Saturday, September 2, 2017

नोटाबंदी - कागज का टुकडा


स्वतंत्र भारताचा ईतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ८ नोव्हेंबर २०१६ सर्वार्थाने एक गौरवास्पद, सुवर्णदिवस म्हणून ओळखला जाईल.
याच दिवशी भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी काळा धंदावाल्यांचं कंबरडं मोडणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि देशातल्या हजार पाचशेच्या सगळ्या नोटा त्या रात्री बारापासून निव्वळ "कागज का टुकडा" बनून गेल्या.
मोदीजी म्हणजे पराकोटीची स्वच्छ प्रतिमा, आतोनात निर्मळ अन हळवं मन शिवाय जात्याच कनवाळूपणा ओतप्रोत भरुन असलेले एक दुर्मिळ राजकीय नेतृत्व. याउपर की काय म्हणून चूकणे या शब्दाला त्यांच्या शब्दकोशात स्थानंच नाही. ते घेतील तो निर्णय ते करतील ती कृती हि सदासर्वदा केवळ बरोबरंच असते. त्यांच्या करारी चेहऱ्याच्या ९ किलोमीटर आजूबाजूच्या व्यासामध्ये चूक चूकुनंही फिरकतसुद्धा नाही. २०१४ साली भक्तगणांना होलसेलमध्ये वाटलेल्या शब्दकोशांमध्ये पर्फेक्शन या शब्दाचा अर्थ नमो किंवा मोदीजी असा देण्यात आला आहे आणि तो गेल्या तीन साडेतीन वर्षात घोकून घोकून पाठ करुन घेण्यात ते यशस्वीही झाले आहेत. तर या अशा निष्कलंक, निस्वार्थी, कनवाळू पंतप्रधानांनी जनतेच्या हितासाठी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चूकीचेच आणि धातांत खोटे उद्देश गेल्या दहा महिन्यात काही समाजकंटकांनी आणि विघ्नसंतोषी लोकांनी समाजात पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. काय तर म्हणे नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैश्याला आळा घालण्यासाठी, कॅशलेस व्यवहार रुजवण्यासाठी, लेस कॅश पद्धती आणण्यासाठी, पडून सडणारा पैसा व्यवहारांच्या मुख्य स्रोतात आणण्यासाठी आणि यावर कडी म्हणून की काय तर दहशतवादाला आळा घालण्यासाठी घेण्यात आला होता. माननीय मोदीजींनी कधीही त्यांच्या भाषणात अथवा प्रेस रीलीजमध्ये यापैकी एकंही उद्देश जाहीररीत्या सांगितलेला नाही याची सर्वांनी नोंद घेऊन या बोलभांड मिडीयाचा निषेध करणं तर गरजेचंच आहे पण यापुढे जाऊन या असल्या ब्रिगेडी मिडीयावर बहिष्कार घालणंही तितकंच महत्वाचं आहे. मूळात समाजकंटकांना सतर्क होण्याची संधी न देता हळूच नोटाबंदीचा थोर उद्देश गुपित ठेऊनंच साध्य करुन घेण्याचा मोदीजींचा मानस होता पण त्यांच्यावर चहुबाजूंनी होणारी बोचरी टीका जिव्हारी लागल्याने आणि आता सहनशक्तीच्या पलिकडे हे सगळं जात असल्याने आम्ही या उद्देशांच्या मूळाशी जाऊन सगळ्यांपुढे हे उद्देश जाहिररीत्या मांडण्याचं ठरवलं आहे. तर बोलभांड आणि विकाऊ मिडियावर विश्वास न ठेवता आपला सद्‌सद्‌विवेक जागा ठेऊन हे उद्देश वाचावे, समजावे आणि जमेल तितक्या समविचारी लोकांपर्यंत पोहोचवावे हि मनःपूर्वक विनंती.
नोटाबंदीचे मूळ व आजवर गुपित ठेवलेले उद्देश खालीलप्रमाणे

१. वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे - नोटाबंदी करताना मोदीजींनी हे स्पष्ट केलं की ही बंदी त्या रात्री बारा वाजल्यापासूनंच होईल. अन हे जाहिर केलं तेव्हा बँका, ऑफिसेस, दुकानं वगैरे ऑलरेडी बंद झाली होती. त्यामुळे खिशात असलेला अमाप काळा पैसा उरलेल्या चार तासात कसा खर्च करायचा याची कोणालाच टोटल लागत नव्हती. काळा पैसावाले ईतके धास्तावले की त्यांच्या हृदयाचे ठोके अपरीमित प्रमाणात वाढले आणि मनुष्य जेव्हा आतोनात चिंताग्रस्त असतो तेव्हा त्याची प्रजनन क्षमता दिडशे पट कमी होते हे वर्षानुवर्षाच्या अभ्यासाअंति स्पष्ट झालेलं आहे. शिवाय जुन्या नोटा एकतर बँकेत जमा करणं किंवा त्यांची योग्य ती विल्हेवाट लावणं आणि नव्या नोटा एटीएम मधून काढणं यांत रात्रंदिवस अडकलेल्या जनतेच्या डोक्यात दुसरी कोणतीच गोष्ट येणं शक्य नसल्याने लोकसंख्येला आपसूकंच खिळ बसली. याव्यतिरीक्त मरायला टेकलेले लोक एटीएमच्या रांगेत येऊन येऊन पट्टकन खपल्याने त्यांनाही लवकर मोक्ष प्राप्ती झाली आणि गेल्या सत्तर वर्षातल्या प्रजनन दराशी तुलना केल्यास गेल्या दहा महिन्यातला प्रजनन दर हा किमान एकशे अठ्ठ्या‌ऐंशी टक्क्याने कमी झाल्याचा अहवाल नासाने दिला आहे. यावरुन हे निर्विवादपणे सिद्ध होतं की लोकसंख्या नियंत्रण हा नोटाबंदीच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आहे.

२. जागतिक तापमानवाढीत घट करणे - जागतिक तापमानवाढ ज्याला आपण सगळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ही आजच्या घडीला भारतंच नाही तर अवघ्या जगाला भेडसावणारी समस्या आहे. एकीकडे प्यारीस करार, ईथल्या परीषदा तिथल्या परीषदा वगैरे करत बसणारे निष्क्रीय नेते आणि एकीकडे थेट कृती करणारे आपले धडाकेबाज माननीय मोदीजी. आपण ज्या एटीएममधून पैसे काढतो त्या एटीएममध्ये वातुनुकुलित यंत्रणा २४ बाय ७ चालू ठेवावी लागते. वर्षानुवर जुन्या झालेल्या नोटा या एटीएम मशिनमध्ये ठेवल्याने त्या चार बाय चार खोलीतल विशिष्ट तापमान ठेवण्यासाठी वातुनुकुलित यंत्रणेची जास्तीत उर्जा खर्च होते. नव्या नोटांच्या तुलनेत ही उर्जा किमान चौसष्ट टक्के जास्त लागते. सगळ्या जुना नोटा सरसकट बाद केल्यामुळे फक्त एटीएमंच नाही तर बँका, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यलयं शिवाय सार्वजनिक वाहतुक करणारी वाहनं आणि वातानुकुलित खाजगी वाहनं, जिथे जिथे म्हणून कॅश जुन्या नोटांच्या स्वरुपात हाताळली जात होती तिथे उर्जा वाचवून तापमानवाढ रोखण्याकडे एक महत्वाचं पाऊल मोदीजींनी उचललं आहे. आणि काल-परवाच आलेल्या जागतिक पर्यावरण रक्षण संस्थेच्या अहवालामध्ये मागच्या दिडशे वर्षांच्या तुलनेत ९ नोव्हेंवर २०१६ पासून मोजलं असता भारतातील तापमानवाढ उणे २४ टक्के एवढी नोंदवली गेल्याचं म्हटलं आहे.

