Monday, January 15, 2018

मुक्काबाज


बऱ्याच दिवसांपासून मुक्काबाजबद्दल वाचत होतो, जगभर वेगवेगळ्या फिल्म फेस्टीवल्समध्ये वाहवा मिळवलेल्या मुक्काबाजचं ट्रेलर बघितल्यापासून पिच्चर बघायचाच हे ठरवलं होतं. And I must say it's worth the wait.

पात्रांची निवड, अभिनय, कथा, गाणी, बॅकग्राउंड स्कोअर, डायरेक्शन सगळ्याचीच भट्टी पर्फेक्ट जमून आलीये.

अनुराग कश्यपला जे लोक फॉलो करतात त्यांना एव्हाना त्याचं व्यक्तिमत्वं, त्याचे विचार कशाप्रकारचे आहेत हे बऱ्यापैकी समजलेलं असावं. घाबरणं त्याच्या गावीच नाही, अंगावर आलं की तो शिंगावर घेतो, तो सोशल मेडीयावरही शोषितांचा आवाज होतो किंवा चुकीच्या गोष्टी आणि लोकांविरुद्ध आवाज उठवतो. त्याचं हे व्यक्तिमत्वं विशेष त्याच्या सिनेमांतूनही ठळकपणे दिसत राहतं.

मुक्काबाजमधे तो बॉक्सिंगमधल्या आणि पर्यायानं खेळातल्या राजकारणावर प्रभावीपणे बोट ठेवतोच पण तो त्याची गोष्ट फक्त तेवढ्यापुरती मर्यादीत ठेवत नाही तर देशामधल्या सद्यपरीस्थितीलाही तो त्या कथेमध्ये अगदी बेमालूमपणे गुंफतो. फिल्मच्या ओपनिंग सीनमध्येच काहीजण तोंडावर फडकी बांधून गायी वाहून नेणाऱ्या पोरांना बांधून मारत असतात, मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्यांचा विडिओ काढताना, "ईन को मारने के लिये ले जा रहे थे बोल" असं कॅमेऱ्यासमोर बोलायची जबरदस्ती करताना दिसतात. या सीनचा तसा फिल्मच्या कथेशी थेट संबंध नाही पण उत्तर प्रदेशमधली sociopolitical परीस्थिती कशीये हे दाखवण्याचं आणि प्रेक्षकाच्या मनावर ठसवण्याचं काम हा दोनेक मिनिटाचा सीन पर्फेक्टली करतो. सद्यपरिस्थितीवर भाष्य करण्याचं अजून एक उदाहरण म्हणजे श्रवणच्या दलित कोचला त्याचा शेजारी मेजवानीनंतर उरलेलं मटन आणून देतो आणि त्यानंतर दोनंच मिनिटात जमाव घरात घुसून गायीचं मांस शिजवलं म्हणून त्याला आणि श्रवणला बेदम मारतो.

श्रवण (विनित कुमार सिंग) आणि सुनैना (झोया हुसैन) यांच्यातल्या प्रेमकथेला वेगवेगळे अँगल्स आहेत. सुनैना भगवानदास मिश्राची (जिमि शेरगिल) पुतणी आहे. भगवानदास मिश्रा हा बरेलीमधला बॉक्सिंगचा सर्वेसर्वा आहे, तिथल्या सगळ्या नवोदित बॉक्सर्सचा तो गुरु आहे, शिवाय जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये कोणता खेळाडू खेळवायचा कोणत्या गटात खेळवायचा हे सगळं भगवानदासच्या हातात आहे. नावाप्रमाणेच तो भगवान म्हणजे देव आहे, कुठल्याही परीस्थितीत त्याला विरोध करणारे बॉक्सर्स बरेलीमध्ये नाहीत. विरोध हा शब्दंच त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही, त्यामुळे त्याला विरोध करणाऱ्या श्रवणचं करीयर कुजवण्याच्या ईरेला तो पेटतो. घरात गावात कोणाचीही त्याच्याविरोधात ब्र काढायची हिंमत नाही आणि त्याला अपवाद ठरते फिल्मची नायिका सुनैना. सुनैना मुकी आहे पण त्याच्याविरोधात सगळ्यात मोठा आवाज तिचा आहे आणि तो आवाज तिच्या देहबोलीतून आणि नजरेतून दिसत राहतो. तिच्या पात्राला सुनैना नाव देणंही त्यामुळे अगदी चपखलंच. सुनैनावर लव्ह अ‍ॅट फर्स्ट जडलेल्या श्रवणसमोर तिच्याशी लग्न करण्यासाठी नोकरी मिळवण्याची अट असते आणि त्यामुळेच फार मोठी स्वप्नं नसतात त्याची. त्याला सुनैनाशी लग्न करण्यासाठी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जिंकून रेल्वेमध्ये नोकरी मिळवायचीये बास पण त्यासाठी त्याला भगवानदासचा विरोध मोडून काढावा लागणार आहे. श्रवण आणि भगवानदासमधला हा संघर्ष मोठ्या पडद्यावर बघणं हा एक अमेझिंग अनुभव आहे.

अभिनयाच्या पातळीवर विनितकुमार सिंगसोबतंच बाकी सर्वांनीच कम्माल केलीये. विनितने तर फिल्मसाठी बॉक्सिंगचं प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलंय, त्याची तब्येत आणि सामन्यांच्याआधीची तयारी बघणं इज अ रीयल ट्रिट. त्याचा रागाने एकवटलेला पंच, बायको हरवलेली असताना चेहेऱ्यावरची असहायता आणि एकूणंच बॉक्सरची देहबोली त्याने ईतक्या प्रभावी आणि प्रामाणिकपणे मांडलीये की तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहू शकत नाही.
जिमि शेरगिलने रंगवलेला खलनायक जबरदस्त. आडदांड तब्यत नाही की दिसायला क्रूर नाही तरीही भगवानदास मिश्राची भीतीही वाटते आणि रागंही येतो. उच्च जातीचा असल्याचा माज आणि अहंकार त्याच्या चेहेऱ्यावरुन ओसंडून वाहत राहतो. हम ब्राह्मण है हम आदेश देते है असं म्हणतो तेव्हा किंवा बाटलीत लघवी करुन श्रवणला अमृत समझ के गटक जाओ जीवनदान मिल जायेगा म्हणतो तेव्हा किंवा वेटर ईन के लिये अलग जग मे पानी ले के आओ म्हणतो तेव्हा किंवा जेव्हा जेव्हा पडद्यावर श्रवणसोबत त्याचा संघर्ष रंगतो तेव्हा प्रेक्षकांना त्याची चिड आल्याशिवाय राहत नाही.
नवोदित झोयानंही सुनैनाची भूमिका एकदम ताकदिनं निभावलीये.
रवि किशनंही श्रवणच्या दलित कोचच्या भूमिकेत पर्फेक्ट. खेळाबद्दल पॅशन असणारा, विशेषतः पेलेचा खेळ बघून फूटबॉल आवडणारा पण दलित असल्यानं संधी नाकारण्यात आलेला, बाकीचे त्रास देतात म्हणून एकेकाला बुकलून काढणारा लहान मुलगा पुढे जाऊन बॉक्सर बनतो आणि तरुणपणातंही संधी न मिळाल्याने नंतर सच्ची पॅशन असलेल्या चेल्याच्या शोधात बॉक्सिंगचा कोच बनतो. भगवानदास आणि तो समोरा समोर आल्यावर भगवान त्याला विचारतो कौन हो... ब्राह्मण हो, क्षत्रिय हो, कायस्थ हो? तेव्हा तो उत्तर देतो, उसी चौथी जात के है जो आप को मुँह से बोली नही जाती, हरीजन. तो सीन म्हणा की अभी येह तुम्हे खुद तय करना है के तुम्हे मुक्काबाज बनना है या मुक्केबाज रवि किशन जीव ओतून काम करतो.

फिल्ममधली सगळीचं गाणी मस्तं आहेत आणि ती पर्फेक्ट टायमिंगला येतात मग ते हम पहला धक्का नही मारे असो, पैंतरा असो की बहुत हुवा सम्मान असो सगळीच गाणी फिल्मचा आलेख सतत चढता ठेवण्यात मदत करतात.

