबरोबर
मंग काय करणार तू... ते जाऊ दे आज काय करायचं म्हणून आल्तास सांग
आज... आजनंतर मोठा पॉज घेऊन मामानं बोलायला सुरुवात केली.
आज पोरासाठी बायकोचे पाय धरायला लागले तरी चालंल या हिशोबानं आल्तो राव
मंग पकडले का?
आरे भ्येटलीच नाय सांगितलं ना तुला
येडाय तू मामा
अभ्या आठ वर्षाचा झाला श्रेयस मागच्या महिन्यात, आता तीनेक वर्ष झाली त्याला भेटून. ज्याला स्वतःच्या पोराला बघायला पण नाय मिळत ना त्यालाच कळू शकतं लका
अरे पन आज काय करायला आल्तास मामा आणि काय केलंस मंग
मी लका माघार घिऊन, माझीच चूकंय म्हणून तिला मनवायला आल्तो रे. आनि नसतंच ऐकलं ना तर किमान अधनंमधनं मी लातूरला येत जाईन पोराला तेवढं एखाद दिवस भेटू देत जा म्हणून रीक्वेश्ट करनार होतो लका
मंग क्येली का
तेच्यायला परत त्येच तुजं... फोन लागत नाय म्हनल्यावर तिकडं गेल्तो तिच्या घराकडं पण कुलूप होतं लका. थांबलो तिकडं कोपऱ्यावर आर्धा पाऊण तास कानोसा घेत. म्हणलं आली तर पाय धरु लागलं तर पण भ्येटूच आज. पण दिसली पण नाय रे.
मार खानारेस मामा एक दिवस तू नक्कीच, घरापाशी बिशी जाऊन उभा राहत जाऊ नको लका. तसं तर तिनी घर पन बदललं आसंल आता.
अभ्या तिथनं श्रेयसच्या शाळेपाशी गेल्तो. तिथं थांबलो बाहेर तीन तास, पोरगं दिसंल म्हणून. पण त्ये पण नाय दिसलं रे. मामा अभयचं ऐकून न ऐकल्यासारखं ट्रांसमध्ये बोलत राहीला.
आरे काय करनारेस बघून, आयला पोरगं तुला ओळखनार पन नाय आता.
आरे अभ्या पन मी ओळखतो की त्याला

त्यांचं हे बोलणं चाललेलं असताना मी फेसबूक ओपन केलं
कोणीतरी स्टेटस अपडेट केलं होतं
सारं काही जाणतेस तू
परत मी सांगायलाच हवं का
नजरेतल्या भावना वाचतेस तू
त्यांनाही शब्दात बांधायलाच हवं का
आज प्रपोज डे

लग्नानंतर दहा वर्षांनी परत एकदा स्वतःच्याच बायकोला योगायोगानं आजंच प्रपोज करायला गेलेल्या मामाला तिला प्रपोज करणं तर सोडाच पण ती साधी दिवसभरात दिसलीही नव्हती, तिचा बदललेला पत्ता, बदललेला फोन नंबरंही त्याच्याकडे नव्हता. शाळेच्या बाहेर उभं राहून डोळे भरुन पोराला फक्त बघावं म्हटलं तर शाळा सुटल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पोरात त्याला त्याचा लेक ओझरताही बघायला मिळाला नव्हता. फेसबूकवर प्रपोजल्सचा, शेरोशायरीचा पाऊस पडत असताना आज कसलासा प्रपोज डे आहे हे गावीही नसलेल्या मामाचं पॅच-अपचं प्रपोजल भेटेविना तसंच मनात साठून राहीलं.
आमची गाडी आंधार चिरत पुढे सरकत असताना गाडीतल्या म्युझिक सिस्टीमवर त्याच्या हिरोईनला न भेटता शाहरुखंही प्रपोज डेचे शेवटचे काही तास सार्थकी लावत एकतर्फी प्रपोज करत होता, तू हा कर या ना कर तू है मेरी किरन....

दिवसभर भरभरुन बोलणाऱ्या मामानी, आज बायकोशी काय बोलायचं याची मनातल्या मनात हजारदा तयारी केली होती, आता परत एकदा मनातल्या मनात परत तेच डायलॉग्ज म्हणत त्याने डोळे मिटले आणि पोरानं आपल्याला चुकून ओळखलंच तर त्याला देण्यासाठी म्हणून आणलेली दोन मोठी चॉकलेटं खिशात तशीच पडून राहीली तेव्हा आभासी जगात लोकं उद्याच्या चॉकलेट डेच्या तयारीला लागली होती