३. तात्काळ ट्रिपल तलाकवर बंदी - मुस्लिम महिलांचे आयुष्य बरबाद करणारी तात्काळ ट्रिपल तलाक ही प्रतिगामी पद्धत रद्दबातल ठरवणे हे एक मोठ आव्हान देशाच्या नेतृत्वापुढे होतं. तात्काळ केलेल्या नोटाबंदीमुळे आतोनात समस्यांना तोंड द्यावं लागल्याने, तात्काळ घेतलेले निर्णय हे किती त्रासदायक होऊ शकतात हे ट्रिपल तलाकच्या खटल्यावर काम करणाऱ्या न्यायाधीशांच्या पॅनेलला समजल्याने त्यांनी विनाविलंब तात्काळ ट्रिपल तलाक पद्धतीवर बंदी आणली. ईतर धर्माचा तिरस्कार करतात असा सरसकट आरोप मोदीजींवर करणाऱ्या अंध विरोधकांना ही सणसणीत चपराक आहे.

४. साथीच्या रोगांना आळा घालणे - आजवर अगदी शालेय जीवनापासून आपण शिकत आलो आहोत की साथीच्या रोगांचा प्रसार हा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन विषाणू पसरल्यानं होतो. जुन्या नोटांच्या पृष्ठ्भागाच्या कित्येक थर खालपासून लाखो करोडो साथीच्या रोगांच्या विषाणूंची पैदास होऊन आणि सूक्ष्मस्तरावर ते विषाणू साठून राहिले असून त्या नोटांच्या देवाण घेवाणीतून साथीच्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं ईस्रोच्या २०१५ सालच्या वार्षिक अहवालात स्पष्टपणे नमूद केलं गेलं होतं. गेल्या सत्तर वर्षात फक्त उपग्रहांच्या उड्डाणांचे श्रेय लाटणाऱ्या नेतृत्वापेक्षा आपण वेगळे असल्याचा पुरावा मोदीजींनी या धडाकेबाज निर्णयातून दिला आहे.

५. सचिन तेंडूलकर आणि रेखाची राज्यसभेतली उपस्थिती वाढवणे - आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर राज्यसभेचं सदस्यत्व मिळवून, राज्यसभेत नाममात्र हजेरीही न लावणारे आणि त्यांना मिळालेला निधी तसाच सडू देणाऱ्या सचिन व रेखा यांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी राज्यसभेत किमान ८०% हजेरी अनिवार्य केल्याची गोपनीय बातमी आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून स्वतंत्र भारताच्या ईतिहासात लोकप्रिय सेलेब्रिटींच्या बाबतीत कठोर निर्णय घेणारे मोदीजी हे पहिले आणि एकमेव पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत गोल्ड स्पॉट बूक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये त्यांची नोंद झालेली आहे.

६. शेतकरी बांधवांना सहकार्य, गोमातेचं रक्षण व सोन्याच्या निर्मितीत वाढ - जुन्या नोटा या फक्त कागदाच्या लगद्यापासून बनवल्या नसून त्यामध्ये निरनिराळी रसायनं मिसळलेली होती शिवाय त्यामध्ये साथीचे रोग पसरवणारे लाखो करोडो विषाणू साठले होते. या अशा विषाणूग्रस्त नोटा जेव्हा फाटायच्या आणि त्यांची विल्हेवाट लावली जायची तेव्हा त्यातलं रसायन भूगर्भात जाऊन जमिनीचा कस कमी होत होता, फाटक्या नोटा गायींनी खाल्यामुळे त्यांच्या पोटात घातक रसायनं जात होती. भारतातल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार गायीच्या शेणामध्ये सोन्याचे कण असतात हे  यापूर्वीच पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. रसायनयुक्त नोटा खाल्ल्यानं गायींची शेणावाटे सोनं निर्माण करण्याची क्षमता गेल्या पंनास वर्षात आतोनात कमी झाली होती. नव्या नोटा ईको फ्रेंडली आहेत, त्यामध्ये फक्त हिरव्या वनस्पती असल्याने त्या खाल्ल्यावर गायींच्या पोटावर कोणताही विपरीत परीणाम होणार नाही तसेच ईको फ्रेंडली नोटांची विल्हेवाट लावताना रसायनं जमिनीत जात नसल्याने जमिनीचा कसंही सुधारण्यात मदत होत आहे. जमिनीचा कसं सुधारल्याने शेतकरी बांधवांना अप्रत्यक्ष मदत झाली आहे, विषाणूंपासून गायींचं संरक्षण होत आहे आणि पर्यायाने सोन्याच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. मोदीद्वेष्टे मात्र जीडीपीमध्ये घट झाल्याची खोटी बोंब ठोकत आहेत.

