गेले काही महीने माझा
ऑफिसचा वर्कलोड भरपूर वाढल्यामुळे माझं वर्कआऊट करणं बंद झालं होतं. लाॅकडाऊनच्या
सुरुवातीपासून मी नियमित व्यायाम करत होतो पण मिड जूनपासून हळूहळू अनियमित होत होत
व्यायाम बंद झाला. ऑगस्टमध्ये मात्र मी मनातून ठरवलं कितीही वर्कलोड असला तरी
व्यायामासाठी रोज थोडातंरी वेळ काढायचाच आणि मी महिन्याच्या मध्यापासून परत
व्यायामाला हळूहळू सुरुवात केली.
होम वर्कआऊटची सवय असूनंही
परत सुरुवात करणं तसं आव्हानात्मक गेलं. हळूहळू नियमित होत होत मी थोडा थोडा व्यायाम
वाढवत होतो. २३ तारखेला रात्री फारसा हेवी वर्कआऊट न करुनंही मला दमल्यासारखं वाटत
होतं. त्या रात्री घरातल्या आरतीच्यावेळी मला थोडीशी धाप लागल्यासारखी वाटली, पण वाटलं
वर्कआऊट करुन लगेच पोटभर खाल्ल्यामुळे असं झालं असेल. पुढच्या पाचेक मिनिटांत धाप थांबली
आणि मी ते विसरुनंही गेलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार २४ ऑगस्टला दुपारी काम करताना
जरा थकल्यासारखं वाटत होतं. अंगात आळस भरल्यासारखं वाटत होतं, वाटत होतं सगळं सोडून
फक्त लोळत रहावं, कोणीतरी अंग चेपून द्यावं. ऑफिसचं काम असल्यामुळे मी त्या सगळ्याकडे
दुर्लक्ष करत तसंच काम रेटत राहीलो. त्यादिवशीचं काम संपवलं आणि रात्री जेवण करायला
बसण्याआधी पूर्ण गळून गेल्यासारखं वाटू लागलं, लोअरबाॅडी अचानक खूप दुखू लागली. भूक
तर लागली होती, तसंच जेवण केलं आणि पॅरासीटॅमाॅल घेऊन झोपलो. रात्रभर शांत म्हणावी
अशी झोप लागली नाही. लोअरबाॅडी दुखतंच होती. अगदी पाठीवर झोपलो तर शाॅर्टची लेसंही
कमरेत रुतुन कंबर दुखत्येय असं वाटू लागलं. सकाळी उठलो तेव्हा अंगदुखी कमी झाली होती.
त्यादिवशी जरा उशिरा आंघोळ केली, अंगदुखी नव्हती पण अंगात भयंकर आळस भरला होता, काहीही
करायची ईच्छा होतंच नव्हती. दिवस असाच गेला, रात्री सहज म्हणून ताप चेक केला तर ९८.७
च्या आसपास होता. ताप नाही पण अंग परत दुखू लागलं होतं. परत औषध घेऊन झोपलो, सकाळी
जसा उठलो तसा अंथरुण पांघरुण घेऊन तळमजल्यावर स्वतःला आयसोलेट केलं. ताप नसला तरी अंगदुखी
होती आणि आता खूप अशक्तपणा जाणवू लागला होता. थोड्यावेळाने डाॅक्टरला फोन केला तर त्यांनी
सांगितलं फोनवर बोलण्यासाठी संध्याकाळची वेळ राखून ठेवलीये, संध्याकाळी पाचनंतर फोन
कर. दिवसभर तसंच ऑफिसचं काम केलं. संध्याकाळी १००.६ ताप आला होता. त्यादिवशी डाॅक्टरांना
परत परत फोन करुनंही संपर्क होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी ताप अंगदुखी वाढली, सकाळी
डाॅक्टरांकडे गेलो तेव्हा १०१ च्या आसपास ताप होता. तीन दिवसासाठी ॲंटीबायोटीक्स आणि
बाकी काही औषधं देऊन डाॅक्टरांनी घरी पाठवलं, म्हणाले ताप उतरला नाही तर टेस्ट करुया.
तोपर्यंत मलाही वायरलंच असावं असं वाटंत होतं.
