तो आज मोबाईल फोनमधला अलार्म वाजण्याआधीच उठला. तसं तर अंथरुणातून उठला म्हणून ऊठला म्हणायचं नाहीतर तो झोपलाच कुठे होता रात्रभर. आज त्याच्या हालचालीत रोजसारखा उत्साह नव्हता अन सहजताही नव्हती. रोजच्यापेक्षा पाच दहा मिनिट लवकर उठूनंही आवरायला जरा वेळंच लागला. आज टेबलावर नाश्ता आणि टिफिन दोन्हीही नव्हतं आणि असतं तरी त्याच्या या स्लगिश हालचालीमुळे त्याल नाश्ता करायला वेळ राहीलाच नव्हता. मनाविरुद्ध धावतपळतंच त्यानं बस पकडली. एरव्ही तो बसमधे सगळ्यात मागचं सीट गाठून कानात हेडफोन सारायचा. गुलजार, लता, आशा, किशोर, केके बसचा दिड तासाचा प्रवास सुखाचा करायचे त्याचा. आज मात्र त्यानं बॅगेतून हेडफोन बाहेरंही नाही काढले. कुणास ठाऊक कोणता विचार करत होता, खरंतर त्यालाही माहित नव्हतं कोणता विचार करतोय ते. रोज तोंडदेखलं का असेना बसमधल्या एकेकाला गूड मॉर्निंग ग्रीट करायचा आज कोणाकडे ढुंकूनही नाही पाहिलं त्यानं.
तो घरातून बाहेर पडला तेव्हा सगळे झोपले होते, सहाजिकंच आहे म्हणा एवढ्या सकाळी त्याला सुद्धा पर्याय असता तर त्यानंही झोपणंच पसंत केलं असतं, पण..नाईलाज. बसमधे बसल्या बसल्या आज त्याला झोपही येईना, रात्रभर जागरण झाल्यावरही बसमधे टक्क जागं राहण्याची त्याची हि पहिलीच वेळ असावी कदाचित. खूप उदास वाटत होतं त्याला, वाटत होतं कोणालातरी फोन करावा मनसोक्त बोलावं पण एकतर सकाळचे फक्त ७ वाजले होते, त्याला कोणाची झोपमोड तर करायची नव्हतीच पण फोन केला तरी मनसोक्त काय बोलणार हा प्रश्नही होताच. त्याचा आवाज अन बोलण्यातला अडखळलेपणा बघून समोरच्यानं चार प्रश्न विचारले असते तर त्याचं उत्तर त्याच्याकडे निश्चितंच नव्हतं. मग तो डोळे झाकून बसून राहिला, बस तिच्या वेगानं चालत राहीली. एकेकजण आपापल्या स्टॉपवर बसमधे चढले तशी बसमधली बडबड वाढू लागली. कोणी त्याला हाक मारुन ऊठवायचा प्रयत्न केला पण त्यानं डोळे मिटून झोपेचं सोंग घेणंच प्रिफर केलं. बसमधला आवाज हळूहळू कमी झाला, आणि तो त्याच्या विचारांशी एकरुप झाला. हंम्म.. विचार.. कोणते, कोणाचे.. काही माहीत नाही.
तो पहिल्यापासून असाच होता; विचित्र. त्याला कोणी टिफिन दिला नाही, नाश्ता दिला नाही किंवा तो जाताना कोणी साधं उठलंही नाही याचं त्याला किंचितही वाईट वाटत नव्हतं. गेले चार दिवस त्याच्याशी चकार शब्दही स्वतःहून कोणीच बोलत नव्हतं घरात याचा त्याला त्रास होत होता. आपल्या माणसांनी आपल्याला समजून घ्यावं, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची वेळ येऊ नये हि त्याची साधी पण फार वाईट्ट अपेक्षा असायची नेहमी. तसंच कोणाला काही खटकलं असेल तर त्यानं स्पष्ट सांगावं हे लॉजिक. त्याला खरंच कळत नव्हतं नेमकं काय झालंय पण काहीतरी झालं होतं एवढं नक्की. विचार केला तर आठवेना सुद्धा.. दोन दिवसापूर्वी त्यानं क्रिकेटवरुन बाबांशी वाद घातला होता, शेजारच्यांच्या मुलांना काम सांगत जाऊ नकोस म्हणून आईलाही ओरडला होता. बायकोला सारखेच रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नकोस म्हणून झापलं होतं. याच्याव्यतिरीक्त जेवताना टिव्ही सिरीयल किंवा अजून कशावरुन घरातल्यांची चेष्टा मस्करी केली होती. पण असल्या फुटकळ गोष्टींमुळे कोणी अफेक्ट होईल असं त्याला बिलकुल वाटत नव्हतं. नेमकं काय झालंय याचा विचार करेपर्यंत बस ऑफिसपाशी येऊन थांबली, त्याच्या बॉसनं त्याला हलवून जागं केलं.. हो बसमधल्या लोकांसाठी तरी तो गाढ झोपला होता.
ऑफिसला आल्यापासून त्यानं एकही काम हातावेगळं केलं नाही, त्याचा मूडंच नव्हता आज काम करायचा. ९ वाजल्यापासून लंच टाईमपर्यंतचा वेळ कसा गेला त्याचं त्याला कळेना. आज लंच टाईमला सुद्धा तिचा मेसेज नाही आला.न रहावून त्यानंच मेसेज केला.
तो: जेवलीस का? मी जेवलो जस्ट, आमच्या कँटीनचं जेवणंही चांगलं असतं गं आणि ताकंही होतंच. मस्त जेवण झालंय.
ती: ...
तो: आज खूप बिझी आहेस वाटतं? मला तर काम करायची ईच्छाच नाहीए.
ती: ...