नोटाबंदीमागे याव्यतिरीक्त सहज लक्षात न येण्याजोगे, गोपनीय मात्र जनतेच्या हिताचे अगणित चांगले उद्देश दडलेले आहेत. येत्या काळात याची परीणिती आपणा सर्वांनाच येईल आणि आज या निर्णयावर कितीही टीका झाली तरीही ईतिहासात या निर्णयाची नोंद एक लोकहितवादी निर्णय म्हणूनंच होईल याची आम्हाला खात्री आहे, तोवर टिकाकारांनी काळा पैसा, दहशतवादाला आळा, केशलेस वेग्रे म्हणून मनगटाला चूना लावून खुशाल बोंबलत रहावं.

जय हिंद! भारत माता की जय!

केपी आर.

Friday, July 7, 2017

धोनी


धोनी... प्रिय वगैरे म्हणायचा नाटकीपणा करणार नाही रे. कारण तू मला प्रिय वगैरे नव्हतासंच कधी.
तू वन डे आणि टी-२० च्या कर्णधार पदावरुन पायऊतार झालास, बातमी ऐकली. आजवरची तुझी
वाटचाल बघता हि अशी अचानक आलेली बातमी ऐकून फारसं आश्चर्य वाटलं नाही. हे असंच
काहीसं होणार याचा अंदाज होता, म्हणजे अचानक जाहीर करणं तुझ्यासाठी नवीन नाही
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे "तू आता कर्णधारपद सोड" असं सांगायची वेळ
तू येऊ द्यायचा नाहीस असंही वाटत होतंच. तू कितीही आवडत नसलास तरी रांचीसारख्या एका छोट्याश्या ठिकाणाहून, एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन केवळ तुझ्या दुर्दम्य ईच्छाशक्ती, मनगटातली ताकद आणि स्वकर्तृत्वावर तू मिळवलेलं यश हे खूप खूपंच उत्तुंग आहे. आणि आजवर तू जे काही साध्य केलं आहेस त्यासाठी मी तुला मनापासून फक्त मानतंच नाही तर तुझा खूप रीस्पेक्ट करतो.
तू मला कधी आवडला नाहीस हे खरंय पण म्हणून तू टाकाऊ होत नाहीस, तसं तर तू कोणालाही आवडला नाहीस तरीही तू टाकाऊ होत नाहीस कारण तू कर्तृत्वानं मोठा झालायेस, कोणाच्या मानण्या न मानण्यानं त्यात तसूभरंही फरक पडू शकत नाही. तुझा अनऑर्थडॉक्स गेम, आडवे तिडवे फटके, टेक्निकल अप्रोचपेक्षा ताकदीवर भर देऊन केलेला खेळ याकडे कोणीही सहजंच दुर्लक्ष केलं असतं खरंतर पण तू टिम इंडियात आल्यापासून सिनियर प्लेयर्ससाठी रुंदावलेलं एग्झिट डोअर, चेन्नई सुपरकिंग्जच्या आणि पर्यायनं तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंना मिळणाऱ्या अवाजवी संधी यामुळे तुझ्याबद्दल एक अढी तयार झाली मनात. कदाचित हे सगळे आमच्या मनाचे खेळंही असतील पण बऱ्याच प्रसंगांमध्ये सिनियर प्लेयर्स आणि तुझ्यातली दरी खूप प्रकर्षानं जाणवली आणि तू यश मिळवत असतानाही आम्ही तुझा तिरस्कार करण्यातंच धन्यता मानली.
गावठी, आंधळी कोशिंबीर फेम, आडवी ब्याट आणि काय काय म्हणून तुझ्यावर टिका केली... खरंतर तुझा राग करण्यासाठी बऱ्याचदा कारणंही शोधली. मला २००४ मधली पाकिस्तानातली तुझी धडाकेबाज खेळी अजूनंही आठवते, दुसऱ्या दिवशी द्वारकानाथ संझगिरींनी लिहिलं होतं काल सचिन आऊट झाला म्हणून ज्यांनी टिव्ही बंद केला ते खरे कर्मदरीद्री. पुण्यातल्या नेहरु स्टेडीयमवर श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधे जेव्हा चांगली सुरुवात करुन सचिन आऊट झाला होता तेव्हा नाराज होऊन मी स्टेडीयममधे थोडावेळ झोपलोही होतो. शेवटी पंचवीस एक बॉलमध्ये आपल्याला जिंकायला अठरा रन हवे होते, तू स्ट्राईकवर होतास. आमच्या पुढच्या रांगेतल्या एकजण म्हणाला अरे तीन सिक्स मार आणि संपवून टाक च्यायला. पुढच्या बॉलवर तू सिक्स मारलीस, त्याच्या पुढच्याही आणि तिसऱ्या बॉलवरही. जणूकाही तुलाच डोक्यावर घेतलंय अशा जोशात आम्ही त्या "तीन सिक्स मार आणि संपव" म्हणणाऱ्या माणसाला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचलो होतो. तेव्हा तू आवडायचास..