एक दिवसभर औषधं घेतल्यानंतर
ॲंटीबायोटीक्समुळे जुलाबंही चालू झाले. जेवायची ईच्छा होईनाशी झाली, अंग तर दुखतंच
होतं. औषधं घेतल्यावरंही ताप उतरायला दोन-सव्वा दोन तास लागत होते आणि त्यानंतर लगेचंच
तीनेक तासात परत सणकून ताप येत होता. तीन दिवस गेले पण ताप कणभर कमी नाही झाला. मग
मात्र आम्ही सबर्बन लॅबला फोन करुन ३१ ऑगस्टला टेस्ट करुन घेतली.
त्या दिवसापर्यंत मी सगळं
व्यवस्थित पाळत होतो, एकतंर कुठेच जातयेत नव्हतो आणि बाहेर गेलोच तर सोशल डिस्टंसिंग,
परत आल्यावर कुठेही स्पर्श न करता साबणाने हात स्वच्छ धुणे, मास्क धुवायला टाकणे सगळं
तंतोतंत पाळत होतो. एकटा तर एकदाही कुठेच गेलो नव्हतो. बायकोला कसलेही सिंप्टंम्स नसणं
हा त्यामुळेच आशेचा किरण होता. टेस्ट केल्यावर पूर्ण दिवसभर आपण कुठे चुकलो कोणाच्या
संपर्कात आलो? याचा विचार करण्यात गेला. काहीही केल्या आठवत नव्हतं की कुठे चूक झाली
असावी ते. एकूण लक्षणं बघता टेस्ट पाॅजिटीव्हंच येण्याची शक्यता जास्तं वाटत होती.
दरम्यान ताप कमी होत नसल्याने डाॅक्टरने ॲंटीबायोटीक्स बदलून दिले होते पण ताप जराही
कमी झाला नव्हता, वास येत नाहीये असं वाटत होतं पण ते वाटत होतं की वास येणं खरंच बंद
झालं होतं हे कळेना. दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबरला माझा कोव्हिड रीपोर्ट पाॅजिटीव्ह आला
आणि मला कोव्हिड असल्याचं शिक्कामोर्तब झालं. घरातून कुठेच न जाता, जेव्हा जेव्हा गेलो
तेव्हा १००% सोशल डिस्टंसिंग पाळूनंही मला कोव्हिड झाला. खूप खूप विचार करुनंही नेमकं
कुठे काय चुकलं ते आठवेना.
आता घरच्या सगळ्यांची टेस्ट
करायचं ठरलं. त्यांचे स्वाॅब सॅंपल्स दिल्यानंतर पूर्ण दिवसभर किमान त्या सगळ्यांचे
रीपोर्टस निगेटीव्ह यावे असं वाटत राहीलं. आता मला औषधं चालू करुन सहा दिवस झाले होते,
दोन वेगवेगळे ॲंटीबायोटीक्स घेऊनंही ताप कमी झाला नव्हता. त्या रात्री परत एकदा डाॅक्टरने
ॲंटीबायोटीक्स बदलले. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबरला घरच्या सगळ्यांचे रीपोर्टस आले. माझी
६७ वर्षांची आई, बायको आणि ३ वर्षांची मुलगी तिघींचे रीपोर्टस पाॅजिटीव्ह आले होते.
६ वर्षांचा मुलगा आणि मुलांना संभाळणाऱ्या मावशी दोघांचे रीपोर्टस निगेटीव्ह आले. मावशी
त्यांच्या घरी गेल्या आणि लेकाची रवानगी लगेचंच माझ्या काकाच्या घरी केली. आता घरात
सगळेच कोव्हिड पाॅजिटीव्ह असल्यामुळे मी तळमजल्यावरुन परत घरात आलो. मी सोडून बाकी
सगळे जवळपास असिंप्टमॅटीक असल्यामुळे सगळेच होम क्वारंटाईन झालो. घरात लहान मुलं आहेत
आई वयस्कर आहे म्हणत ईतके महीने जे होऊ नये म्हणून जपलं ते आमच्या नकळत जवळपास पूर्ण
कुटुंबाला झालं होतं. कोव्हिडचा सामना हा दोन आघाड्यांवर करावा लागतो म्हणतात त्याचा
प्रत्यय आला. शारिरीक त्रास तर होताच पण मानसिक पातळीवर कोव्हिडला सामोरं जाण्यासाठी
कणखर असणं तेवढंच गरजेचं असतं हे कळू लागलं. मानसिकरीत्या स्ट्राॅंग राहणं काय अवघड
नाही असं नेहमी वाटायचं पण कोव्हिड जेव्हा घरात आला तेव्हा कळलं की ते वाटतं ईतकं सोपं
निश्चितंच नव्हतं. सर्वप्रथम आमच्या पिडीयाट्रीशियन ज्या आमच्या नातेवाईकंही आहेत त्यांनी
आम्हाला समजावून सांगितलं की लहान मुलांना काहीही औषधोपचाराची गरज नसते. ताप आला तर
पॅरासिटॅमाॅल देणे, याव्यतिरीक्त शक्यतो बाकी काही देण्याची गरज पडत नाही. त्यानंतर
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा पिडीयाट्रीक सेक्शनचा एक विडीयो पाहीला त्यात त्यांनी
लहान मुलांना सतत काही ना काही वॅक्सिनेशंस चालू असल्याने त्यांची प्रतिकारशक्ति खूप
चांगली असते आणि त्यांना कोव्हिडचा शक्यतो काही त्रास होत नाही हे सांगितल्यामुळे शिवाय
मुलीला त्रास होत नसल्याने आणि ती फुलाॅन एनर्जेटीक असल्यामुळे काळजी बऱ्याच अंशी कमी
झाली.