अनुरागचं डायरेक्शन अप्रतिम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. सामाजिक आर्थिक परिस्थिती कमालीची आणि टोकाची भिन्न असणाऱ्या नायक नायिकेची कहाणी पडद्यावर मांडताना तो सद्यपरिस्थितीत असणारे कळीचे/चिघळलेले मुद्दे जागोजागी पेरतो. नायकावर होणारा अन्याय बघताना आपल्याला कमालीचा राग येतो, रक्तं उसळतं, त्या नायकाची लढाई आपल्याला आपली लढाई वाटायला लागते, आपल्या देशात पैसा आणि पॉवरच्या जोरावर काहीही करता येतं याचा प्रत्यय येतो, आपण असल्या पॉवरफुल भिकारचोटांच्यामध्ये राहतोय आणि त्यांचं आपण काहीही वाकडं करु शकत नाही यामुळे आपल्याला असहाय्य वाटू लागत आणि आपली चिड अजूनंच वाढते. एक डायरेक्टर म्हणून अनुराग ईथे जिंकतो असं मला वाटतं. राजकारणामुळे खेळाडू आणि खेळाची लागलेली वाट, डोपिंग, बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठी राखून ठेवलेला हॉल स्वतःच्या कार्यक्रमासाठी पुढाऱ्याने ऐनवेळी बळकावणे, कुठेतरी उजाड रानात होणाऱ्या स्पर्धा, कोट्यातून मिळणारी सरकारी नोकरी किंवा राजकारण्याचा बॉडीगार्ड होण्यासाठी बॉक्सिंग करणारी तरुण पोरं, तब्येत कमवून पुढाऱ्याच्या मागेपुढे हांजी हांजी करत फिरणारी तरुण पिढी, स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी लागलेल्या पोरांना वरीष्ठांकडून मिळणारी वागणूक सगळे सगळे बारकावे अनुराग खूपंच चांगल्या पद्धतीनं मांडतो.


फिल्ममधले संवादही खुसखुशीत आणि जबरदस्त आहेत.
ईज्जत पे (इथे "ज"चा उच्चार "ज्ज्य" असा करायचा) हग चुके हो नाम पे मुत चुके हो
आप ने ऐसे कौनसे झंडे गडे है? आप का एक अचिबमेंट बताओ हमे. अरे हम ई तो जीत के लाये है जिस से आप किल भी नही ठोक सकते लेकीन उस के उपर जो ढक्कन है ना बहोत काम आता है मुँह पे लगाओ तो बकवास बंद और नीचे लगाओ तो हगवास
वगैरे वगैरे डायलॉग्ज जमून आलेत.

शेवटी भगवानला पंचेस मारताना प्रत्येक पंचसोबत भारत माता क्की ज्जय, भारत माता क्की ज्जय डायलॉगचा वापर करुन जमवून आणलेला sarcasmही बेस्ट.

जिमि शेरगिल आणि विनितच्या जुगलबंदीसाठी, अप्रतिम अभिनयासाठी, जबरदस्त डायरेक्शसाठी आणि फिल्ममध्ये जे जे काय हवं ते सगळं देणारं एक उत्कृष्ठं पॅकेज म्हणून मुक्काबाज बघायलाच हवा.

तळटीप: सद्याची एकूण सामाजिक राजकीय परिस्थिती बघता अनुरागला ट्रोल करणे, मोर्चा काढणे, ठराविक सीन्सवर बंदी घालायची आणि अनुरागला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केपी आर

Thursday, December 7, 2017

द शो मस्ट गो ऑन

"द शो मस्ट गो ऑन"
खूप आवडायचं हे वाक्य नाही तुम्हाला
मी गेल्यावर सेलिब्रेट करा
रडू नका...
सांगायचात आम्हाला नेहमी हसून
पण तुम्ही गेल्यापासून
एकसारखा पाऊस पडतोय
हिवाळा असूनंही
रडू नका सांगायचात आम्हाला
मग... आता ही चिटींग नाहीये का
सांगा ना

०६/१२/२०१७

हे घर मोकळं मोकळं वाटतं
तुम्ही गेल्यापासून खरतंर
गर्दी वाढलीये ईथे
भेटणारे, सांत्वन करणारे
आणि खांद्यावर हात ठेऊन
आम्ही आहोत सांगणारे येतात
मी शून्यातली नजर
त्यांच्यासोबत मिळवायचा प्रयत्न करतो
कोण काय सांगतंय हे कळो न कळो
होकारार्थी मान हलवतो सगळ्यांनाच
जुन्या एकाकी पडक्या वास्तूंची भगदाडं कशी असतात
तशाच घराच्या कानाकोपऱ्यात आठवणींची भगदाडं पडलीयेत
त्याच्यातून आरपार बघताना
तुम्ही दिसता ठळक...
मग स्वतःकडे आरश्यात पाहिल्यावरही
फक्त तुम्हीच दिसता...
तुम्ही माझ्यात आहात याचं समाधान वाटतं
पण याव्यतिरीक्त...
दुसरीकडे कुठेही बघितलं तर
हे घर मोकळं मोकळं वाटतं

आय लव्ह यू भाऊ

०७/१२/२०१७

तो डॉक्टर म्हणाला होता मला
७२ तास यांना जगवलं व्हेंटीलेटरवर तर
बघतिल कदाचित तुझ्याकडे
डोळे उघडून
ओळखतील तुला
आणि कोणास ठाऊक
काही मिरॅकल झालंच तर
बोलतीलंही तुझ्याशी... पण..
पण वाचणार नाहीतच..
आत्ता कसंय विचारल्यावर म्हणाला
आत्ता काही कळत नाहीये त्यांना
वेदना, यातना, स्मृती... काहीच नाही
सेमी कोमामध्ये आहेत
कानात तुमचे शब्द ऐकू आले
मला व्हेंटीलेटरवर जगवू नका
म्हणाला होता तुम्ही ताई आणि मला

जगवायचं कशासाठी तर...
तुम्ही वाचणार नाहीत हे सांगण्यासाठी
पण व्हेंटीलेटर काढा
असं सांगायला जीभ रेटली नाही
कदाचित आयसीयू बाहेर
आमची द्विधा मनस्थिती
तुम्हाला बघवली नसेल
व्हेंटीलेटर चालू असतानाच
तुम्ही थांबायचं ठरवलंत
तुम्ही डोळे उघडून पाहीलं नाहीत माझ्याकडे
बोललाही नाहीत काहीच
तुम्ही हॉस्पिटलमध्ये गाढ झोपेत असताना
मी कित्येकदा येऊन म्हणायचो
आय लव्ह यू भाऊ
आजही म्हणतो रोज
तेव्हा वाटायचं तुम्ही ऐकलं नसेल कधीच
पण आज वाटतं तुम्ही नक्की ऐकल असेल
ऐकत असाल... आजंही
आय लव्ह यू भाऊ!

०७/१२/२०१७

रोज चिकाटीनं सकाळचा एक दिड तास
एकेक माणूस आठवून
सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवायचात तुम्ही
मग एक दिवस
मी तुम्हाला ब्रॉडकास्ट करायला शिकवलं
त्यात तुम्ही माझं नावंही ईन्क्लुड केलंत
हॉस्पिटलच्या बेडवर पाठ टेकवण्याआधी
तुम्ही शेवटचा ब्रॉडकास्ट केलात
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर" गुड मॉर्निंग
आता व्हॉट्सॅप उघडायची ईच्छा होत नाही
जपून... लक्षपूर्वक पावलं उचलावी लागतात आता
तुम्ही म्हणाला होता
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"
पण आता...
पडून चालायचं नाही

आता रोज सकाळी उठून
तुमचा शेवटचा मेसेज वाचावासा वाटतो
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"