केपी आर

Saturday, February 3, 2018

पद्मावत व ती


प्रिय स्वरा
काहीही लिहियला सुरुवात करण्याआधी मला तुला हे सांगायचं आहे की मला एक अभिनेत्री म्हणून म्हणा की तुझ्या सिनेमांच्या निवडीसाठी म्हणा तू मला जाम आवडतेस. याव्यतिरीक्त तू वेळोवेळी जी सध्यपरीस्थितीवर बेधडकपणे मतं व्यक्त करतेस त्यामुळे मला तुझ्याबद्दल आतोनात आदर आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे यावेळेसही तू पद्मावत(ती) सिनेमा पाहून संजय लीला भंसाळींना जे पत्र लिहिलं आहेस (सौजन्य: द वायर) ते लिहिण्याचा आणि तुझं मत परखडपणे मांडण्याचा तुला अधिकार आहे असं मला १००% वाटतं. पण यावेळेस मी तुझ्या मताशी सहमत नाही हे ही तितकंच खरं. बरं पुढे जाण्याआधी हे ही स्पष्ट करतो की जसं तुला वाटतं की स्त्रीयांना जगण्याचा हक्क आहे तसंच मलाही वाटतं की त्यांना तो हक्क आहे आणि यासाठी नवरा जिवंत असणे/नसणे वगैरे कसल्याही अटी शर्ती असण्याचं काहीही कारण नाही.

मूळात मला तुझ्या पत्रातले वेगवेगळे मुद्दे पद्मावत(ती)शी न जोडता बघितल्यास कायमंच पटत आलेले आहेत. किंबहुना हे सगळे मुद्दे पद्मावत(ती) सारख्या तद्दन गल्लाभरु सिनेमाशी जोडणं मला पटलेलं नाही. काहीही करुन ओढून ताणून हे मुद्दे पद्मावत(ती)शी जोडण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय. तुझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीकडून हे असलं काहीतरी आलेलं असल्यामुळे त्याला माझ्यालेखी महत्व आहे. हा सिनेमा एका राणीच्या जीवनावर आधारीत आहे जिच्या आयुष्याचा शेवट हा जौहारने झाला. तिच्या जीवनावरचा सिनेमा काढताना दिग्दर्शकाने त्यातून जौहार वजा करुन कसा काय सिनेमा काढावा? तेरावं शतक आणि आत्ताचा काळ यात जमिन-आसमानापेक्षाही जास्त फरक आहे स्वरा, अगं तेव्हाच्या स्त्रियांची मानसिकता आणि आत्ताच्या स्त्रियांची मानसिकता यात फरक आहे, निश्चितंच आहे. बरं तुझ्या पत्राला उत्तरं देताना दोन्ही बाजूच्या (समर्थक आणि विरोधक) लोकांनी जौहार बरोबर की चूक यावर हिरीरीनं मतं मांडलीयेत पण मूळात जौहारचं समर्थन करण्याच्या प्रश्नंच येत नाही. आणि ते त्याकाळी बरोबर होतं का चूक यावर बोलण्याचा माझा उद्देशही नाही. आपल्याकडे ना लोकांवर संस्कार करण्याची, उपदेश, संदेश देण्याची वगैरे जबाबदारी कायम सिनेमावर का टाकली जाते ते कळत नाही मला. दोन वर्षापूर्वी आलेल्या सैराटवर अशीच चहूबाजूनी टिका झाली होती की यामुळे कुमारवयातल्या किंवा तरुण वयातल्या मुलामुलींवर वाईट संस्कार होतील. सिनेमा म्हणजे काय तीन तासाचा संस्कार वर्ग असतो का स्वरा, थिअटरमध्ये जाऊन  तीन तास उपदेश पिऊन लोक बदलून जायला? सैराटच्यावेळी हा सिनेमा प्रस्थापितांविरुद्ध आहे म्हणत हिरीरीने नागराज आणि पर्यायानं सैराटच्या बाजूने बोलणारे कित्येकजण आज तुझं पत्र वाचून मात्र पद्मावत(ती)ने चुकीचा संदेश दिलाय, चूकीच्या पद्धतीचं उदात्तीकरण वगैरे केलंय म्हणत गळा काढतायेत. हे जर खरं असेल तर आपण आपल्या लेकराबाळांना सगळ्या आदर्श सिनेमांच्या सीडीज आणून घरीच बघायला देऊ या की कशाला शाळेत वगैरे घालायचं किंवा आपण काहीतरी चांगलं शिकवायची जबाबदारी घेयची स्वतःवर? आणि या न्यायाने अक्षय कुमारचे टॉयलेट, बेबी, पॅडमॅन, हॉलिडे वगैरे सिनेमेच बेस्ट कॅटेगरीत येतील की, बाकी सिनेमा बनवण्याची सगळी कौशल्य चूलीत जाऊ दे नाही का? उपदेश, बोध देणारे सिनेमेच बेस्ट असं म्हणायचं काय आपण मग? आणि एका सिनेमाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा हा (तुझ्या पत्राची वाह वा करणाऱ्या) दुटप्पीपणा काय पटला नाही आपल्याला.