खूप आवडायचास... तू कॅप्टन झालास आणि सिनियर प्लेयर्सला लागलेली गळती बघून तू आवडेनासा झालास. तू थंड डोक्याने, शांत चित्ताने खेळत राहीलास. सगळ्यांसमोर कितीही तुझ्यावर टिका केली तरी आतून तुझे हे गुण आवडले होते आपल्याला. कोणी कितीही टिका केली तरी तू तुझे संघसहकारी निवडलेस आणि सक्सेसफुल होत राहिलास. नव्यांना संधी दिलीस, भले ते तुझ्या मर्जीतले का असेनात, मैदानावर अक्षरशः जुगारंही खेळलास (पहिल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमधली जोगिंदर शर्माची लास्ट ओव्हर कोण विसरेल?) बऱ्याचदा यशस्वी झाले काहीवेळी चुकलासंही. हारलास तरी तितकाच स्थितप्रज्ञ जिंकलास तरी तितकाच, तुलाच ठाऊक कसं काय जमवलंस. टिम इंडिया असो की आय.पी.एल तू जिंकत राहीलास, मी तुझ्यावर टिका करत राहीलो. आय.पी.एल मध्ये तर तू आणि तुझे टिममेट्‌स धडाकेबाज खेळ्या करत अशक्यप्राय हा शब्दही फार छोटा वाटावा अशा मॅचेस जिंकत राहीलात. मीसुद्धा तुझा राग करतंच राहीलो, पण खरं सांगायचं ना तर तुझ्या खेळापेक्षा ते "सिनियर वर्सेस यू" या गोष्टीमुळे तो राग होता. पारंपारीक खेळ, तांत्रिकता आणि टिकाकार यांना फाट्यावर मारत तू जिंकत राहीलास, हारलास तेव्हाही पुढे चालत राहीलास, गांगुली नंतर संघाला तू जिंकण्याची खरी सवय लावलीस.
सचिन वन डेतल्या पहिल्यावहिल्या डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर ऊभा असताना एका बाजूने तूसुद्धा फटकेबाजी चालू ठेवलीस, एक वेळ तर अशी आली की सचिनला स्ट्राईकंच मिळेना, त्यावेळी मी म्याच बघत नव्हतो पण मित्र फोनवरुन आखो देखा हाल सांगत होते. प्रत्येक बॉलगणिक मी तुला जीव खाऊन शिव्या देत होतो, सचिनची डबल सेंच्युरी तुझ्यामुळे हुकणारंच असं वाटत होतं पण नाही सचिनला स्ट्राईक मिळाली आणि त्यानं रेकॉर्ड केलं. पण मुद्दाम असं करण्याईतका मनाचा कोतेपणा तर निश्चितंच कोणत्याच नॅशनल लेवलला खेळणाऱ्या प्लेयरमध्ये नसणारंच, तू कसा काय त्याला अपवाद असशील. वरची फळी अपयशी झाली तू भयंकर संथ खेळून चाळीसेक रन काढून स्वतःची बाजू सेफ करतोस आणि शेवटी हाणामारी करुन हिरो होयला बघतोस असं वाटत राहिलं नेहमीच पण कोणत्याही परीस्थितीत थंड डोक्यानं खेळणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही... तू जमवलंस, जवळपास नेहमीच. गांगुली, सेहवागची एक्झिट, युवराज टिम बाहेर बसणं आणि जडेजा, रैना, मुरली विजयला अपयश येऊनंही संधी मिळत राहणं यामुळे उत्तरोत्तर तुझा रागंच केला मी. पण फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव्ह म्हणतात ना तसं तुला नशिबानंही साथ दिली आणि तू मैदानावर तुझी धमकंही दाखवलीसंच. यश डोक्यात जाऊ न देणारा आणि अपयशंही तितक्याच शांतपणे पचवणाऱ्या धोनीवर माझ्यासारख्या कोणीही कितीही टिका करो पण वर्ल्ड क्रिकेटमध्ये तू तुझं एक अढळ स्थान निर्माण केलंस.
आजकाल तुझा खेळ पूर्वीसारखा आक्रमक राहीला नाहीये, शिव्या द्यायला आम्हाला चालूनंच आलीये संधी पण... महेंद्रसिंग धोनी आता तुझ्यावर कॅप्टंसीची जवाबदारी नाहीये, तू जसा तुझा काळ गाजवलास तसाच धडाकेबाज खेळत रहा... मला कितीही आवडत नसला तरीही पुढच्या वर्ल्डकपमध्ये धोनी संघात असावाच अशी माझी मनापासून ईच्छा आहे.
धोनी तू मला कधीच आवडला नाहीस... आजंही आवडत नाहीस... पण स्वकर्तृत्वावर तू शिखर गाठलंस, तिथे तळ ठोकलास तर आता जेव्हा कधी रीटायर होशील तेव्हा माझ्यासारख्या टिकाकारांची तोंड बंद करुन जोरदार खेळून बाहेर जावंस अशी मनापासून ईच्छा आहे... कोणाचाच पडता काळ बघायला आवडत नाही मला आणि तूही त्याला अपवाद नाहीस...
#HappyBirthdayMSD
Play Well, Enjoy Your Game!


