Saturday, September 2, 2017

नोटाबंदी - कागज का टुकडा


स्वतंत्र भारताचा ईतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ८ नोव्हेंबर २०१६ सर्वार्थाने एक गौरवास्पद, सुवर्णदिवस म्हणून ओळखला जाईल.
याच दिवशी भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी काळा धंदावाल्यांचं कंबरडं मोडणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि देशातल्या हजार पाचशेच्या सगळ्या नोटा त्या रात्री बारापासून निव्वळ "कागज का टुकडा" बनून गेल्या.
मोदीजी म्हणजे पराकोटीची स्वच्छ प्रतिमा, आतोनात निर्मळ अन हळवं मन शिवाय जात्याच कनवाळूपणा ओतप्रोत भरुन असलेले एक दुर्मिळ राजकीय नेतृत्व. याउपर की काय म्हणून चूकणे या शब्दाला त्यांच्या शब्दकोशात स्थानंच नाही. ते घेतील तो निर्णय ते करतील ती कृती हि सदासर्वदा केवळ बरोबरंच असते. त्यांच्या करारी चेहऱ्याच्या ९ किलोमीटर आजूबाजूच्या व्यासामध्ये चूक चूकुनंही फिरकतसुद्धा नाही. २०१४ साली भक्तगणांना होलसेलमध्ये वाटलेल्या शब्दकोशांमध्ये पर्फेक्शन या शब्दाचा अर्थ नमो किंवा मोदीजी असा देण्यात आला आहे आणि तो गेल्या तीन साडेतीन वर्षात घोकून घोकून पाठ करुन घेण्यात ते यशस्वीही झाले आहेत. तर या अशा निष्कलंक, निस्वार्थी, कनवाळू पंतप्रधानांनी जनतेच्या हितासाठी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चूकीचेच आणि धातांत खोटे उद्देश गेल्या दहा महिन्यात काही समाजकंटकांनी आणि विघ्नसंतोषी लोकांनी समाजात पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. काय तर म्हणे नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैश्याला आळा घालण्यासाठी, कॅशलेस व्यवहार रुजवण्यासाठी, लेस कॅश पद्धती आणण्यासाठी, पडून सडणारा पैसा व्यवहारांच्या मुख्य स्रोतात आणण्यासाठी आणि यावर कडी म्हणून की काय तर दहशतवादाला आळा घालण्यासाठी घेण्यात आला होता. माननीय मोदीजींनी कधीही त्यांच्या भाषणात अथवा प्रेस रीलीजमध्ये यापैकी एकंही उद्देश जाहीररीत्या सांगितलेला नाही याची सर्वांनी नोंद घेऊन या बोलभांड मिडीयाचा निषेध करणं तर गरजेचंच आहे पण यापुढे जाऊन या असल्या ब्रिगेडी मिडीयावर बहिष्कार घालणंही तितकंच महत्वाचं आहे. मूळात समाजकंटकांना सतर्क होण्याची संधी न देता हळूच नोटाबंदीचा थोर उद्देश गुपित ठेऊनंच साध्य करुन घेण्याचा मोदीजींचा मानस होता पण त्यांच्यावर चहुबाजूंनी होणारी बोचरी टीका जिव्हारी लागल्याने आणि आता सहनशक्तीच्या पलिकडे हे सगळं जात असल्याने आम्ही या उद्देशांच्या मूळाशी जाऊन सगळ्यांपुढे हे उद्देश जाहिररीत्या मांडण्याचं ठरवलं आहे. तर बोलभांड आणि विकाऊ मिडियावर विश्वास न ठेवता आपला सद्‌सद्‌विवेक जागा ठेऊन हे उद्देश वाचावे, समजावे आणि जमेल तितक्या समविचारी लोकांपर्यंत पोहोचवावे हि मनःपूर्वक विनंती.
नोटाबंदीचे मूळ व आजवर गुपित ठेवलेले उद्देश खालीलप्रमाणे

१. वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे - नोटाबंदी करताना मोदीजींनी हे स्पष्ट केलं की ही बंदी त्या रात्री बारा वाजल्यापासूनंच होईल. अन हे जाहिर केलं तेव्हा बँका, ऑफिसेस, दुकानं वगैरे ऑलरेडी बंद झाली होती. त्यामुळे खिशात असलेला अमाप काळा पैसा उरलेल्या चार तासात कसा खर्च करायचा याची कोणालाच टोटल लागत नव्हती. काळा पैसावाले ईतके धास्तावले की त्यांच्या हृदयाचे ठोके अपरीमित प्रमाणात वाढले आणि मनुष्य जेव्हा आतोनात चिंताग्रस्त असतो तेव्हा त्याची प्रजनन क्षमता दिडशे पट कमी होते हे वर्षानुवर्षाच्या अभ्यासाअंति स्पष्ट झालेलं आहे. शिवाय जुन्या नोटा एकतर बँकेत जमा करणं किंवा त्यांची योग्य ती विल्हेवाट लावणं आणि नव्या नोटा एटीएम मधून काढणं यांत रात्रंदिवस अडकलेल्या जनतेच्या डोक्यात दुसरी कोणतीच गोष्ट येणं शक्य नसल्याने लोकसंख्येला आपसूकंच खिळ बसली. याव्यतिरीक्त मरायला टेकलेले लोक एटीएमच्या रांगेत येऊन येऊन पट्टकन खपल्याने त्यांनाही लवकर मोक्ष प्राप्ती झाली आणि गेल्या सत्तर वर्षातल्या प्रजनन दराशी तुलना केल्यास गेल्या दहा महिन्यातला प्रजनन दर हा किमान एकशे अठ्ठ्या‌ऐंशी टक्क्याने कमी झाल्याचा अहवाल नासाने दिला आहे. यावरुन हे निर्विवादपणे सिद्ध होतं की लोकसंख्या नियंत्रण हा नोटाबंदीच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आहे.

२. जागतिक तापमानवाढीत घट करणे - जागतिक तापमानवाढ ज्याला आपण सगळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ही आजच्या घडीला भारतंच नाही तर अवघ्या जगाला भेडसावणारी समस्या आहे. एकीकडे प्यारीस करार, ईथल्या परीषदा तिथल्या परीषदा वगैरे करत बसणारे निष्क्रीय नेते आणि एकीकडे थेट कृती करणारे आपले धडाकेबाज माननीय मोदीजी. आपण ज्या एटीएममधून पैसे काढतो त्या एटीएममध्ये वातुनुकुलित यंत्रणा २४ बाय ७ चालू ठेवावी लागते. वर्षानुवर जुन्या झालेल्या नोटा या एटीएम मशिनमध्ये ठेवल्याने त्या चार बाय चार खोलीतल विशिष्ट तापमान ठेवण्यासाठी वातुनुकुलित यंत्रणेची जास्तीत उर्जा खर्च होते. नव्या नोटांच्या तुलनेत ही उर्जा किमान चौसष्ट टक्के जास्त लागते. सगळ्या जुना नोटा सरसकट बाद केल्यामुळे फक्त एटीएमंच नाही तर बँका, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यलयं शिवाय सार्वजनिक वाहतुक करणारी वाहनं आणि वातानुकुलित खाजगी वाहनं, जिथे जिथे म्हणून कॅश जुन्या नोटांच्या स्वरुपात हाताळली जात होती तिथे उर्जा वाचवून तापमानवाढ रोखण्याकडे एक महत्वाचं पाऊल मोदीजींनी उचललं आहे. आणि काल-परवाच आलेल्या जागतिक पर्यावरण रक्षण संस्थेच्या अहवालामध्ये मागच्या दिडशे वर्षांच्या तुलनेत ९ नोव्हेंवर २०१६ पासून मोजलं असता भारतातील तापमानवाढ उणे २४ टक्के एवढी नोंदवली गेल्याचं म्हटलं आहे.

३. तात्काळ ट्रिपल तलाकवर बंदी - मुस्लिम महिलांचे आयुष्य बरबाद करणारी तात्काळ ट्रिपल तलाक ही प्रतिगामी पद्धत रद्दबातल ठरवणे हे एक मोठ आव्हान देशाच्या नेतृत्वापुढे होतं. तात्काळ केलेल्या नोटाबंदीमुळे आतोनात समस्यांना तोंड द्यावं लागल्याने, तात्काळ घेतलेले निर्णय हे किती त्रासदायक होऊ शकतात हे ट्रिपल तलाकच्या खटल्यावर काम करणाऱ्या न्यायाधीशांच्या पॅनेलला समजल्याने त्यांनी विनाविलंब तात्काळ ट्रिपल तलाक पद्धतीवर बंदी आणली. ईतर धर्माचा तिरस्कार करतात असा सरसकट आरोप मोदीजींवर करणाऱ्या अंध विरोधकांना ही सणसणीत चपराक आहे.