आई ६५+ असल्याने आता काळजी
फक्त आईची वाटत होती, वाटत होतं एखाद्या चांगल्या हाॅस्पिटलमध्ये जाऊन पूर्ण चेकअप
करुन घ्यावं, त्यांनी घरी उपचार करायला फिट आहे सांगितलं तर ठीक नाहीतर हाॅस्पिटलाईज
करुन उपचार करावे. पण आईने पूर्णपणे या गोष्टीला विरोध केला, तिला एकट्याने हाॅस्पिटलमध्ये
राहण्याची भयंकर भीती वाटत होती. हो-नाही हो-नाही करत आम्ही काॅर्पोरेशनने सांगितल्याप्रमाणे
सगळेजण होम क्वारंटाईन झालो.
खूपजणांनी सतत एकंच गोष्ट
बजावून सांगितली होती की काहीही झालं तरी ऑक्सीजन लेवल सतत तपासत रहा. तसं मी दरतासाला
तपासून नोंद ठेवत होतो. ईतके दिवस ९०+ असायला हवी हे कळलं होतं पण होमक्वारंटाईन झालो
आणि काही डाॅक्टरांनी आणि मित्रांनी सांगायला सुरुवात केली की ९४च्या खाली ऑक्सीजन
येणं चांगलं लक्षण नाही. काहीही झालं तरी ९४ च्या खाली येता कामा नये. हे सतत ऐकून
मला असं वाटू लागलं होतं की आपली ऑक्सीजन लेवल नक्कीच ९४च्या खाली येणारंच. मग ऑक्सीजन
लेवल चांगली राहण्यासाठी डीप ब्रीदींग एक्झरसाइजेस, पालथं झोपणे, प्राणायाम आणि दिनानाथ
हाॅस्पिटलने रीलीज केलेले काही हलके व्यायाम करायला सुरुवात केली. ४ सप्टेंबरला दिनानाथच्या
होम आयसोलेशन वाॅर्डला जाऊन पूर्ण चेकअप करुन आपण होम आयसोलेशनसाठी फिट असल्याची खात्री
करुन घेतली. तीन मिनिट चालून ऑक्सीजन लेवल ९७ आल्यावर थोडं रीलीव्ड फिल होऊ लागलं.
४ तारखेला ताप आला ९९ पासून सुरु झाला ते १०१.५ वर स्थिरावला. एक तासाभराने औषध न घेता
कमी झाला आणि दोन-अडीच तासांनी कसलंही औषध न घेता पहिल्यांदाच ताप पूर्णपणे उतरला आणि
तेव्हापासून ताप येणं थांबलं.
थोडं थोडं करत तब्येतीत प्रगती
होऊ लागली आणि घरातले बाकी सगळे जवळपास असिंप्टमॅटीक असल्यामुळे त्यांना जुजबी औषधं
दिली होती. एकूण लागोपाठ दहा दिवस ताप आला, जवळपास ते दहाही दिवस जुलाब होत होते, सुरुवातीचे
सहा एक दिवस जाम अंगदुखी होती, मग अंगदुखी कमी होत गेली, पहिल्या दोन दिवसानंतर पहाटे
घसा दुखायला सुरुवात झाली, अजून दोन दिवसांनी घसा दुखणं कमी झालं पण थोडाही दीर्घ श्वास
घ्यायचा प्रयत्न केला तर घशात एका बाजूला दुखायचं आणि दीर्घ श्वास घेणं शक्य होत नव्हतं,
हळूहळू तेही कमी झालं पण एका मर्यादेनंतर दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर खोकला
यायचा, तरीही मी दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करतंच राहीलो, लक्षणं दिसायची सुरुवात
झाल्यापासून बाराएक दिवसांनी प्रयत्नपूर्वक दीर्घ श्वास घेणं शक्य होऊ लागलं दीर्घ
श्वास घेतल्यावर खोकला येणं बंद झालं. २४-२५ ऑगस्टला एकेक करत दिसू लागलेली लक्षणं
आता जवळपास बरी झालीयेत, थोडा कोरडा खोकला आहे आणि त्यासाठी डाॅक्टरांनी प्रिस्क्राईब
केलेली औषधं आणि आजीबाईच्या बटव्यातले घरगुती उपचार घेणं चालू आहे.