Friday, September 22, 2017

टिमलख लख ते टिमलख लख


नेहमीच्या सवयीनं सूर्य पूर्वेकडून काँक्रिटच्या जंगला पलिकडून डोकं वर काढत असतो. तुम्हाला आजकाल सकाळी उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नसते. रात्री व्हॉट्‌सॅप फेसबूक वगैरेवर निरर्थक चर्चा चर्वितणं झोडता झोडता झोपी जाताना उशाशी कुठेतरी पडलेला मोबाईल उचलून तुम्ही डोळे किलकिले करुन चमकणाऱ्या स्क्रिनवर वेळ बघता, अजून पाऊणेक तासानं उठलं तरी चालेल असं मनाशी गणित बांधत पाठीचं दुखणं कमी व्हावं म्हणून गुडघे दुमडून पाय पोटाशी घेत एका कुशीवर पडून राहता, अजून थोडावेळ झोपण्यासाठी, झोप जरी लागली नाही तरी अजून थोडावेळ अंथरुणात रेंगाळायला मिळणार आहे याचा आनंद असतोच. चुरचुरणारे डोळे मिटल्यावर तरीही दहा-पंधरा मिनिट का होईना झोप लागावी वाटत असताना पहाटेच पडलेल्या कसल्याशा अगम्य स्वप्नाची मनातल्या मनात उजळणी करायला सुरुवात होते, तुम्ही मिटल्या डोळ्यानंच मान हलवून ती स्वप्नं डोक्यातून झटकून टाकायचा प्रयत्न करता, मग उलटे आकडे मोजायला सुरुवात करता. आता झोप लागणारंच तेवढ्यात साला आदल्या दिवशी संध्याकाळी कंटाळा आला म्हणून काम आर्ध्यात सोडून लॅपटॉप बंद करुन ऑफिसमधून निघताना, घरी जेवण झाल्यावर करु म्हणून राहीलेलं अर्जंट काम आठवतं. भूत दिसल्यासारखं तुम्ही खाड्‌कन उठून बसता, दोन मिनिटांच्या टेंशन नंतर आता गडबड करण्यात काही एक अर्थ नाही हे लक्षात आल्यावर तुम्ही राहीलेलं काम आज पहिल्यांदा कसं करायचं याचं प्लानिंग करत करत जागचे उठता तेव्हा ठरलेल्या वेळेच्याआधी उठल्यामुळे तुमच्याकडे आवरण्यासाठी बऱ्यापैकी मार्जिन असतं. मग जमेल तेवढं अंग स्ट्रेच करुन मोठ्यानं आळस देऊन, व्हॉट्‌सॅपवर ठरलेला गुड मॉर्निंग मेसेज ब्रॉडकास्ट करुन, दाराबाहेर पडलेले न्यूजपेपर आत आणून चाळत चाळत आपला मोर्चा फेसबूककडे वळवता. फेसबूक मेमरीचं दार तुमच्यासाठी सताड उघडं करुन तयार असतंच. एक नजर घड्याळाकडे ठेवून आवरायचं ठरवलेलं विसरुन तुम्ही स्वतःच्याच मेमरींना हात घालता. एकदोनतीनचारपाच... सातसात वर्षापूर्वीपर्यंतचा ऑनलाईन नॉस्टॅल्जिया फेसबूक तुमच्यापुढे पेश करतं. तुम्ही स्वतःच्याच पोस्ट्‌स वाचत बसता, स्वतःच्या जुन्या फोटोवरच्या कमेंट्‌स खुळ्यासारख्या वाचता, हसता... कुठलीतरी बरी आणि अजूनंही रीलेवंट वाटणारी पोस्ट कॉपी करुन रीपोस्ट करता, रीपोस्ट करताना तुमच्या फोनवरचं टूजी नेट मान टाकायला लागतं, मग तुम्ही दोन मिनिटासाठी थ्रीजी नेट चालू करता कारण भोक पडलेल्या बादलीतून बदाबदा गळणाऱ्या पाण्यासारखी तुमच्या स्मार्ट फोनची बॅटरी भसाभसा उतरायला लागलेली असते. ह्याशट्याग रीपोस्ट म्हणून झाल्यावर त्याच फोनवरच्या उजव्या कोपऱ्यातल्या आत्तापर्यंत दुर्लक्षिलेल्या छोट्याशा घड्याळाच्या आकड्यांकडे नजर जाते.

थोड्यावेळापूर्वीच आज वेळेच्याआधी आपलं नक्कीच आवरुन होणार असं वाटलेलं तुम्हाला आठवतं. आता मात्र पटापटा आवरलं तर जास्तं नाही पण पंधराएक मिनिट लेट का असेना आपण ऑफिसला पोहचूच असं मनातंच म्हणत तुम्ही पळतंच बाथरुम गाठता. आंघोळ वगैरे उरकून कपडे घालण्यासाठी कपाट उघडल्यावर कालच्या शर्टाला घामाचा वास येतोय हे लक्षात येण्याआधीच बायको तुम्हाला म्हणते कालचा शर्ट घालायचा विचारंही नको करुस. हिंदी सिरीयलमधलं झूम्म झूम्म झूम्म्म म्युझिक वाजल्यासारखं तुम्ही बायकोकडे बघता, बायको चेहेऱ्यावरचे भाव कणभरंही न बदलता म्हणते, "वास येतोय त्याला". चरफडत, पायाखाली विस्तव लावल्यासारखे तुम्ही घाई घाईत ईस्त्री चालू करता, ईथून पुढे तुमचं मल्टी टास्कींग चालू होतं. ईस्त्रीमधे पाणी भरुन टेंपरेचर कंट्रोलचं बटन तुम्ही वूलवर सेट करता, ईस्त्री तापेपर्यंत घाईघाईत तोंडाला अंगाला मॉश्चरायझर चोपडता, काल रात्री तसाच उघडा ठेवलेला लॅपटॉप स्विचॉफ न करता आहे असा बंद करता, चार्जर आणि लॅपटॉप बॅगेत भरेपर्यंत ईस्त्री तापलेली असते. ईस्त्री करुन पटकन निघावं म्हणत असतानाच नेमका लेक उठून तुमच्यासमोर येऊन उभा राहतो. आबा काय करतोयेस रे असं त्यानं विचारल्यावर तुम्ही त्याला म्हणता जेवतोय, तोही तुमचा बाप निघतो, "श्लिखंड खातोयेश काय" असं विचारुन तो हसतो. त्या गडबडीतंही सगळं सोडून तुम्हाला हसायला येतं तुम्ही त्याला जवळ ओढता, गालावर कपाळावर पपी दिल्यावर तो गुड मॉल्गिंग म्हणतो आणि मला घे मला घेचा घोशा लावतो. एव्हाना पंधरा मिनिट लेट पोहोचण्याचीही वेळ निघून गेलेली असते. तुम्ही त्याला उचलून घेऊन आख्ख्या घराची एकदा फेरी मारता, गाण म्हणता, त्याला कडेवर घेऊन थोडासा डांस करता, अरे पल्ला पल्ला पल्ला करुन त्याला सोडल्याचं नाटक करुन परत पकडता, तो तुम्हाला घट्ट मिठी मारुन बसतो. चला आता मला ऑफीसला जाऊ दे म्हणून त्याला उतरवायला लागल्यावर तो तुम्हाला अजूनंच घट्ट चिकटून बसतो, मलाही आपिचला येयचंय म्हणत हसतो. मग तो एकेक डिमांड समोर ठेवतो, चॉक्की, मोठं चॉक्की, दोन चॉक्की बायनोक्युलल म्हणता म्हणता कधी कधी तर मला घर आण म्हणतो, तुम्ही हसता तोही मोठ्यानं हसतो पण तुमच्या मानेभोवती गुंडाळलेले हात सोडत नाही. माझे सर मारतील हा मला ऑफीसला नाही गेलो तर या वाक्याची मात्रा लगेच लागू पडते. तो खाली उतरुन मग तुम्हाला टाटा करतो, लवकर ये सांगून तुम्ही पायऱ्या उतरु लागलात की हॉलमध्ये पळतो, हॉलची खिडकी उघडून खिडकीत उभा राहून तुम्हाला मोठ्यानं आवाज देऊन टाटा करतो, फ्लाईंग किस देतो, त्याच्यासाठी काय काय आणायचं याची लिस्ट सांगतो गाड्यांच्या आवाजात तुम्हाला नीटसं काही ऐकू येत नसतं पण तुम्ही हो हो म्हणत गाडी काढता, हात उंचावून बाय करताना त्यानं बेंबीच्या देठापासून लवकर ये सांगितलेलं तेवढं नीट ऐकू येतं आणि दारातून निघाल्यापासून ऑफिसमध्ये पोहचेपर्यंत तुम्हाला खिडकीतून टाटा करणारा तुमचा लेक दिसत राहतो.