केपी आर

Friday, June 23, 2017

लावू घोडा


चल काढू उणी दुणी
उडवू चिखल थोडा
विकासाच्या आयचा घो
जनतेलाही लावू घोडा

उभं राहू चौकात
आयला भाषण ठोकू
दुसऱ्याची चव्हाट्यावर आणू
स्वतःची मात्र झाकू

झुकून करु सलाम
हात देखील जोडू
मायला चार दिवस फक्त
मग गादीवर चढू

किंमत ठरवू पक्की
बोली लाऊ बोटाची
शे पाचशे रुपड्यात
खपाटीला गेल्या पोटाची

वाटून घेऊ रंग
हिरवे निळे भगवे
चढवू पांढरे डगले
विचार ठेऊ नागवे

तू घे मशिद
मी घेतो राम
रीकामचोट माथ्यांना
मिळू दे काम

ऐकल्यासारखं करु
थोडं रडल्यासारखं करु
पाठ थोपटतील ते
पाया पडल्यासारखं करु

विष पेरु पाडू फूट
माणसं उभ्यानं कापू
वस्त्या पेटतील रातसारी
आपण सुखानं झोपू

भाषा धर्म जात पात
अस्मितेला चढू दे धार
नरडीचा घेऊ दे घोट
अन आपल्यांवरही करु दे वार

निवडणूकीचा रंगवू फड
मतांचा बाजार मांडू
जिंकलो तर ठिकंच
नायतर म्हणू "नशिबंच गांडू"

निकालाच्या पलिकडे
मांडवली करु
गळ्यात घालू गळे
अन एकमेका साह्य करु

टेंडर बिंडर पैसा बियसा
आडवा हात मारु
ठासून भरु खिसे
च्यायला सगळ्यांचा घात करु

विकासाच्या नावाखाली
रींगणात उतरु यंदा
चुतिया बनवू एकेकाला
तेजीत चालू दे धंदा

बदल घडवायचा एकेकात
असतो रेहमानी किडा
मतदान करुन घंटा फरक पडणारे थोडा?
याला नडा त्याला फोडा
प्रश्न विचारणाऱ्याला जित्ता गाडा
होऊ दे झोकात शक्तिप्रदर्शन
जमंल तेवढा करु की राडा
अरे विकासाच्या आयचा घो
जनतेला तर लावूच घोडा