शारिरीक आणि मानसिक पातळ्यांवर
परीक्षा बघणारे गेले दोन आठवडे होते. लक्षणांवर ईलाज केला असला तरी अशक्तपणा अजूनंही
खूऽऽप आहे, पाच-दहा पायऱ्या चढउतार केल्या तरी दमछाक होतेय, घरात अगदी छोटंसं काम करुनंही
अगदी गळून गेल्यासारखं वाटतंय. ज्यांना कोव्हिड होऊन त्यातून ते बरे झालेत आणि मेडिकल
प्रॅक्टीशनर्स सगळयांचे म्हणणं आहे की अशक्तपणा जायला वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी
लागू शकतो. ऑफिसकडून कामावर परत कधी रुजु होणार याबद्दल विचारणा सुरु झालीये. गेल्या
दहा दिवसात ऑफिसने कामाबद्दल कसलीही गोष्ट न विचारणं हीसुद्धा एक सुखद बाब आहे. वर्कफ्राॅमहोम
असलो तरीही काम सुरु करुन १२-१४ तास काम करण्याबाबत आत्ता तरी मनात साशंकता आहे. कंटीन्यू
२-३ तासाच्यावर बैठक आणि काम इतक्यात तरी जमेल असं वाटत नाहीये. डाॅक्टरांच्या सल्ल्याने
काम रीझ्युम करण्याबद्दल ठरवेन.
गणपतीला हत्तीचेच धड का लावले,
हत्तीला मारताना वाईट वाटलं नाही का, रीया चक्रवर्ती, कंगना वगैरे निरर्थक गोष्टींवर
फेसबूकवर चर्चा झडत असताना माझ्या घरात जवळपास सगळे कोव्हिड पाॅजिटीव्ह झाले होते.
निगेटीव्ह पोस्टस आणि बातम्यांचा होणारा भडीमार थांबवण्यासाठी मी फेसबूक डीॲक्टीवेट
केलं, वाॅटसॅपवरचा एकंही फाॅरवर्डेड मेसेज वाचला नाही. कोव्हिडमध्ये होणारा शारिरिक
त्रास आणि मानसिक थकवा बघता कोणत्याही मेसेजला रीप्लाय करण्याची एनर्जी आणि ईच्छा दोन्हीही
नव्हती. फोन उचलून बोलण्याची ताकद वाटत नव्हती आणि ईच्छा त्याहूनंही नव्हतीच. मित्र
नातेवाईक आपुलकीने चौकशी करण्यासाठी फोन करत होते पण फोन अटेंड करुन करुन एनर्जी डाऊन
होत होती. मी पहिले काही दिवस फोनवर बोलणं पूर्ण टाळलं होतं, वाॅटसॅप बघत नव्हतो. त्याकाळात
सर्वांनी समजून घेतलं, फोनला उत्तर देत नाही म्हणून कोणीही गैरसमज करुन घेतला नाही.