पंधरा मिनिट म्हणता म्हणता ऑफिसमध्ये पोहोचायला  तुम्हाला चांगला तासभर तरी उशिर झालेला असतो.
खाली मान घालून कामाचा रतीब ओतणाऱ्या माणसांच्या गर्दीत, बंद खुराड्यात थंड हवा ओतणाऱ्या एसीखाली तुम्ही लॅपटॉप उघडून बसता तेव्हा उशिरा का होईना चालू झालेला एक रटाळ दिवस तुमची आ वासून वाट बघत बसलेला असतो. त्या मॉर्निंगमध्ये गुडचा कसलाही लवलेश नसतानाही तुम्ही समोर येणाऱ्या प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणत असता, मला खोटेपणा जमत नाही असं इंटरव्ह्यूमधल्या एका प्रश्नाला दिलेलं उत्तर सोयीस्कररीत्या विसरुन तुम्ही खोटेपणाच्या लोकसंख्येत अजून एकाची भर घालत राहता. त्या चकचकीत चार भिंतीत कॅलेंडरच्या एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत चालण्यासाठी, कॅलेंडरची पानं बदलत राहण्याएवढी तरी शक्ति किंवा त्राण अंगात रहावा अशी ईच्छा मनोमन धरत पुढच्या एक तारखेच्या चौकटीकडे तुम्ही सरपट राहता. भिंतीवर डकवलेल्या घड्याळात भस्सकन बोट घालून त्याचे काटे गरगरा फिरवून संध्याकाळ करावी असं कितीही मनापासून वाटलं तरी तसं करता येत नाही आणि संध्याकाळ झाली म्हणून घरीही जाता येईलंच असंही काही नसतं. खजिन्यावर वेटोळा घालून फणा काढून फण्यावर दहाचा आकडा मिरवत बसलेल्या नागासारखा संध्याकाळी सहा वाजता तुमच्या घरच्या वाटेवर टपून बसलेला बॉस तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डोलायला लागतो. तुम्ही फोन उचलून कानाला लावल्या लावल्या अमुकेक काम आज केल्याशिवाय जाऊ नकोस, थोडं जास्तं थांबायला लागलं तरी थांब असा फुत्कार तुमच्या कानात सोडून मोठ्या समाधानानं ऑफिसातून निघतो. हिंदी सिनेमात दाखवतात तसा उतारावर घरंगळणाऱ्या दगडासारखा घरंगळत तो पुढच्या पाचव्या मिनिटाला घरी पोहोचतो. तुम्ही टेबलावर वाकलेल्या नाईट लँपसारखे खुर्चीत वाकून कीबोर्डावर बोटं आदळत राहता. तिथून पुढे मात्र तुम्ही एकदा चुकून खाल्लेल्या तंबाखूच्या पानानंतर जेवढ्या जोरानं पृथ्वी तुमच्या आजूबाजूनं फिरली नसेल तेवढ्या जोरात घड्याळाचे काटे चक्रावल्यागत फिरत राहतात.

दिवसभर दबून बसलेला आंधार चोरपावलानं येता येता आजूबाजूला कोणी न दिसल्यामुळं जरा धीटाईनंच ऑफीसच्या आजूबाजूला पसरतो. तुम्ही आतल्या कृत्रिम उजेडात काम संपवायचंय म्हणत स्वतः कणकण संपत राहता. तुम्ही हताश नजरेनं निपचित पडलेल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनकडे बघता आणि शेवटचा आशेचा किरण वगैरे म्हणावा असा बॉसचा मेसेज येतो, "उद्या सकाळी बघूया". तुम्ही परत एकदा कालसारखाच अर्धवट काम ठेऊन लॅपटॉप बंद करता, रात्रीचं जेवण झाल्यावर करुया म्हणून. तुम्ही बॅग उचलून आतल्या खोट्या उजेडातून बाहेरच्या शाश्वत आंधारात पाय ठेवता, गाडी काढून निघणार एवढ्यात त्या आंधारात सिक्युरीटी गार्डचं ओळखीचं हसू चमकतं, तुम्हीही सवयीनं हसता, पुढे जाता जाता तुम्हाला उगाचंच जाहीरातीत दाखवतात तसं रीव्हाईटल खाल्ल्यागत फ्रेश वगैरे वाटत... तेही पुढचे पाचेक मिनिटंच. गाडीतल्या रेडीयोवर गाणी चालू होतात, त्यांच्या त्यांच्या शेड्यूलप्रमाणे एकेक करुन कानावर आदळत राहतात. तुम्ही ऑफिसातल्या गर्दीला मागे सोडत रस्त्यावरच्या गर्दीचा एक भाग होता. रस्त्यावर आपल्या बाजूने कचऱ्याची गाडी गेल्यावर महिनोन्‌महिने कुजलेल्या कचऱ्याचा वास जसा अनिर्बंधपणे आपल्या श्वासा श्वासात भरुन राहतो अगदी तसे अनिर्बंधपणे भारतीय विवाहसंस्थेचा ईतिहास ते जागतिक मंदीचे सावट ते दहीहंडीची वर्गणी ते कॉलेजातले आता आपल्याशी न बोलणारे मित्र-मैत्रिण ते कित्येक निरर्थक विषय आपल्या डोक्यात भरभरुन वाहत राहतात. मग मधेच आठवतं वडीलांची बीपीची गोळी संपलीये, गाडीच्या काचेतून आरपार शून्यात बघता बघता तुमच्याही नकळत तुम्ही डॅशबोर्डवरच्या घड्याळाकडे बघता, घरापासच्या मेडीकलपर्यंत पोहोचण्यासाठी अजून पाऊण तास लागणार असतो, मेडीकल अकरा-साडे अकरा पर्यंत चालू असतं असं मनाशी म्हणत तुम्ही चौकातल्या लाल दिव्याकडे बघत थांबता. सिग्नलचं काऊंटडाऊन चालू होतं तेव्हाच रेडीयोवर आमिर खान पापा केहते है बडा नाम करेगा गाणं म्हणायला लागतो, लहानपणी या गाण्यात मोटीवेशन शोधून खुश होणारे तुम्ही सिग्नलसारखी आपली "बडा नाम करण्यासाठीची" उलटी गिनती कॉलेज संपल्या संपल्या चालू झाली आणि आता आकडे संपत आलेत तरी आपण अजून काहीच ऐसा काम करु शकलो नाहिये हे जाणवून काहीसं नाराज होता तेवढ्यात हिरवा दिवा तुम्हाला पुढे जायला सांगतो अगदी तुमच्या आयुष्यासारखाच. तुम्ही जुनी झालेली कॅसेट टेपरेकॉर्डमध्ये अडकल्यागत गाडी चालवत राहता. तिकडे घरी कधी चॉक्की कधी बायनाक्युलल तर कधी गाडी आणि रोजंच तुमची वाट बघत तुमचं लेकरु झोपी जातं तुम्हाला गाडी चालवताना आठवत राहतं पोरानी बॅट बॉल, चॉकलेट, गाडी वगैरे वस्तू आणायला सांगून जमाना झालाय पण आजंही  तुम्ही हिंदी सिनेमात कायम उशिरा येणाऱ्या पोलिसांसारखे दुकानांची शटर खाली ओढल्यानंतर ऑफीसातून निघालेले असता. स्वतःच समाधान करण्यासाठी तुम्ही उद्या नक्कीच या वस्तू घेऊचया आणि लवकरंच हा जॉब बदलूया म्हणत गाडी हाकत राहता. पुढच्या चौकात नो एंट्रीतून एक पोरगं घ्यँग घ्यँग करत तुमच्या गाडीसमोर येतं तेव्हा त्याच्या गाडीचा हेडलाईट भक्कन्‌ तुमच्या डोळ्यावर पडतो तेव्हा रेडीओवर जॅकीनं तुम्हाला समजवायला घेतलेलं असतं, "रोशनी साथ लायी थी साये, साये गहरे थे रोशनी हलकी". हम न समझे थे बात इतनी सी ख्वाब शीशे के दुनिया पथ्थर की म्हणत तुम्ही अ‍ॅक्सिलेटर दाबता.

