Monday, December 1, 2014

कविता


तू माझ्यावर कविता कर ना
ती म्हणाली की तॊ फक्त हसायचा
ना हॊ म्हणायचा ना नाही
ती वॆड्यासारखी त्याच्या ऊत्तराची वाट पहायची
तिच्या वाढत्या हट्टाला शॆवटी दिलंच त्यानं ऊत्तर
"कवितेवर कविता करत नसतं कुणी"
माझी सगळ्यात सुंदर कविता
वाचता येत नाही, जाणवतॆ!
मग त्यानं तिचा हात घट्ट दाबून धरला
त्याच्या छातीशी
’धड्धड धड्धड’ शहारणाऱ्या
तळहातीच्या रॆषा सावरण्याआधी
त्यानं कधीही न लिहिलॆली त्याची
सगळ्यात सुंदर कविता
पाहिली त्यानं डॊळॆ भरुन त्याच्या पुढ्यात
अन वाचली तिनं त्याच्या डॊळ्यात
तिनं हात सॊडवून घॆण्याआधी म्हणाला तॊ परत
"कवितेवर कविता करत नसतात वॆडॆ"

के पी आर

Tuesday, November 11, 2014

Prakash


मावळत्या सूर्याकडे करुन पाठ
राहिलो जरी ऊभं
नव्या नवख्या अंधारात भिजवून काठ
काळवंडला जरी नभं
बघता बघता पेटतात चांदण्या ईरेला
स्वतःला जाळूनंही वाती, ऊजळवतात घराला
अन तेव्हाच तर मिटल्या पापण्यामागं स्वप्नांचा खेळ चालतो
काळोख आहे म्हणूनंच तर आपण ऊजेडाच्या दिशेनं चालतो
चांदवा मनापासून आभाळात राहतो तेवत
मन मात्र खुळं राहतं काळोखालाच दिवस-रात्र मनामधे ठेवत
कोणी किती झाकून ठेवलं जरी कोंबडं
फुटायचं तेव्हा फुटतंच असतं तांबडं
सोन्यासारखी झळाळते मग नभाची किनार
रात्र कितीही लांबली तरी सांगा काळोखाला
आता लवकरंच सकाळ होणार
आता लवकरंच Prakash  येणार...

के पी आर

विष


मग तिनं शांत रहायचं ठरवलं
आणि मी स्वतःशी बोलायचं

ती गिळत राहीली शब्द
आणि मी राग

रागाच्या एकेका घोटासोबत
होत राहीली पश्चातापाची पेरणी

वेशीवरचा अहंकार, परतवून लावू लागला शब्दांना
ऊच्चाराच्या प्रतिक्षेत ते पेटू लागले काळजात
अन लपेटून बसले विष, बाहेर जाण्याआधी

एका अनावर क्षणी
तिनं वाट मोकळी केली शब्दांना

त्यानंतर मात्र आपसांत वाटून घेतलीये
आम्ही शांतता...

हं... मागे वळून पाहिल्यावर वाटतं
जीवघेणी असली तरी सोपंच होतं तसं

वाटून घेणं शांतता...
आपसांत विष वाटून घेण्यापेक्षा...

के पी आर

गाठ


ती विचारायची नेहमी, कशी बांधू गाठ?
सोडगाठ बांधू की..
मी फक्त हसायचो, अजून अजून म्हणत
घट्ट करायला लावायचो
मग पहिल्या गाठीवर बोट ठेऊन
मदत करायचो तिला..
मग औक्षण करताना
दिव्यावर बोट धरुन
दोन भुवयांच्यामधे लावायची ती
मी "ऊहूं.." करायचो.. जाणवलं तरी नाहीच म्हणायचो
मग बोट भाजेपर्यंत दिव्यावर आणि मग माझ्या कपाळावर
त्यानंतर चिमूटभर साखर..
आणि मिरवायचो राखी दिवसभर

आता राखी आणि मिठाई
येते पोस्टानं..
प्रश्न वेगळा असतो..
मिळाली का रे राखी?

राखी मिळाली की मी ताईला सांगतो
तुला हवी तशी बांध
मी सोडणार नाही..
आणि सुटली तरी सुटू देणार नाही
आंघोळीच्या पाण्यानं
रंग उतरून हातावर पसरेल
हळू हळू हाताशी
रंग आणि धागे एकरुप होतील
नंतर गाठ दिसेनाशी होईल
तिथेच असली तरीही
सगळं कसं एकसंध..