केपी आर

ह्याशट्याग माजलेत साले

ओ तुम्हीच हो हो तुम्हीच
मगाशी नाही का हाॅटेलात
खाल्लीत पावभाजी...
२० रुपयाच्या प्लेटसाठी
मोजले शे-दिडशे
चौघांचे पाच-सातशे
मग बिलाबरोबर आलेली बडीशेप
बकना भरुन खाल्लीत
तरी थोडी उरलीच मागं
आयला पैसे वसूल करायचे म्हणून
बांधून घेतलीत ती टिश्श्यू पेपरमध्ये

परवा पण नाही का
आयनाॅक्समध्ये लाह्या घेतल्यात
दोनशे रुपयांना
आणि तोटरा बसतो म्हणून
फुलपात्रभर कोक घेतलात कागदाच्या कपात
रोख दिडशे मोजून
स्ट्राॅचा फुर्र फुर्र आवाज होईस्तवर
ओढलंत जीव खाऊन कोल्ड्रींक
निघण्याआधी घासलंत कार्ड बिल भरायला
खिशात कार्डाची थप्पी नीट जपत तुम्हीच म्हणाला होता नोटाबंदीच्या वेळी
जरा सोसा की कळ देशासाठी तिच्यायला

चौकातल्या भाजीवाल्याकडं थांबून
गाडीची काच खाली केलीत बटन दाबून
म्हणलात सुकून गेलीये पार भाजी
पिशवी भरुन घेताना हक्कानं सांगितलंत
सव्वा दोनशे नाही दोनशेच देईन
शंभराच्या दोन नोटा त्याच्या हातात
कोंबून निघत असताना
रस्त्याच्या कडेला फाटक्या पुस्तकात
डोकं घालून बसलेलं त्याचं पोरगं चोरुन बघत होतं
काचा वर करुन एसीत बसलेल्या
तुमच्या पोराच्या हातातल्या खेळण्याकडं
तुम्ही गाडी चालू करता करता म्हणालात बायकोला
भाजीपाला काय महाग झालाय
बायको म्हणाली तरी तुरीसाठी
बोंब मारतायेत साले

सकाळी साडे आठ वाजता आॅफिसमध्ये पोचताच म्हणालात
ए अरे तो एसी बावीसवर कर, कोण चुत्या वाढवतं रे टेमपरेचर
संध्याकाळी कार काढताना
पंधरा सेकंद काचा खाली घेयचा सोपस्कार पार पाडत वाढवलात एसीचा ब्लोअर
पुटपुटलात स्वतःशीच काय उन्हाळाय च्यायला
रेडीओवर आरजे प्रसिद्ध क्रिमिनल लाॅ़यरला (?) विचारत होती
शेतक-यांनी संप का केलाय?
लाॅयर म्हणाला त्यांना क़र्ज़माफ़ी पाहिजे म्हणून
तुम्ही कुत्सितपणे हसून स्टेशन बदललंत
पलिकडच्या स्टेशनावर बादशाह म्हणत होता
जानूsss आज रात का सीन बना ले
तुम्ही स्टेअरींगवर ठेका धरलात