४. साथीच्या रोगांना आळा घालणे - आजवर अगदी शालेय जीवनापासून आपण शिकत आलो आहोत की साथीच्या रोगांचा प्रसार हा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन विषाणू पसरल्यानं होतो. जुन्या नोटांच्या पृष्ठ्भागाच्या कित्येक थर खालपासून लाखो करोडो साथीच्या रोगांच्या विषाणूंची पैदास होऊन आणि सूक्ष्मस्तरावर ते विषाणू साठून राहिले असून त्या नोटांच्या देवाण घेवाणीतून साथीच्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं ईस्रोच्या २०१५ सालच्या वार्षिक अहवालात स्पष्टपणे नमूद केलं गेलं होतं. गेल्या सत्तर वर्षात फक्त उपग्रहांच्या उड्डाणांचे श्रेय लाटणाऱ्या नेतृत्वापेक्षा आपण वेगळे असल्याचा पुरावा मोदीजींनी या धडाकेबाज निर्णयातून दिला आहे.

५. सचिन तेंडूलकर आणि रेखाची राज्यसभेतली उपस्थिती वाढवणे - आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर राज्यसभेचं सदस्यत्व मिळवून, राज्यसभेत नाममात्र हजेरीही न लावणारे आणि त्यांना मिळालेला निधी तसाच सडू देणाऱ्या सचिन व रेखा यांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी राज्यसभेत किमान ८०% हजेरी अनिवार्य केल्याची गोपनीय बातमी आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून स्वतंत्र भारताच्या ईतिहासात लोकप्रिय सेलेब्रिटींच्या बाबतीत कठोर निर्णय घेणारे मोदीजी हे पहिले आणि एकमेव पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत गोल्ड स्पॉट बूक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये त्यांची नोंद झालेली आहे.

६. शेतकरी बांधवांना सहकार्य, गोमातेचं रक्षण व सोन्याच्या निर्मितीत वाढ - जुन्या नोटा या फक्त कागदाच्या लगद्यापासून बनवल्या नसून त्यामध्ये निरनिराळी रसायनं मिसळलेली होती शिवाय त्यामध्ये साथीचे रोग पसरवणारे लाखो करोडो विषाणू साठले होते. या अशा विषाणूग्रस्त नोटा जेव्हा फाटायच्या आणि त्यांची विल्हेवाट लावली जायची तेव्हा त्यातलं रसायन भूगर्भात जाऊन जमिनीचा कस कमी होत होता, फाटक्या नोटा गायींनी खाल्यामुळे त्यांच्या पोटात घातक रसायनं जात होती. भारतातल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार गायीच्या शेणामध्ये सोन्याचे कण असतात हे  यापूर्वीच पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. रसायनयुक्त नोटा खाल्ल्यानं गायींची शेणावाटे सोनं निर्माण करण्याची क्षमता गेल्या पंनास वर्षात आतोनात कमी झाली होती. नव्या नोटा ईको फ्रेंडली आहेत, त्यामध्ये फक्त हिरव्या वनस्पती असल्याने त्या खाल्ल्यावर गायींच्या पोटावर कोणताही विपरीत परीणाम होणार नाही तसेच ईको फ्रेंडली नोटांची विल्हेवाट लावताना रसायनं जमिनीत जात नसल्याने जमिनीचा कसंही सुधारण्यात मदत होत आहे. जमिनीचा कसं सुधारल्याने शेतकरी बांधवांना अप्रत्यक्ष मदत झाली आहे, विषाणूंपासून गायींचं संरक्षण होत आहे आणि पर्यायाने सोन्याच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. मोदीद्वेष्टे मात्र जीडीपीमध्ये घट झाल्याची खोटी बोंब ठोकत आहेत.

नोटाबंदीमागे याव्यतिरीक्त सहज लक्षात न येण्याजोगे, गोपनीय मात्र जनतेच्या हिताचे अगणित चांगले उद्देश दडलेले आहेत. येत्या काळात याची परीणिती आपणा सर्वांनाच येईल आणि आज या निर्णयावर कितीही टीका झाली तरीही ईतिहासात या निर्णयाची नोंद एक लोकहितवादी निर्णय म्हणूनंच होईल याची आम्हाला खात्री आहे, तोवर टिकाकारांनी काळा पैसा, दहशतवादाला आळा, केशलेस वेग्रे म्हणून मनगटाला चूना लावून खुशाल बोंबलत रहावं.

जय हिंद! भारत माता की जय!

केपी आर.

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...