मग ती येते वर्षाकाठी कधीतरी भारतात
हात बघून म्हणते
हि पुढची राखी माझी ना?
आणि वेडाएस का रे?
राखी ईतके महिने ठेवतं का कोणी हातात?
हात हातात घेऊन म्हणते
बघ आता सुटतंच नाहीये गाठ

मीही म्हणतो मग..
काही गाठी सुटण्यासाठी नसतातंच

के पी आर
(यावेळीसुद्धा पुढची राखी तुझीच)

जस्ट फ्रेंड्‌स


ती: व्हाय कांट वुई स्टील बी फ्रेंड्‌स..?

तो: पाऊस..
अंगोपांगी रुततो..
काळजात झिरपतो
कवेत घेतो
आठवणीत रमतो
कवितेत घुटमळतो
तळहातावर विसावतो
रंध्रा रंध्रातून सुखावतो
मातीच्य कणा कणाला
आयुष्याच्या क्षणा क्षणाला
मोहरुन टाकतो
डोळ्यात दाटतो..
मोकळा ढाकळा मनापासून
कडकडून भेटतो..
तोच खरा माझा पाऊस

माझाच पाऊस
काचेच्या आडून
दुसऱ्याच्या दारात..
पहायचा नाही मला

दुसऱ्याच्या दारात बरसताना बघून
झुरायचं नाही मला उगाच

खरंच नखशिखांत जाणवणारा तो
माझा पाऊस

त्यांच्या दारातलं ते फक्त पाणी

त्यापेक्षा..
माझ्या वाटचा पाऊस..
आठवणीत का असेना..
असू दे माझाच..

माझ्या हक्काच्या पावसाला
पाण्याचं लेबल नाही चिकटवायचं मला

म्हणूनंच..नाही..
नो.. वुई कांट बी जस्ट फ्रेंड्‌स

के पी आर

मैत्री


त्यानं एकवार कोऱ्या पानाकडे पाहिलं
अन परत डोळे मिटून बसला..
काही सुचतंय का "पाहण्यासाठी.." डोळे "मिटून"
डोळ्यासमोर उलगडलं परत तेच..
गेली कित्येक वर्ष, त्यातले कित्येक क्षण..
अन सरत्या वयाबरोबर येत गेलेलं शहाणपण
मग त्यानं परत
मिटल्या डोळ्यानं निरखून पाहिलं
पण काही टिपायचं सोडून
मन खुळ्यासारखं वाहवत राहिलं..
त्याची कविता त्यानं
मिटल्या डोळ्यातंच लिहिली
अन समोर पडलेल्या पानाची
एकेक ओळ अशी कोरीच राहिली
तसं लिहिणंही कठीणंच होतं म्हणा
कारण..
त्यांचा सहवास बाकी जगासाठी
होता खुळेपणा
.
.
.
व्यवहारात अर्थ नव्हता त्या खुळेपणाला
आणि त्या खुळेपणाशिवाय त्यांच्या जगण्याला
तसंही ते वेड
एखाद्या चिठोरीवर सामावलं नसतं
त्याला म्हणे ते आजकाल
फक्त मिटल्या डोळ्यानंच दिसतं..

मिटल्या डोळ्यात आणि खुल्या मनात
त्या वेडाची असते त्याला खात्री
जग म्हणतं वेड
अन तो मात्र म्हणतो त्याला मैत्री..

के पी आर

(व्यवहाराच्या चौकटीत कधीच न बसणाऱ्या
माझ्या सगळ्या "खुळ्या" मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा)

#HappyFriendshipsDayGuys :)

त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या


त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या
माझ्या तळहातावरच्या रेषांपेक्षा
सुंदर आहेत..

हरेक सुरकुतीत रुजलेत एकेक क्षण

त्या बदलत नाहीत.. डिवचत नाहीत
घाबरवत नाहीत.. भुलवतंही नाहीत
सतावत नाहीत... सलत नाहीत
रडवत नाहीत.. फसवत तर त्याहून नाहीत..

त्या समजून घेतात, सामावून घेतात..
हसू देतात.. समाधानंही देतात
आजच्या रिंकलफ्री नात्याच्या जमान्यातंही
टिकवून ठेवतात "घडी"
वाढतात.. व्यापतात
त्यांच्या चेहऱ्यासोबत माझं आयुष्य..

तळहाताच्या रेषांमधे.. शाश्वत काहीच नाही
म्हणे दडलंय त्यामागं माझं भविष्य
पण... त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधेच
दिसतं मला... माझा आज, उद्या आणि
माझं सारं आयुष्य..

मऊ लुसलुशीत.. हव्याहव्याशा

हंम्म... खरंच

त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या
माझ्या तळहातावरच्या रेषांपेक्षा
सुंदर आहेत..