मी २०१४ मध्ये दिग्दर्शक उमेश कुलकर्णीचा "शूट अ शॉर्ट" नावाचा  शॉर्ट फिल्म मेकींगवरचा चार दिवसाचा वर्कशॉप केला होता. त्यामध्ये तो आम्हाला जगभरातल्या वेगवेगळ्या शॉर्टफिल्म्स दाखवायचा आणि प्रत्येक फिल्म बघून झाल्यानंतर तो आम्हाला या फिल्ममधून तुम्हाला काय कळलं असं विचारायचा. त्याची गिरणी आणि गीतांजली रावची प्रिंटेड रेन्बो नावाची फिल्म दाखवल्यावर त्याने असंच विचारलं काय कळलं बघून. मी म्हणालो होतो, "गिरणीमध्ये त्या लहान पोराचं बालपण पिसून गेलं आणि प्रिंटेड रेन्बोमध्ये एकाकी असलं तरी आयुष्य एंजॉय करता आलं पाहीजे हा संदेश दिलाय दिग्दर्शकाने". बरं हे उत्तर दिल्यावर आपल्याला लै काहीतरी कळतं या अविर्भावात मी पुढे उमेश काय बोलतो हे ऐकत होतो. पुढे उमेश म्हणाला, "प्रत्येक सिनेमा किंवा शॉर्ट फिल्म आपल्या काहीतरी संदेश देते, आपण त्यातून काहीतरी बोध घेयलाच पाहीजे हा गैरसमज पहिल्यांदा मनातून काढून टाका. कोणी आपली गोष्टंच नाही सांगायची का तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत तुम्ही काय संदेश दिलाय हेच कसं काय शोधत बसता". म्हणजे आता पद्मावत(ती)मुळे समाजावर घातक परीणाम वगैरे होतील हे तुझं म्हणणं फारंच पोकळ वाटतंय मला. याशिवाय या सिनेमाच्या टीमपैकी कोणीही जौहर प्रथा त्याकाळी का असेना बरोबर होती असं समर्थन केलेलं नाही हेही लक्षत घेयला नको का आपण? बरं तुझ्या पत्राला समर्थन देणाऱ्या काहीजणांचं असं म्हणणं आहे की दाखवायचाच होता जौहार तर फक्त उंच ज्वाळा दाखवायच्या होत्या पडदाभर, म्हणजे प्रतिकात्मक पाहिजे होता. अगं जुन्या सिनेमांमधे प्रणयदृष्याच्या जागी दोन फुलं एकमेकांच्या जवळ येताना बघून कुत्सित हसणाऱ्या पिढीला हे असलं प्रतिकात्मक आवडलं असतं का? आणि त्याही पुढे जाऊन भंसाळीला जे दाखवायचंय ते दाखवण्याचं स्वातंत्र्य त्याला नसावंच का?

संजय लीला भंसाळीचे सुरुवातीचे काही अपवादात्मक सिनेमे वगळल्यास त्याने आऊट अँड आऊट कमर्शिअल सिनेमे काढलेत आणि अशा कमर्शिअल सिनेमे काढणाऱ्या माणसाने जौहर वगळून सिनेमा काढावा अशी अपेक्षा करणंच भंपकपणाचं लक्षण आहे. पत्राच्या सुरुवातीला एकीकडे तू म्हणतेस की तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित रहायलाच पाहीजे आणि एकीकडे तुझी अशी अपेक्षा असते की एका ऐतिहास गोष्टीवर सिनेमा काढताना त्यातल्या एका घटनेचा संदर्भ वगळून किंवा तुला पटेलशी चित्रित करुन त्याने सिनेमा काढावा, कमालंच आहे सगळी. शिवाय तू पत्रात लिहिलं आहेस की तू संपूर्ण कुटुंबंच काय तर तुमच्या आचाऱ्यालाही सिनेमा पहायला घेऊन गेली होतीस. अरे पण मग सिनेमा बघायला जाताना तुझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला माहीत असेलंच ना की राणी पद्मावतीने जौहर करुन आयुष्याचा अंत केला की तू आमच्यासारखी काहीही माहीत नसताना "सालीनं केला घोटाळा" नावाचा सिनेमा बघायला गेली होतीस? सिनेमाला जाताना आम्हाला वाटलं होतं साली म्हणजे बायकोच्या बहिणीनं कायतरी घोटाळा केला असणार पण सिनेमातल्या मास्तरचा पाय केळाच्या "सालीवरुन" घसरुन त्याची स्मरणशक्ती गेल्यानं झालेला घोटाळा होता त्या सिनेमात. तर पद्मावत असो की पद्मावती या दोन्ही नावावरुन सिनेमात काय असणारे याबाबत असा संभ्रम होण्याची काहीएक शक्यताही नाही. संजय लीला भंसाळीचा सिनेमा बघताना तो कमर्शियल अंगाचा नसून काहीतरी बोध देणारा असेल अशी अपेक्षा करणं म्हणजे सलमानचा सिनेमा बघायला जाताना काहीतरी सशक्त गोष्ट बघायला मिळेल किंवा सत्यजित रायच्या सिनेमात तडकतं फडकतं आयटम साँग बघायला मिळेल अशी अपेक्षा करण्यासारखं नाही का हे? तुझ्या पत्रातले स्त्रीवादाशी निगडीत मुद्दे स्वतंत्रपणे अगदी अचूक असले तरी ते पद्मावत(ती)शी जोडल्याने ते सुसंगत वाटत नाहीत बघ. साने गुरुजी नावाचा सिनेमा बघायला जावं आणि त्यात सनी लिओनीचं आयटम साँग बघून दातखिळ बसावी अशी प्रतिक्रीया का देते‍एस? उद्याला तू अनुराग कश्यपचा सिनेमा बघायला गेल्यावर म्हणशील,"फ... से फँटम क्यू बोला आपने? फ... से फेमिनिझम भी तो बोल सकते थे स्सर". तू एका तद्दन कमर्शियल सिनेमाचा सध्याच्या समाजातल्या विकृती आणि स्त्रीयांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांशी संबंध जोडण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न बघून हे असलं फालतू उदाहरण द्यावसं वाटलं.