घरी पोहोचता पोहोचता कॉलेजच्या व्हॉट्‌सॅप ग्रुपवर कोणीतरी ट्रीप प्लान करायला घेतलेली असते, तुम्ही ते मेसेज न वाचता फोन खिशात टाकून घराचे जिने झपाझपा चढायला लागता, पायातले बूट काढण्याआधी दारातून डोकावून बघता तेव्हा तुमची वाट बघून निरागसपणे झोपलेलं लेकरु दिसतं. मग पायात साखळदंड बांधल्यागत तुम्ही खुरडत खुरडत जाऊन फ्रेश होता. घरच्यांसोबत जेवण करताना गप्पा टप्पा, चेष्टा मस्करी होते. ताटावरुन उठल्यावर तुम्ही लेकराच्या गालावरुन हात फिरवता त्याचा मुका घेता आणि सोफ्यावर जाऊन बसता.
आई ओरडत असते तुझ्या खोलीत जाऊन झोप, वडील अधून मधून राजकारणावर, समाजकारणावर, सिनेमावर गप्पा मारत मारत लॅपटॉपवर काहीतरी बघत असतात. तुम्ही दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यातून कधीही टप्पकन गळणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखे कोणत्याही क्षणी गाढ झोपी जाल असं वाटत असतानाही फक्त थोडावेळ काही बोललो नाही तरी आईबापाच्या जवळ बसावं म्हणून तिथेच रेटून बसता. एका डुलकीनंतर जाग येते तेव्हा टिव्हीवरती रंग दे बसंतीमधला डिज्जे आयुष्याचं तत्वज्ञान सांगत असतो, "वही दुनिया दे झमेले, नोकरी ढूँडो पैसे कमाओ, घर बसाओ, ते लाईफ दे ईशारो पे नचते जाओ, टिमलख लख ते टिमलख लख. गेट दे इसतरफ हम लाईफ को नचाते है ते दुसरी तरफ लाईफ हम को नचाती है टिमलख लख ते टिमलख लख..... डिज्जेदी इथ्थे कोई औकात है, लोग कहते है डिज्जे मे बडी बात है कुछ करेगा डिज्जे, लेकीन बाहर दुनिया मे अच्छे अच्छे डिज्जे पिस गये लाखो की भीड मे... हंम्म्म...." सोफ्यावर उरलेल्या जागेत पडल्या पडल्या तुमची बायकोही झोपी गेलेली असते, तिला जागं करुन तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये झोपायला जाता तेव्हा मेंदूवर रुटीनची गडद पुटं चढलेली असतात... मोबाईलशी चाळा करत करत उशाशी ठेऊन झोपता झोपता तुम्ही मनातल्या मनात म्हणत असता "टिमलख लख ते टिमलख लख"

केपी आर

Saturday, September 2, 2017

नोटाबंदी - कागज का टुकडा


स्वतंत्र भारताचा ईतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ८ नोव्हेंबर २०१६ सर्वार्थाने एक गौरवास्पद, सुवर्णदिवस म्हणून ओळखला जाईल.
याच दिवशी भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी काळा धंदावाल्यांचं कंबरडं मोडणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि देशातल्या हजार पाचशेच्या सगळ्या नोटा त्या रात्री बारापासून निव्वळ "कागज का टुकडा" बनून गेल्या.
मोदीजी म्हणजे पराकोटीची स्वच्छ प्रतिमा, आतोनात निर्मळ अन हळवं मन शिवाय जात्याच कनवाळूपणा ओतप्रोत भरुन असलेले एक दुर्मिळ राजकीय नेतृत्व. याउपर की काय म्हणून चूकणे या शब्दाला त्यांच्या शब्दकोशात स्थानंच नाही. ते घेतील तो निर्णय ते करतील ती कृती हि सदासर्वदा केवळ बरोबरंच असते. त्यांच्या करारी चेहऱ्याच्या ९ किलोमीटर आजूबाजूच्या व्यासामध्ये चूक चूकुनंही फिरकतसुद्धा नाही. २०१४ साली भक्तगणांना होलसेलमध्ये वाटलेल्या शब्दकोशांमध्ये पर्फेक्शन या शब्दाचा अर्थ नमो किंवा मोदीजी असा देण्यात आला आहे आणि तो गेल्या तीन साडेतीन वर्षात घोकून घोकून पाठ करुन घेण्यात ते यशस्वीही झाले आहेत. तर या अशा निष्कलंक, निस्वार्थी, कनवाळू पंतप्रधानांनी जनतेच्या हितासाठी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चूकीचेच आणि धातांत खोटे उद्देश गेल्या दहा महिन्यात काही समाजकंटकांनी आणि विघ्नसंतोषी लोकांनी समाजात पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. काय तर म्हणे नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैश्याला आळा घालण्यासाठी, कॅशलेस व्यवहार रुजवण्यासाठी, लेस कॅश पद्धती आणण्यासाठी, पडून सडणारा पैसा व्यवहारांच्या मुख्य स्रोतात आणण्यासाठी आणि यावर कडी म्हणून की काय तर दहशतवादाला आळा घालण्यासाठी घेण्यात आला होता. माननीय मोदीजींनी कधीही त्यांच्या भाषणात अथवा प्रेस रीलीजमध्ये यापैकी एकंही उद्देश जाहीररीत्या सांगितलेला नाही याची सर्वांनी नोंद घेऊन या बोलभांड मिडीयाचा निषेध करणं तर गरजेचंच आहे पण यापुढे जाऊन या असल्या ब्रिगेडी मिडीयावर बहिष्कार घालणंही तितकंच महत्वाचं आहे. मूळात समाजकंटकांना सतर्क होण्याची संधी न देता हळूच नोटाबंदीचा थोर उद्देश गुपित ठेऊनंच साध्य करुन घेण्याचा मोदीजींचा मानस होता पण त्यांच्यावर चहुबाजूंनी होणारी बोचरी टीका जिव्हारी लागल्याने आणि आता सहनशक्तीच्या पलिकडे हे सगळं जात असल्याने आम्ही या उद्देशांच्या मूळाशी जाऊन सगळ्यांपुढे हे उद्देश जाहिररीत्या मांडण्याचं ठरवलं आहे. तर बोलभांड आणि विकाऊ मिडियावर विश्वास न ठेवता आपला सद्‌सद्‌विवेक जागा ठेऊन हे उद्देश वाचावे, समजावे आणि जमेल तितक्या समविचारी लोकांपर्यंत पोहोचवावे हि मनःपूर्वक विनंती.
नोटाबंदीचे मूळ व आजवर गुपित ठेवलेले उद्देश खालीलप्रमाणे

१. वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे - नोटाबंदी करताना मोदीजींनी हे स्पष्ट केलं की ही बंदी त्या रात्री बारा वाजल्यापासूनंच होईल. अन हे जाहिर केलं तेव्हा बँका, ऑफिसेस, दुकानं वगैरे ऑलरेडी बंद झाली होती. त्यामुळे खिशात असलेला अमाप काळा पैसा उरलेल्या चार तासात कसा खर्च करायचा याची कोणालाच टोटल लागत नव्हती. काळा पैसावाले ईतके धास्तावले की त्यांच्या हृदयाचे ठोके अपरीमित प्रमाणात वाढले आणि मनुष्य जेव्हा आतोनात चिंताग्रस्त असतो तेव्हा त्याची प्रजनन क्षमता दिडशे पट कमी होते हे वर्षानुवर्षाच्या अभ्यासाअंति स्पष्ट झालेलं आहे. शिवाय जुन्या नोटा एकतर बँकेत जमा करणं किंवा त्यांची योग्य ती विल्हेवाट लावणं आणि नव्या नोटा एटीएम मधून काढणं यांत रात्रंदिवस अडकलेल्या जनतेच्या डोक्यात दुसरी कोणतीच गोष्ट येणं शक्य नसल्याने लोकसंख्येला आपसूकंच खिळ बसली. याव्यतिरीक्त मरायला टेकलेले लोक एटीएमच्या रांगेत येऊन येऊन पट्टकन खपल्याने त्यांनाही लवकर मोक्ष प्राप्ती झाली आणि गेल्या सत्तर वर्षातल्या प्रजनन दराशी तुलना केल्यास गेल्या दहा महिन्यातला प्रजनन दर हा किमान एकशे अठ्ठ्या‌ऐंशी टक्क्याने कमी झाल्याचा अहवाल नासाने दिला आहे. यावरुन हे निर्विवादपणे सिद्ध होतं की लोकसंख्या नियंत्रण हा नोटाबंदीच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आहे.

