ती विचारायची नेहमी, कशी बांधू गाठ?
सोडगाठ बांधू की..
मी फक्त हसायचो, अजून अजून म्हणत
घट्ट करायला लावायचो
मग पहिल्या गाठीवर बोट ठेऊन
मदत करायचो तिला..
मग औक्षण करताना
दिव्यावर बोट धरुन
दोन भुवयांच्यामधे लावायची ती
मी "ऊहूं.." करायचो.. जाणवलं तरी नाहीच म्हणायचो
मग बोट भाजेपर्यंत दिव्यावर आणि मग माझ्या कपाळावर
त्यानंतर चिमूटभर साखर..
आणि मिरवायचो राखी दिवसभर
आता राखी आणि मिठाई
येते पोस्टानं..
प्रश्न वेगळा असतो..
मिळाली का रे राखी?
राखी मिळाली की मी ताईला सांगतो
तुला हवी तशी बांध
मी सोडणार नाही..
आणि सुटली तरी सुटू देणार नाही
आंघोळीच्या पाण्यानं
रंग उतरून हातावर पसरेल
हळू हळू हाताशी
रंग आणि धागे एकरुप होतील
नंतर गाठ दिसेनाशी होईल
तिथेच असली तरीही
सगळं कसं एकसंध..
मग ती येते वर्षाकाठी कधीतरी भारतात
हात बघून म्हणते
हि पुढची राखी माझी ना?
आणि वेडाएस का रे?
राखी ईतके महिने ठेवतं का कोणी हातात?
हात हातात घेऊन म्हणते
बघ आता सुटतंच नाहीये गाठ
मीही म्हणतो मग..
काही गाठी सुटण्यासाठी नसतातंच
के पी आर
(यावेळीसुद्धा पुढची राखी तुझीच)

1 comment:
khup chan bhaiya
Post a Comment