आजकाल सोशल मिडीयावर प्रत्येक गोष्ट ही आदर्शपणाच्या तराजूमध्ये तोलायची टूमंच निघालीये. आणि स्त्रीवादंच नुकसान स्वतःला स्त्रीवादी म्हणणाऱ्या तथाकथित स्त्रीवाद्यांनीच जास्त केलंय असं मला तरी ठामपणे वाटतं. स्त्रीवादाचा अर्थ स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान हक्क असणं असा न घेता आजकालचे तथाकथित स्त्रीवादी लोक पुरुष जो बथ्थडपणा युगानुयुगे करत आलेत तोच बथ्थडपणा करुन बायकांनी त्यांची बरोबरी करणं असा घेतात. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये असहिष्णूतेबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले होते,"मुझे लोग मिलते है और बोलते है साहब पीके मे आपने  हिंदू धरम के बारे मे ईतनी लिबर्टी ले ली, मुसलमानो के साथ लेते? तो क्या मुसलमानो जैसे बनना चाहते हो? अरे भाई कोशिश करो के वोह तुम्हारे जैसे हो जाए ईस मामले मे, बजाय ईसके के तुम उन के जैसे हो जाओ. किस से मुकाबला कर रहे हो? तालिबान से? अल्‌कायदा से? साहब देखिये वोह तो नही सुनते, वोह तो मार डालते है. तो मतलब आप भी वैसा होना चाहते है? मत करो ऐसा". मला वाटतं त्याच दिशेने तथाकथित स्त्रीवाद्यांचा प्रवास चाललाय. पुरुषांच्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या अंगीकारुन स्त्री-पुरुष समानता होणार आहे का? नाही होणार. आता तुला वाटेल मधेच काय हे तथाकथित स्त्रीवाद्यांबद्दल बोलतोय मी. हे बोलण्याचं कारण म्हणजे मला तुझं पत्र ते त्यातल्याच एखाद्या तथाकथित स्त्रीवाद्यानी लिहिल्यासारखे वाटले. आणि सद्याची सामाजिक परीस्थिती बरी नाही हे जरी खरं असलं तरी एका सिनेमामुळे म्हणजेच पद्मावत(ती) बघून तुला स्त्रीया फक्त योनीपुरत्याच मर्यादीत असल्याचं वाटलं हे वाचून खूप वाईट वाटलं.

संजय लीला भंसाळीच काय दुसऱ्या कोणाही सिनेदिग्दर्शकाला त्याची गोष्ट सांगण्याचा, त्याला हवी तशी सांगण्याचा अधिकार आहे आणि तसाच आपल्याला पटत नसल्यास आपण तो सिनेमा न पाहण्याचा आणि डब्ब्यात घालण्याचा आपल्याला निश्चितंच अधिकार आहे पण तुझी गोष्ट तू मला हवी तशीच पडद्यावर दाखव म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही, नक्कीच नाही.
सॉरी पण तुझ्यासारख्या गुणी, अभ्यासू, संवेदनशील व्यक्तिने या तथाकथित सुधारणावादी, स्त्रीवादी, बुद्धीवादी लोकांच्या रांगेत जाऊन बसू नये असं मनापासून वाटतं म्हणून हे माझं म्हणणं मांडण्याचा खाटाटोप करतोय कारण तू तथाकथित नाहीस तर आंतर्बाह्य खरी आहेस असं मला वाटतं.

केपी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...