मला लिटरली फोनकडे बघायचीही ईच्छा होत नव्हती. रीपोर्ट पाॅजिटीव्ह आल्या दिवसापासून
मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून मिळणारी ट्रीटमेंट आणि मदत अक्षरशः ओव्हरव्हेल्मिंग
होती. चौकशी करणारे आणि काळजी घ्या सांगणारे फोन मेसेजेस नाही आले फक्त तर मित्रमंडळी
कोव्हिडचे सगळे प्रोटोकाॅल पाळून काय हवं काय नको बघत होते. वाफेचं भांडं आणून देणं
असो की होमिओपॅथिक औषधं देणं असो. काॅर्पोरेशनच्या फाॅर्म्यालिटीज पूर्ण करणे या सगळ्या
गोष्टी सचिन शिंदेने केल्या, त्याचा छोटा भाऊ सुधीर रोज लिटरली दारात येऊन तब्येतीची
चौकशी करत होता, फोन करुन त्याच्या डाॅक्टरकडे जाऊया म्हणून आग्रह करत होता. सागर बिद्रीने
फोनवरुन या काळात काय करावं आणि काय टाळावं याबद्दल खूप सपोर्ट केलं, त्याच्या माहितीने
खूप आधार मिळाला. बाकी सगळे जुने मित्र रोज नियमित चौकशी करत होते, शेजारीपाजारी आणि
मित्र काही लागतंय का चेक करत होते, माझं मोराल बूस्ट करण्यासाठी रोज काही ना काही
करायचा प्रयत्न करत होते. काही मित्र माझ्या बायकोकडे नियमित चौकशी करत होते. माझ्या
काकाने माझा रीपोर्ट पाॅजिटीव्ह आलेलं कळल्यावर अर्ध्या तासाच्या आत माझ्या लेकाला
त्याच्या घरी नेलं. दिवसभरात आम्हाला क्वारंटाईनच्या काळात जे काही लागू शकतं ते आणून
दिलं. अगदी आजंही माझी काकी रोज सकाळसंध्याकाळ आम्हाला गरम डबा पाठवतेय. या काळात सर्वांनी
आमच्यासाठी केलेली हरेक गोष्ट बघून, अनुभवून फार फार नशीबवान असल्याचा फिल येतोय, खूप
भावुक व्हायला झालंय. खरंच माणसं कमावणं काय असतं ते या काळात तंतोतंत कळलंय. याआधीही
खूप साऱ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मदत करणारे हात आणि आधार देणारी आपली लोकं याचा
प्रत्यय आलेला आहे. या सर्वांनी आणि कुटुंबाने मला मानसिक पातळीवर कणखर रहायला मदत
केलीये. कोव्हिडने बरंच काही शिकवलंय, जमलंच तर परत लिहीन त्यावर.
तुम्ही मात्र कोव्हिड वगैरे
काही नसतं, कोव्हिड हा मोठा फ्राॅड आहे, मोठी खेळी आहे वगैरे कोणी बोलत असेल तर त्याकडे
सपशेल दुर्लक्ष करा. कोव्हिड काळात मेडिकल फिल्डमध्ये मोठ्या प्रमाणात पेशंटसना लुबाडण्याचे
प्रकार झालेही असतील, नव्हे झालेतंच पण कोव्हिड खरा आहे, शारिरिक आणि मानसिक पातळीवर
भरपूर त्रास देतो. कोव्हिडबद्दल ईतके दिवस वाचून वाचून आपण गरजेपेक्षा जास्तं माहीती
डोक्यात लोड करुन ठेवलेली आहे. प्रत्येकाचा केस अन अनुभव वेगळा आहे. कोव्हिडने अमुकेकंच
त्रास होतो किंवा काहीच त्रास होत नाही असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
तेव्हा सुरक्षित राहण्यात
शहाणपणा आहे, स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करा, सगळं
तंतोतंत पाळलंत आणि थेट रुग्णाच्या संपर्कात आला नाहीत तर कोव्हिड होण्याची शक्यता
जवळपास शून्य आहे. सगळी दक्षता घेऊन अनफाॅर्च्युनेटली झालाच तर क्षणाचाही विलंब न लावता
उपचार घ्या, लवकरात लवकर बरं होता येतं. काळजी घ्या, विशेषतः घरातल्या ज्येष्ठांची
नीटंच काळजी घ्या. कसल्याही बातम्या बघू नका, बातम्या फक्त घाबरवण्याचं काम करतात त्यामुळे
बातम्या पूर्णपणे टाळा.
संतुलित आहार घ्या, हलके व्यायाम
करा, योग प्राणायाम करा, फिटनेसकडे दुर्लक्ष करु नका. जेवढी प्रतिकारशक्ती चांगली,
जेवढे तुम्ही शारिरिक आणि मानसिकरीत्या सशक्त तेवढा कोव्हिडचा धोका कमी. दगदग/एक्झर्शन
करु नका, एनर्जी राखून ठेवा त्यामुळे कोव्हिड झालाच तर चटकन बरे व्हाल, कमीत कमी त्रास
होईल.
ज्यांना झाला नसेल ते सुरक्षित
रहा, ज्यांना झाला असेल ते घाबरु नका मानसिकरीत्या स्ट्राँग रहा लवकर बरे व्हाल.
घाबरु नका पण दक्ष रहा, सुरक्षित
रहा.