मागे वळून पाहू नये म्हणे..
का? पहावं कधीतरी...
ना मागे ना पुढे
असंच काहीसं रहावं कुठेतरी
रमावं क्षणभर..
मोजलं नाही तरी जाणवतो ना
गाठलेला पल्ला, चाललेलं अंतर.
विणायचा छंद मला
पण तू,
कधीच उसवू दिलं नाहीस नातं.
ओंजळ भरलेलीच नेहमी
अन काळीजही कधीच नाही रितं
ऊन पावसाचा खेळ तर
चालूच राहतो तसा
पण माझ्या घरट्यावर
आजवर ठेवलास तू सावलीचाच ठसा
माझी नजरंही ओळखतोस तू
अन चाहूलही..
तुझ्यासोबतंच हरेक श्वास माझा
अन प्रत्येक पाऊलही
तसा मलाही कळतोच तुझा ठोका चुकलेला
पण नाकारायचा नसतो तो खंबीरपणा
तुझ्या डोळ्यात दिसलेला
किती झाली रे वर्ष???
आपल्या लग्नाला?
सोड ना.. माझ्या लेखी तरी
अर्थ नाही अशा आकड्यात मोजण्याला
कोणी मोजतं का रे
सूर्याची किरणं, पावसाचा ओलावा
आभाळातले तारे, हवेचा गारवा...
नाही ना.. सोड तर मग
असंच कधीतरी पाहत जाऊ
जरा.. मागे वळून
हि तर सुरुवात आहे..
अजून बरंच चालायचंय आपल्याला मिळून...
के.पी. आर
(तू कविता नाही केलीस तरी चालेल...
मी वाचत जाईन तुझ्या डोळ्यात...
फक्त रोजचा बेड टी मात्र चुकवू नकोस)
तुझीच वगैरे म्हणायलाच हवं का?
बरं... थांबतेही म्हणत नाही.. कारण
हि सुरुवात आहे...

No comments:
Post a Comment