२. जागतिक तापमानवाढीत घट करणे - जागतिक तापमानवाढ ज्याला आपण सगळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ही आजच्या घडीला भारतंच नाही तर अवघ्या जगाला भेडसावणारी समस्या आहे. एकीकडे प्यारीस करार, ईथल्या परीषदा तिथल्या परीषदा वगैरे करत बसणारे निष्क्रीय नेते आणि एकीकडे थेट कृती करणारे आपले धडाकेबाज माननीय मोदीजी. आपण ज्या एटीएममधून पैसे काढतो त्या एटीएममध्ये वातुनुकुलित यंत्रणा २४ बाय ७ चालू ठेवावी लागते. वर्षानुवर जुन्या झालेल्या नोटा या एटीएम मशिनमध्ये ठेवल्याने त्या चार बाय चार खोलीतल विशिष्ट तापमान ठेवण्यासाठी वातुनुकुलित यंत्रणेची जास्तीत उर्जा खर्च होते. नव्या नोटांच्या तुलनेत ही उर्जा किमान चौसष्ट टक्के जास्त लागते. सगळ्या जुना नोटा सरसकट बाद केल्यामुळे फक्त एटीएमंच नाही तर बँका, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यलयं शिवाय सार्वजनिक वाहतुक करणारी वाहनं आणि वातानुकुलित खाजगी वाहनं, जिथे जिथे म्हणून कॅश जुन्या नोटांच्या स्वरुपात हाताळली जात होती तिथे उर्जा वाचवून तापमानवाढ रोखण्याकडे एक महत्वाचं पाऊल मोदीजींनी उचललं आहे. आणि काल-परवाच आलेल्या जागतिक पर्यावरण रक्षण संस्थेच्या अहवालामध्ये मागच्या दिडशे वर्षांच्या तुलनेत ९ नोव्हेंवर २०१६ पासून मोजलं असता भारतातील तापमानवाढ उणे २४ टक्के एवढी नोंदवली गेल्याचं म्हटलं आहे.

३. तात्काळ ट्रिपल तलाकवर बंदी - मुस्लिम महिलांचे आयुष्य बरबाद करणारी तात्काळ ट्रिपल तलाक ही प्रतिगामी पद्धत रद्दबातल ठरवणे हे एक मोठ आव्हान देशाच्या नेतृत्वापुढे होतं. तात्काळ केलेल्या नोटाबंदीमुळे आतोनात समस्यांना तोंड द्यावं लागल्याने, तात्काळ घेतलेले निर्णय हे किती त्रासदायक होऊ शकतात हे ट्रिपल तलाकच्या खटल्यावर काम करणाऱ्या न्यायाधीशांच्या पॅनेलला समजल्याने त्यांनी विनाविलंब तात्काळ ट्रिपल तलाक पद्धतीवर बंदी आणली. ईतर धर्माचा तिरस्कार करतात असा सरसकट आरोप मोदीजींवर करणाऱ्या अंध विरोधकांना ही सणसणीत चपराक आहे.

४. साथीच्या रोगांना आळा घालणे - आजवर अगदी शालेय जीवनापासून आपण शिकत आलो आहोत की साथीच्या रोगांचा प्रसार हा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन विषाणू पसरल्यानं होतो. जुन्या नोटांच्या पृष्ठ्भागाच्या कित्येक थर खालपासून लाखो करोडो साथीच्या रोगांच्या विषाणूंची पैदास होऊन आणि सूक्ष्मस्तरावर ते विषाणू साठून राहिले असून त्या नोटांच्या देवाण घेवाणीतून साथीच्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं ईस्रोच्या २०१५ सालच्या वार्षिक अहवालात स्पष्टपणे नमूद केलं गेलं होतं. गेल्या सत्तर वर्षात फक्त उपग्रहांच्या उड्डाणांचे श्रेय लाटणाऱ्या नेतृत्वापेक्षा आपण वेगळे असल्याचा पुरावा मोदीजींनी या धडाकेबाज निर्णयातून दिला आहे.

५. सचिन तेंडूलकर आणि रेखाची राज्यसभेतली उपस्थिती वाढवणे - आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर राज्यसभेचं सदस्यत्व मिळवून, राज्यसभेत नाममात्र हजेरीही न लावणारे आणि त्यांना मिळालेला निधी तसाच सडू देणाऱ्या सचिन व रेखा यांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी राज्यसभेत किमान ८०% हजेरी अनिवार्य केल्याची गोपनीय बातमी आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून स्वतंत्र भारताच्या ईतिहासात लोकप्रिय सेलेब्रिटींच्या बाबतीत कठोर निर्णय घेणारे मोदीजी हे पहिले आणि एकमेव पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत गोल्ड स्पॉट बूक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये त्यांची नोंद झालेली आहे.

६. शेतकरी बांधवांना सहकार्य, गोमातेचं रक्षण व सोन्याच्या निर्मितीत वाढ - जुन्या नोटा या फक्त कागदाच्या लगद्यापासून बनवल्या नसून त्यामध्ये निरनिराळी रसायनं मिसळलेली होती शिवाय त्यामध्ये साथीचे रोग पसरवणारे लाखो करोडो विषाणू साठले होते. या अशा विषाणूग्रस्त नोटा जेव्हा फाटायच्या आणि त्यांची विल्हेवाट लावली जायची तेव्हा त्यातलं रसायन भूगर्भात जाऊन जमिनीचा कस कमी होत होता, फाटक्या नोटा गायींनी खाल्यामुळे त्यांच्या पोटात घातक रसायनं जात होती. भारतातल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार गायीच्या शेणामध्ये सोन्याचे कण असतात हे  यापूर्वीच पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. रसायनयुक्त नोटा खाल्ल्यानं गायींची शेणावाटे सोनं निर्माण करण्याची क्षमता गेल्या पंनास वर्षात आतोनात कमी झाली होती. नव्या नोटा ईको फ्रेंडली आहेत, त्यामध्ये फक्त हिरव्या वनस्पती असल्याने त्या खाल्ल्यावर गायींच्या पोटावर कोणताही विपरीत परीणाम होणार नाही तसेच ईको फ्रेंडली नोटांची विल्हेवाट लावताना रसायनं जमिनीत जात नसल्याने जमिनीचा कसंही सुधारण्यात मदत होत आहे. जमिनीचा कसं सुधारल्याने शेतकरी बांधवांना अप्रत्यक्ष मदत झाली आहे, विषाणूंपासून गायींचं संरक्षण होत आहे आणि पर्यायाने सोन्याच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. मोदीद्वेष्टे मात्र जीडीपीमध्ये घट झाल्याची खोटी बोंब ठोकत आहेत.

नोटाबंदीमागे याव्यतिरीक्त सहज लक्षात न येण्याजोगे, गोपनीय मात्र जनतेच्या हिताचे अगणित चांगले उद्देश दडलेले आहेत. येत्या काळात याची परीणिती आपणा सर्वांनाच येईल आणि आज या निर्णयावर कितीही टीका झाली तरीही ईतिहासात या निर्णयाची नोंद एक लोकहितवादी निर्णय म्हणूनंच होईल याची आम्हाला खात्री आहे, तोवर टिकाकारांनी काळा पैसा, दहशतवादाला आळा, केशलेस वेग्रे म्हणून मनगटाला चूना लावून खुशाल बोंबलत रहावं.

जय हिंद! भारत माता की जय!

केपी आर.