के पी आर

ती


ती वागते अशीच
कधीतरी वेड्यासारखी
उगाचंच डोळ्यात पाणी
आणि प्रश्नचिन्ह चेहेऱ्यावरती
पण तरीही पाहते निश्चयानं हसून
साऱ्यांच्या नकळत डोळे पुसून
हा वेडेपणा फार काळ टिकत नाही
अन किती केलं तरी ती
स्वतःसाठी जगायला शिकत नाही

पण जमणार तिला..
आज ना उद्या मनापासून हसायला
थोडा वेळ लागतोच ना
काळजाला व्यवहाराची गणितं शिकायला?

के पी आर

भीती


मग त्यानं..
धारदार सुरा घेऊन
जमीन चिरायला घेतली..
त्याच्या वाटचा, त्याच्या धर्माच्या वाटचा
तुकडा त्याला वेगळा हवा होता..
कायद्या बियद्याला जुमानत नव्हता तो
जमेल न जमेल असले
फुटकळ प्रश्नही पडत नव्हते त्याला
तो समाजाचा एक अविभाज्य भाग होता
पण त्याच्यासाठी त्याचा समाजंच वेगळा
"माजा"सहीत असल्यामुळेच
कदाचित "स"माज म्हणत असावे.. असा त्याचा अंदाज
रक्ताळलेल्या डोळ्यातली
भीती लपवण्यासाठी..
ओढून घेतली होती त्यानं डोळ्यावर मग्रुरी...

दातओठ खाऊन, जीवाच्या आकांतानं
चिरत राहीला तो जमिन
एवढा खाटाटोप करुनंही
जाईना मनातली भीती.. अन
चिरता येईनाच त्याला.. "जमिन"
.
.
.
.
आजकाल
तोच धारदार सुरा.. तो कमरेला लाऊन फिरतो..

पण..
भीती अजूनंही जातंच नाही..
म्हणूनंच सुऱ्याच्या आजूबाजूला
पसरवंत राहतो तो त्याच्यातलीच "भीती"

के पी आर

पाऊस


तिनं लिहिला पाऊस
त्यानं वाचला वारा
तिच्या ओटीत चंद्र
त्याच्या नजरेत भिजला तारा

तिच्या हळूवार स्पर्शाचं
गाणं त्यानं रचलं
एका चोरट्या कटाक्षात
तिनं एकेक कडवं वेचलं

गालावरचा पाऊस तिच्या
ओठांत जेव्हा विसावला
अजून थोडं बरसण्याची
गळ घातली त्यानं....
दूर दाटल्या मेघाला

मग यावेळी..
त्यानं आभाळभर पाऊस लिहिला..
त्याच्या मिठीत साजरा झाला
तिचा पाऊस पहिला

के पी आर

चुकले वाट


गोष्ट तशी रीसेंट आहे

आभाळाकडे निघालेले ढग
चुकूनंच चुकले वाट
मिडीया बिडीया
वेधशाळा बिधशाळा
सगळ्यांनीच चर्चेचा घातला मग घाट
कुणीतरी म्हणे मग
मोठ्ठा यज्ञ केला
मंत्र-बिंत्र म्हणून देवाकडंच
तक्रार‍अर्ज दाखल केला..
मिसिंगची कंप्लेंट
जेव्हा दाखल केली त्यांनी
देव म्हणे पाठवला तर बरोबर होता
काहीतरी घोळ घातलाय कुरियरवाल्यांनी
मी म्हणालो देवाला
चोरला तर नसेल ना कोणीतरी
देव म्हणे, देव तारी त्याला कोण चोरी
आमच्या तोंडचं पार पळालंय बघ पाणी
अशी कशी तू बरोबर पाठवूनंही दिली त्यानं हुलकावणी?
चेक कर की एकदा, पत्ता लिहायला तर नाही चुकलास?
देव म्हणे बास का, एवढाच का तुझा माझ्यावर विश्वास?
मी: तसं नाही रे पण एकदा क्रॉसचेक तर करु
देव: ठिके बाबा, पत्ता सांगायला सुरुवात करु?

पत्ता:
आहे जिथे काळजी, श्रद्धा आपुलकी
दुसऱ्याबद्दल प्रेम आणि खूप सारी माणूसकी
जिथे बोटभरही स्वार्थ नाही
तिथ बरसणं तुझं व्यर्थ नाही
थकली गात्र जिथं
बरस तू जाऊन तिथं
बरस येऊ दे आता पावसाळा
संपव काहीली भिजव आसमंत सगळा..

मी: चं च्च च्च.. पाऊस नाही ना कुरीयरवाले नाही..
पत्ता चुकला तुझाच सगळा...
म्हणूनंच येऊन दाटला बघ पाऊस
माझ्या बळीराजाच्या डोळा.. बळीराजाच्या गळा

के पी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...