तुम्ही... झालंच तर अप्रेझलच्या मिटींगमध्ये
बसलात आडून अॅडीशनल २.५% पगारवाढीसाठी
म्हणालात, सर परवडत नाही
वर्षभर खपून काम केल्यावर फक्त ८% पगारवाढ
राजीनामा देईन म्हणालात निक्षून
वाढीव अडीच टक्के पदरात पाडून घेऊन
मग घरी आलात जेत्याच्या आविर्भावात
टिव्हीवर लावल्यात बातम्या पोट भरुन जेवण झाल्यावर
चोवीस तास बातम्यांचं दळण पाडणारं एक च्यानंल सांगत होतं
शेतक-यांच्या संपाचा आज पहिला दिवस...
बळीराजानं आक्रमक होत दूध भाजीपाला ओतला रस्त्यावर
तुम्ही डायनिंग टेबलवरची मगासची भाजीची पिशवी फ्रिजमध्ये ठेवलीत
बायकोला म्हणालात बरं झालं मगाशीच घेतली आठवडाभराची
हाॅटेलात थेटरात आॅफिसात अन झालंच तर कोप-यावरच्या फाटक्या भाजीवाल्याकडं तुमचे पैसे वसूल झाल्याचं समाधान चेह-यावर मिरवत
परत येऊन सोफ्यावर बसत
फ़ेसबुक चालू केलंत
स्टेटसमध्ये लिहिलंत
"हा खरंच संप आहे का? अन्नाची नासाडी करणारा माजोर्डा अन्नदाता असूच शकत नाही... ह्याशट्याग माजलेत साले...



केपी आर

सामान्य माणूस


यापेक्षा जास्त करुही काय शकतो सामान्य माणूस?
कपाळावरच्या शिरा तटतटेस्तोवर चिडेल
नाहीच झालं सहन तर हाताच्या मुठी आवळून घेईल जीव खाऊन
फारतर आपटेल आवळलेली मूठ, सहन होण्याईतपतंच जोरात
तरीही नाहीच गेला राग तर घालेल शिव्या कचाकचा
नाहीतर ओकेल भडभडा सगळं फ़ेसबुक ट्विटर वाॅट्सॅपवर
येणा-या कमेंट्सवर तावातावानं करेल चर्चा
रात्री पाठ टेकण्याआधी "भोकात गेले सगळे" म्हणत पंख्याचा स्पीड वाढवेल
दुस-या दिवशी उठून चालू लागेल नाकासमोर
परत शिरा तटतटेस्तोवर..

केपी आर

कल्लोळ

देव-धर्म, श्रद्धा अंधश्रद्धा
भक्ति, विश्वास
पैसा-अडका, पे पॅकेज, श्रीमंती
माणसं, पै-पाहुणे, प्रेम, माया
काही म्हणजे काहीही
माणसाचा जीव वाचवू शकत नाही
मरणानं प्रश्न सुटत नाही
आणि जगून ऊत्तरं मिळत नाहीत
जगण्या मरण्यातलं अंतर
श्वासांनी भरावं म्हटलं तरी भरत नाही
वर्षानुवर्ष जगूनंही उद्याची खात्री देऊ शकत नाही तू
शाश्वत जर असेलंच काही तर आहे फक्त मृत्यू
मरणाच्या सुन्न शांततेएवढा कर्णकर्कश्श...
जगण्याचा कल्लोळ नाही...!

केपी आर

याद है

कसमों में बंधे थे.. याद है?
कुछ तो याद होगा...
कुछ भी नहीं है तो..
अगर फिर कभी मिले तो पेहचानेंगे कैसे?
पहली बार मिले थे
तब भी तो अनजान नहीं थे
नजाने अब के मिलेंगे तो
अनजान कैसे होंगे
बतायेंगे नही
जतायेंगे नही
सिर्फ़ आँखों से छू लेंगे रुह को
वोह अनजाने, जो कभी
एक दुसरे की पेहचान हुवा करते थे
वोह जिन्हें याद तो सबकुछ है
लेकीन येह भूल गये है के
कुछ यादें न भुलायी जाती है न मिटायी
वोह दफ़्न होती है अपने साथ
देखना मेरी क़ब्र पे पौधा आयेगा... "फूलों का"
.
.
.
.
.
.
.
.
.
वो भी येही पूछेगा तुम्हें एक दिन....
"याद है"?


केपी आर

पत्ते


जहाँ पे मिला करते थे हम
इक अरसे से, वहाँ जाना छोड़ दिया है
बड़ी मुश्किल से, वही इक पेड़ के नीचे
दफना दिया था यादों को
न जाने क्यू
उसी पेड़ के शाखों से गिरते पत्ते
हवा का रुख़ भूला के
मेरे आँगन में आते है... आज भी!

केपी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...