Friday, February 16, 2018

नीरव मोदी व्हाया नेहरु


माननीय परंपूज्य श्री श्री श्री नीरव मोदीजी  यांचा जन्म जरी १९७१ साली झाला असला तरी पण वास्तविक पाहता मोदीजींना पंजाब नॅशनल ब्यांकेकडून रुपये ११,३०० कोटी (फ....क्तं) चे कर्ज सन १९४० सालीच नेहरुंच्या सांगण्यावरुन देण्यात आले होते. हे कर्जप्रकरण ब्यांकेच्या संचालक मंडळापुढे आल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी या प्रकरणास कडाडून विरोध केला होता पण त्यावेळी मोटाभाई मोदी शेट नसल्यामुळे लोकांना सरदार पटेलांची खरी किंमत कळली नव्हती आणि म्हणूनंच असले राष्ट्रहितविरोधी निर्णय घेणाऱ्या नेहरुंना लोकांनी उचलून धरले होते. पुढे जाऊन आपला देश आणि पर्यायानं देशाच्या नागरीकांना या निर्णयाची भयंकर झळ पोहचू शकते, नव्हे तशी ती पोहोचेलंच याचा अंदाज आल्यानं सरदार पटेलांनी जीवाच्या आकांताने, प्राणपणाने या सगळ्याला विरोध केला पण भ्रष्ट लोक आणि चोरांना पाठीशी घालण्याची सवय असलेल्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या प्रभावाखाली येत नेहरुंनी देशाला आर्थिक संकटात टाकणारे अनेक निर्णय घेतले त्यातलाच हा एक निर्णय होता.

नेहरु, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी यांचा कारभार सुरु होण्याआधीच त्यांच्या कारभाराला कंटाळून सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, पटेलांनी त्यांना जोरदार पाठींबा दिला पण त्यांच्या दुर्दैवाने मोटाभाईचे उजवे का डावे हात आमितभाई शहा यांना काँग्रेसने कटकारस्थान करुन गुजरातमध्ये येण्यास मज्जाव केला होता त्यामुळे ते सुभाषबाबूंना काही मदत करु शकले नाहीत. होमग्राऊंडवर ब्याटींग करु देत नाहीत म्हणजे काय. तर या सर्वांनी प्राणपणाने नेहरु आणि काँग्रेसविरुद्ध आघाडी उघडूनंही त्यावेळेस हट्टाला पेटलेल्या नेहरुंनी माननीय परंपूज्य श्री श्री श्री नीरव मोदीजी यांना तब्बल रुपये ११,३०० कोटीचे कर्ज दिले आणि आज माननीय निरागस, निष्पाप नरेंद्रशेट मोदी यांच्यावर नालायक विरोधक चिखलफेक करतायेत...

शोधपत्रकारीतेचे वर्ग घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहनकाकांनी स्वतः पी.टी.आय.च्या त्यांच्या "वैयक्तिक शाखेतून" जीवावर उदार होत सन १९४९लाच ही बातमी बाहेर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण तात्कालीन पक्षपाती सरकार, पंतप्रधानांमुळे ते करणे शक्य झाले नाही. पण त्यावेळेस मोहनकाकांनी पी.टी.आय.च्या "वैयक्तिक शाखेत" करुन ठेवलेल्या नोंदी धक्कादायक असून त्यातली एक गोपनीय नोंद माननीय एडवर्ड स्नोडेन यांच्या सहाय्याने आम्ही आपल्यासमोर आणत आहोत. त्यामधला मजकूर काहीसा असा होता.

नीरव मोदींचे प्रस्तावित कर्जप्रकरण संचालक मंडळापुढे आल्यानंतर सरदार पटेल आणि नेहरुंमध्ये त्यावरुन खडाजंगी झाली आणि तुम्ही हे कर्ज देण्यासाठी एवढे का हट्टाला पेटला आहात असे सरदार पटेलांनी विचारले असता नेहरुंनी धक्कादायक उत्तर दिले, "ते काय का आसंना, मला नीरवला कर्ज देयचच्चे म्हंजे देयचच्चे कारन २०१४ मदी येनारं मोदीशेटचं सरकार मला २०१८ मदी गोत्यात आनायचंय, बाकी सगळं गेलं खड्ड्यात". असं ऐकिवात आहे की नेहरुंच्या या ऊत्तरानंतर पटेल आणि त्यांच्यातली दरी वाढतंच गेली आणि देशाची त्यानंतर झालेली अधोगती आपण अनुभवत आहोतंच.


(शेट तुम्ही आगे का काय म्हणतात ते बढत र्हावा ओ, तो यज्ञ करा सगळीकडची माती गीती आनून लालकिल्ल्यावं, हे उगं नीरव मोदी विजय मल्ल्या गिल्ल्या असल्या फालतुक बातम्यात वेळ घालवू नका तुमचा.)

केपी आर


No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...