तो: किती वाजता निघणारेस? लवकर जायचं का आज?
ती: काम आहे, नेहमीच्या वेळेत निघेन.
तो: आज जाम उकडतंय, मस्तानी खाऊ जाताना. व्हॉट से?
ती: ...
तो: ओय.. मस्तानी नको तर पाणी पुरी तरी?
ती: ...
खुर्चीत बसल्या बसल्या त्यानं बराचवेळ मोबाईलशी चाळा केला अन मोबाईल खिशात ठेऊन दिला. अजून मेसेज करण्यात काही अर्थ नव्हता. त्यानंतर लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकटक बघत बसला, काम तर होतंच नव्हत. बराचवेळ झाला असावं असं वाटून हातातल्या घड्याळाकडे पाहिलं तर आर्धा तास झाला होता फक्त. जागेवरुन उठत त्यानं खिशातला मोबाईल काढला आणि बाबांचा नंबर डायल केला, एक दोन तीन बंद पडेपर्यंत रिंग होत राहीली पलिकडून रीस्पॉन्स नाही आला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, शांतपणे मोबाईल खिशात ठेऊन तो बेसिनपाशी गेला. तोंड धुवून जागेवर येत त्यानं लॅपटॉप बंद केला, बॅग आवरुन कोणालाही न सांगता बस स्टॉपवर येऊन बसला. त्याच्या घराकडे जाणाऱ्या ५-६ बसेस येऊन गेल्या पण तो बसून राहीला तसाच शून्यात बघत. ना बायकोचा फोन आला ना आई बाबांचा. माझं काय चुकलं हाच विचार करत बसला तो तिथेच संध्याकाळपर्यंत. हा विचार करणं म्हणजे जत्रेतल्या चक्रात बसल्यासारखं होतं, फिरुन फिरुन त्याच जागी येत होता परत तो, पुढे जाता येत नव्हतं. विचार डोक्यातून जाण शक्य नव्हतं, तिथे बसूनंही बराच वेळ झाला होता. ऑफिसचं टायमिंग संपलं होतं पण त्यानं त्या दिवशी ऑफिसच्या बसनं न जाता पी.एम.टी नं जाणं पसंत केलं. कोणताही ओळखीचा माणूस नको होता त्याला आजूबाजूला.
रात्रीचं जेवण आज एकत्र झालंच नाही, टिव्ही सुद्धा बंदच होता आणि सगळ्यांची तोंडही. बेडरुममधे येण्याआधी त्यानं आई बाबांशी बोलायचा प्रयत्न केला. क्रिकेट, मालिका, राजकारण, ऑफीस बरेच विषय काढले पण हो नाही, हंम्म्म शिवाय प्रतिसादंच मिळेना. शेवटी वैतागून त्यानं विचारलं आई बाबांना प्लिज काय झालंय ते सांगा. माझ्याशी असं का वागताय? बाबांनी हात धुतला अन पोर्चमधे जाऊन बसले, आई निर्विकारपणे म्हणाली काही नाही बाबा.. उगाच त्रागा करुन घेऊ नकोस. आमचं काहीच म्हणणं नाही, अन कोणाबद्दलंच नाही.
तो बेडरुममधे गेला पाठोपाठ ती ही आली. अंथरुणावर दोघेही अनोळखी असल्यागत पडून राहिले शेजारी शेजारी. त्याच्या कानात आईचे शब्द घुमत राहिले आमचं काहीच म्हणणं नाही, अन कोणाबद्दलंच नाही. त्यानं बायकोचा हात धरुन तिला विचारलं काय गं काय झालंय तुम्ही असे का वागताय माझ्याशी? तीही काही बोलेना, परत परत विचारल्यावर भरल्या डोळ्यानं म्हणाली, तू ऊपकार करत जाऊ नकोस रे माझ्यावर. तो लाईट बंद करुन अंधारलेल्या छताकडे बघत राहिला तसाच, अगदी काळोख डोळ्यातून वाहून जाईपर्यंत. दोघांनी एकमेकांकडे पाठ फिरवली आपापल्याच हाताची ऊशी केली अन डोळे मिटले, झोप लागणं न लागणं इम्मटेरीअल होतं त्या रात्री.
दुसऱ्या दिवशीही तो अलार्म वाजण्याआधीच उठला, तेव्हा मात्र झटकन आवरलं. मधे एक रात्र येऊन गेली म्हणून, नाही तर आज दिवस उगवलाच नाही नव्यानं.. कालचाच एक्स्टेंड झाला. निघण्याआधी तिघांसाठीही ब्रेकफास्ट करुन टेबलवर ठेवला त्यानं. बसमधे बसल्या बसल्या बाबांना मेसेज केला, "काय झालंय नाही विचारणार, पण चुकलं असेल तर समजून घ्या ना प्लिज. तुम्ही नाही तर कोण समजून घेणार मला? आणि हो आज रात्री जेवायला जायचंय आपल्याला सगळ्यांना"
बाबांचा रीप्लाय आला: येस :) काही काळजी करु नकोस.
स्वतःशी हसत हसत आज त्यानं तिला मेसेज केला.
तो: निघालीस? ब्रेकफास्ट केलास? टेबलवर ठेवला होता..
ती: आय लव्ह यू... :)
काय झालं होतं याचं कोडं सोडवणं गरजेचं नव्हतं आता त्याला..
त्यानं मेसेज टाईप केला, तिला आणि बाबांना पाठवला: :)
कानात हेडफोन सारले, गुलजार धीरगंभीर आवाजात म्हणत होता, "येह खेल आखिर किस लिए, मन नही उबता"
तो हसला मनापासून..
एक्स्टेंशन नव्हतं.. दिवस चालू झाला होता नव्यानं परत.
के.पी. आर

No comments:
Post a Comment