Friday, September 18, 2020

स्मशानभूमी

 



कोणाचंही मरण हे वाईटंच पण तरीही कोणाच्यातरी मरणावर दुसऱ्या कोणाचं जगणं अवलंबून असतं असं म्हणालो तर विचित्र किंवा काहीतरी पोकळ आदर्शवादी वगैरे वाटेल ना. पण नाही, हे खरंच आहे कोणा न कोणाच्या मरणावर जगणं अवलंबून असणारे लोकंही असतात. मी अंत्यसंस्कार करणाऱ्या पुरोहीतांबद्दल बोलत नाहीये. स्मशानाची देखभाल करणारे अन तिथे अंत्यसंस्कारांसाठी सगळी तजवीज करणारे लोक असतात.

मी ज्या जातीत जन्माला आलोय त्यात माणसाचं मरणानंतर दहन केलं जात नाही, दफन केलं जातं. पण त्या विधीसाठी दफन हा शब्द वापरत नाहीत तर समाधी लावली असं म्हटलं जातं. कोणाचंही निधन झाल्यावर मृतदेहाचे पाय वळवून मांडी घालून दोन्ही हात मांडीच्या मधोमध ठेवून जणू समाधी लावल्याप्रमाणे बसवलं जाते आणि त्याच अवस्थेत गाडले जाते.

तर यासाठी वेगळी स्मशानभूमी राखून ठेवलेली असते.

त्या स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी अन तिथल्या व्यवस्था किंवा अंत्यविधीसाठी लागणारी तजवीज करण्यासाठी पूर्वी तरी एखादं कुटुंब गंज पेठेतल्या स्माशानातंच एका कोपऱ्यात झोपडीवजा घरात राहीलेलं मी पाहीलंय. बिरादार आडनाव त्यांचं. त्यांच्याशिवाय नेमून दिलेले काही लोक जे कोणाच्या निधनाची वार्ता कळवल्यावर बोलावले जातात. एकावेळेस एक किंवा दोन फारतर, खड्डा खणण्यासाठी. या खड्ड्यांना गार म्हणतात. गार खणणाऱ्यांना शेपाचशे मिळत असावे खड्डे खणायचे. इतर ऋतुंमध्ये ठिक पण पावसाळ्यात यांचे भयंकर हाल होतात. पाणी जेवढं जमिनीत झिरपत जाईल तेवढं खणणं कठीण होत जातं, हातातून कुदळ निसटत राहते, माती घट्ट होऊन गोळे होतात, अंत्यनिधीनंतर काही नातेवाईक आप्तेष्ट माती ओढतात पण शेवटी खड्डा पूर्ण बुजवण्यासाठी या कामगारांनाच माती ओढावी लागते, पावसाळयात हे भयंकर कठीण काम असतं. या लोकांची घरं स्मशानातल्या कामावर म्हणजेच कोणा न कोणाच्या मरणावर चालतात.

नक्की आठवत नाही पण कदाचित माझे आजोबा वारले होते तेव्हा त्यांच्या तिसऱ्याच्या दिवशी आम्ही स्मशानात गेलो तेव्हा अजून कोणाचातरी तिसऱ्या दिवसाचा विधी होऊन गेला होता. दिवसाला मेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ समाधीवर ठेऊन नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. सगळी पूजा आणि नैवेद्य झाल्यावर मग घरचे जवळचे नातेवाईक अन मित्रमंडळी समाधीपासून थोड्या अंतरावर जाऊन उभे राहतात. कावळ्याने तिथे ठेवलेला एखादातरी पदार्थ खाल्ला की समाधानाने माघारी फिरतात. कावळा शिवला म्हणे मृत माणसाची कोणती ईच्छा अतृप्त राहीली नाही म्हणतात. तर आम्ही स्मशानात गेलो तेव्हा कोणाच्यातरी तिसऱ्याचा विधी होऊन गेला होता. त्या समाधीवर साखरेचे कोरडे गुलाबजाम ठेवले होते. कावळ्याने चोच मारली तसे घरचे नातेवाईक वगैरे गेले. अन तिथली गर्दी हटल्या हटल्या बिरादारांचा नातू (नातूच असावा कदाचित) पळत पळत आला अन चट्टशिरी त्या पुड्यातला एक गुलाबजाम तोंडात टाकून पुडा उचलून घरात पळाला.

करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर दहनंच केलं जातं. ज्यांचे निधन दुसऱ्या कोणत्याही कारणाने होत असेल त्यांच्या अंत्यविधीला सध्या माणसं नाहीत. अंत्यविधी झालाच तर गाडण्याची परवानगी मिळत असेल का? गार खणून पैसे मिळवणाऱ्या कामगारांची कमाई कशी होत असेल. अंत्यविधीसाठी लोक जमलेच तर या कामगारांसाठी कसलं आलंय सोशल डिस्टन्सिंग? कसलं आयसोलेशन? दिवस केलाच तर दिवसाला विधी करुन हे असे पदार्थ समाधीवर ठेवले जात असतील का?

स्मशानाच्या देखभालीवर जगणाऱ्या लोकांचे काय हाल असतील या दिवसात? कसलं सॅनिटेशन त्यांच्या गावी तरी असेल का?

लाॅकडाऊनमध्ये यांना दोन वेळचं खायला कसं मिळत असेल? मिळत असेल का?

लोकांच्या मरणावर जगणाऱ्यांना लोक मरुनंही सध्या जगता येत असेल का?

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...