Friday, July 7, 2017

धोनी


धोनी... प्रिय वगैरे म्हणायचा नाटकीपणा करणार नाही रे. कारण तू मला प्रिय वगैरे नव्हतासंच कधी.
तू वन डे आणि टी-२० च्या कर्णधार पदावरुन पायऊतार झालास, बातमी ऐकली. आजवरची तुझी
वाटचाल बघता हि अशी अचानक आलेली बातमी ऐकून फारसं आश्चर्य वाटलं नाही. हे असंच
काहीसं होणार याचा अंदाज होता, म्हणजे अचानक जाहीर करणं तुझ्यासाठी नवीन नाही
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे "तू आता कर्णधारपद सोड" असं सांगायची वेळ
तू येऊ द्यायचा नाहीस असंही वाटत होतंच. तू कितीही आवडत नसलास तरी रांचीसारख्या एका छोट्याश्या ठिकाणाहून, एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन केवळ तुझ्या दुर्दम्य ईच्छाशक्ती, मनगटातली ताकद आणि स्वकर्तृत्वावर तू मिळवलेलं यश हे खूप खूपंच उत्तुंग आहे. आणि आजवर तू जे काही साध्य केलं आहेस त्यासाठी मी तुला मनापासून फक्त मानतंच नाही तर तुझा खूप रीस्पेक्ट करतो.
तू मला कधी आवडला नाहीस हे खरंय पण म्हणून तू टाकाऊ होत नाहीस, तसं तर तू कोणालाही आवडला नाहीस तरीही तू टाकाऊ होत नाहीस कारण तू कर्तृत्वानं मोठा झालायेस, कोणाच्या मानण्या न मानण्यानं त्यात तसूभरंही फरक पडू शकत नाही. तुझा अनऑर्थडॉक्स गेम, आडवे तिडवे फटके, टेक्निकल अप्रोचपेक्षा ताकदीवर भर देऊन केलेला खेळ याकडे कोणीही सहजंच दुर्लक्ष केलं असतं खरंतर पण तू टिम इंडियात आल्यापासून सिनियर प्लेयर्ससाठी रुंदावलेलं एग्झिट डोअर, चेन्नई सुपरकिंग्जच्या आणि पर्यायनं तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंना मिळणाऱ्या अवाजवी संधी यामुळे तुझ्याबद्दल एक अढी तयार झाली मनात. कदाचित हे सगळे आमच्या मनाचे खेळंही असतील पण बऱ्याच प्रसंगांमध्ये सिनियर प्लेयर्स आणि तुझ्यातली दरी खूप प्रकर्षानं जाणवली आणि तू यश मिळवत असतानाही आम्ही तुझा तिरस्कार करण्यातंच धन्यता मानली.
गावठी, आंधळी कोशिंबीर फेम, आडवी ब्याट आणि काय काय म्हणून तुझ्यावर टिका केली... खरंतर तुझा राग करण्यासाठी बऱ्याचदा कारणंही शोधली. मला २००४ मधली पाकिस्तानातली तुझी धडाकेबाज खेळी अजूनंही आठवते, दुसऱ्या दिवशी द्वारकानाथ संझगिरींनी लिहिलं होतं काल सचिन आऊट झाला म्हणून ज्यांनी टिव्ही बंद केला ते खरे कर्मदरीद्री. पुण्यातल्या नेहरु स्टेडीयमवर श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधे जेव्हा चांगली सुरुवात करुन सचिन आऊट झाला होता तेव्हा नाराज होऊन मी स्टेडीयममधे थोडावेळ झोपलोही होतो. शेवटी पंचवीस एक बॉलमध्ये आपल्याला जिंकायला अठरा रन हवे होते, तू स्ट्राईकवर होतास. आमच्या पुढच्या रांगेतल्या एकजण म्हणाला अरे तीन सिक्स मार आणि संपवून टाक च्यायला. पुढच्या बॉलवर तू सिक्स मारलीस, त्याच्या पुढच्याही आणि तिसऱ्या बॉलवरही. जणूकाही तुलाच डोक्यावर घेतलंय अशा जोशात आम्ही त्या "तीन सिक्स मार आणि संपव" म्हणणाऱ्या माणसाला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचलो होतो. तेव्हा तू आवडायचास..खूप आवडायचास... तू कॅप्टन झालास आणि सिनियर प्लेयर्सला लागलेली गळती बघून तू आवडेनासा झालास. तू थंड डोक्याने, शांत चित्ताने खेळत राहीलास. सगळ्यांसमोर कितीही तुझ्यावर टिका केली तरी आतून तुझे हे गुण आवडले होते आपल्याला. कोणी कितीही टिका केली तरी तू तुझे संघसहकारी निवडलेस आणि सक्सेसफुल होत राहिलास. नव्यांना संधी दिलीस, भले ते तुझ्या मर्जीतले का असेनात, मैदानावर अक्षरशः जुगारंही खेळलास (पहिल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमधली जोगिंदर शर्माची लास्ट ओव्हर कोण विसरेल?) बऱ्याचदा यशस्वी झाले काहीवेळी चुकलासंही. हारलास तरी तितकाच स्थितप्रज्ञ जिंकलास तरी तितकाच, तुलाच ठाऊक कसं काय जमवलंस. टिम इंडिया असो की आय.पी.एल तू जिंकत राहीलास, मी तुझ्यावर टिका करत राहीलो. आय.पी.एल मध्ये तर तू आणि तुझे टिममेट्‌स धडाकेबाज खेळ्या करत अशक्यप्राय हा शब्दही फार छोटा वाटावा अशा मॅचेस जिंकत राहीलात. मीसुद्धा तुझा राग करतंच राहीलो, पण खरं सांगायचं ना तर तुझ्या खेळापेक्षा ते "सिनियर वर्सेस यू" या गोष्टीमुळे तो राग होता. पारंपारीक खेळ, तांत्रिकता आणि टिकाकार यांना फाट्यावर मारत तू जिंकत राहीलास, हारलास तेव्हाही पुढे चालत राहीलास, गांगुली नंतर संघाला तू जिंकण्याची खरी सवय लावलीस.
सचिन वन डेतल्या पहिल्यावहिल्या डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर ऊभा असताना एका बाजूने तूसुद्धा फटकेबाजी चालू ठेवलीस, एक वेळ तर अशी आली की सचिनला स्ट्राईकंच मिळेना, त्यावेळी मी म्याच बघत नव्हतो पण मित्र फोनवरुन आखो देखा हाल सांगत होते. प्रत्येक बॉलगणिक मी तुला जीव खाऊन शिव्या देत होतो, सचिनची डबल सेंच्युरी तुझ्यामुळे हुकणारंच असं वाटत होतं पण नाही सचिनला स्ट्राईक मिळाली आणि त्यानं रेकॉर्ड केलं. पण मुद्दाम असं करण्याईतका मनाचा कोतेपणा तर निश्चितंच कोणत्याच नॅशनल लेवलला खेळणाऱ्या प्लेयरमध्ये नसणारंच, तू कसा काय त्याला अपवाद असशील. वरची फळी अपयशी झाली तू भयंकर संथ खेळून चाळीसेक रन काढून स्वतःची बाजू सेफ करतोस आणि शेवटी हाणामारी करुन हिरो होयला बघतोस असं वाटत राहिलं नेहमीच पण कोणत्याही परीस्थितीत थंड डोक्यानं खेळणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही... तू जमवलंस, जवळपास नेहमीच. गांगुली, सेहवागची एक्झिट, युवराज टिम बाहेर बसणं आणि जडेजा, रैना, मुरली विजयला अपयश येऊनंही संधी मिळत राहणं यामुळे उत्तरोत्तर तुझा रागंच केला मी. पण फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव्ह म्हणतात ना तसं तुला नशिबानंही साथ दिली आणि तू मैदानावर तुझी धमकंही दाखवलीसंच. यश डोक्यात जाऊ न देणारा आणि अपयशंही तितक्याच शांतपणे पचवणाऱ्या धोनीवर माझ्यासारख्या कोणीही कितीही टिका करो पण वर्ल्ड क्रिकेटमध्ये तू तुझं एक अढळ स्थान निर्माण केलंस.
आजकाल तुझा खेळ पूर्वीसारखा आक्रमक राहीला नाहीये, शिव्या द्यायला आम्हाला चालूनंच आलीये संधी पण... महेंद्रसिंग धोनी आता तुझ्यावर कॅप्टंसीची जवाबदारी नाहीये, तू जसा तुझा काळ गाजवलास तसाच धडाकेबाज खेळत रहा... मला कितीही आवडत नसला तरीही पुढच्या वर्ल्डकपमध्ये धोनी संघात असावाच अशी माझी मनापासून ईच्छा आहे.
धोनी तू मला कधीच आवडला नाहीस... आजंही आवडत नाहीस... पण स्वकर्तृत्वावर तू शिखर गाठलंस, तिथे तळ ठोकलास तर आता जेव्हा कधी रीटायर होशील तेव्हा माझ्यासारख्या टिकाकारांची तोंड बंद करुन जोरदार खेळून बाहेर जावंस अशी मनापासून ईच्छा आहे... कोणाचाच पडता काळ बघायला आवडत नाही मला आणि तूही त्याला अपवाद नाहीस...
#HappyBirthdayMSD
Play Well, Enjoy Your Game!


केपी आर

Friday, June 23, 2017

लावू घोडा


चल काढू उणी दुणी
उडवू चिखल थोडा
विकासाच्या आयचा घो
जनतेलाही लावू घोडा

उभं राहू चौकात
आयला भाषण ठोकू
दुसऱ्याची चव्हाट्यावर आणू
स्वतःची मात्र झाकू

झुकून करु सलाम
हात देखील जोडू
मायला चार दिवस फक्त
मग गादीवर चढू

किंमत ठरवू पक्की
बोली लाऊ बोटाची
शे पाचशे रुपड्यात
खपाटीला गेल्या पोटाची

वाटून घेऊ रंग
हिरवे निळे भगवे
चढवू पांढरे डगले
विचार ठेऊ नागवे

तू घे मशिद
मी घेतो राम
रीकामचोट माथ्यांना
मिळू दे काम

ऐकल्यासारखं करु
थोडं रडल्यासारखं करु
पाठ थोपटतील ते
पाया पडल्यासारखं करु

विष पेरु पाडू फूट
माणसं उभ्यानं कापू
वस्त्या पेटतील रातसारी
आपण सुखानं झोपू

भाषा धर्म जात पात
अस्मितेला चढू दे धार
नरडीचा घेऊ दे घोट
अन आपल्यांवरही करु दे वार

निवडणूकीचा रंगवू फड
मतांचा बाजार मांडू
जिंकलो तर ठिकंच
नायतर म्हणू "नशिबंच गांडू"

निकालाच्या पलिकडे
मांडवली करु
गळ्यात घालू गळे
अन एकमेका साह्य करु

टेंडर बिंडर पैसा बियसा
आडवा हात मारु
ठासून भरु खिसे
च्यायला सगळ्यांचा घात करु

विकासाच्या नावाखाली
रींगणात उतरु यंदा
चुतिया बनवू एकेकाला
तेजीत चालू दे धंदा

बदल घडवायचा एकेकात
असतो रेहमानी किडा
मतदान करुन घंटा फरक पडणारे थोडा?
याला नडा त्याला फोडा
प्रश्न विचारणाऱ्याला जित्ता गाडा
होऊ दे झोकात शक्तिप्रदर्शन
जमंल तेवढा करु की राडा
अरे विकासाच्या आयचा घो
जनतेला तर लावूच घोडा

केपी आर

ह्याशट्याग माजलेत साले

ओ तुम्हीच हो हो तुम्हीच
मगाशी नाही का हाॅटेलात
खाल्लीत पावभाजी...
२० रुपयाच्या प्लेटसाठी
मोजले शे-दिडशे
चौघांचे पाच-सातशे
मग बिलाबरोबर आलेली बडीशेप
बकना भरुन खाल्लीत
तरी थोडी उरलीच मागं
आयला पैसे वसूल करायचे म्हणून
बांधून घेतलीत ती टिश्श्यू पेपरमध्ये

परवा पण नाही का
आयनाॅक्समध्ये लाह्या घेतल्यात
दोनशे रुपयांना
आणि तोटरा बसतो म्हणून
फुलपात्रभर कोक घेतलात कागदाच्या कपात
रोख दिडशे मोजून
स्ट्राॅचा फुर्र फुर्र आवाज होईस्तवर
ओढलंत जीव खाऊन कोल्ड्रींक
निघण्याआधी घासलंत कार्ड बिल भरायला
खिशात कार्डाची थप्पी नीट जपत तुम्हीच म्हणाला होता नोटाबंदीच्या वेळी
जरा सोसा की कळ देशासाठी तिच्यायला

चौकातल्या भाजीवाल्याकडं थांबून
गाडीची काच खाली केलीत बटन दाबून
म्हणलात सुकून गेलीये पार भाजी
पिशवी भरुन घेताना हक्कानं सांगितलंत
सव्वा दोनशे नाही दोनशेच देईन
शंभराच्या दोन नोटा त्याच्या हातात
कोंबून निघत असताना
रस्त्याच्या कडेला फाटक्या पुस्तकात
डोकं घालून बसलेलं त्याचं पोरगं चोरुन बघत होतं
काचा वर करुन एसीत बसलेल्या
तुमच्या पोराच्या हातातल्या खेळण्याकडं
तुम्ही गाडी चालू करता करता म्हणालात बायकोला
भाजीपाला काय महाग झालाय
बायको म्हणाली तरी तुरीसाठी
बोंब मारतायेत साले

सकाळी साडे आठ वाजता आॅफिसमध्ये पोचताच म्हणालात
ए अरे तो एसी बावीसवर कर, कोण चुत्या वाढवतं रे टेमपरेचर
संध्याकाळी कार काढताना
पंधरा सेकंद काचा खाली घेयचा सोपस्कार पार पाडत वाढवलात एसीचा ब्लोअर
पुटपुटलात स्वतःशीच काय उन्हाळाय च्यायला
रेडीओवर आरजे प्रसिद्ध क्रिमिनल लाॅ़यरला (?) विचारत होती
शेतक-यांनी संप का केलाय?
लाॅयर म्हणाला त्यांना क़र्ज़माफ़ी पाहिजे म्हणून
तुम्ही कुत्सितपणे हसून स्टेशन बदललंत
पलिकडच्या स्टेशनावर बादशाह म्हणत होता
जानूsss आज रात का सीन बना ले
तुम्ही स्टेअरींगवर ठेका धरलात

तुम्ही... झालंच तर अप्रेझलच्या मिटींगमध्ये
बसलात आडून अॅडीशनल २.५% पगारवाढीसाठी
म्हणालात, सर परवडत नाही
वर्षभर खपून काम केल्यावर फक्त ८% पगारवाढ
राजीनामा देईन म्हणालात निक्षून
वाढीव अडीच टक्के पदरात पाडून घेऊन
मग घरी आलात जेत्याच्या आविर्भावात
टिव्हीवर लावल्यात बातम्या पोट भरुन जेवण झाल्यावर
चोवीस तास बातम्यांचं दळण पाडणारं एक च्यानंल सांगत होतं
शेतक-यांच्या संपाचा आज पहिला दिवस...
बळीराजानं आक्रमक होत दूध भाजीपाला ओतला रस्त्यावर
तुम्ही डायनिंग टेबलवरची मगासची भाजीची पिशवी फ्रिजमध्ये ठेवलीत
बायकोला म्हणालात बरं झालं मगाशीच घेतली आठवडाभराची
हाॅटेलात थेटरात आॅफिसात अन झालंच तर कोप-यावरच्या फाटक्या भाजीवाल्याकडं तुमचे पैसे वसूल झाल्याचं समाधान चेह-यावर मिरवत
परत येऊन सोफ्यावर बसत
फ़ेसबुक चालू केलंत
स्टेटसमध्ये लिहिलंत
"हा खरंच संप आहे का? अन्नाची नासाडी करणारा माजोर्डा अन्नदाता असूच शकत नाही... ह्याशट्याग माजलेत साले...



केपी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...