डान्स क्लास बंद केला म्हणून आत्महत्या, सातवीतल्या मुलाची शाळेत गळफास घेऊन आत्महत्या, परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या, प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या... एकापाठोपाठ एक बातम्या येत होत्या, येत आहेत.. आत्महत्यांचं सत्र अजून चालूच आहे. हे सारं बघून, ऐकून मनात एक विचार आला, च्यायला शिक्षणपद्धती, यंत्रणा, मानसिकता, जीवघेणी स्पर्धा, अवाजवी अपेक्षा, ताण या तत्सम गोष्टींवर केस ठोकता येत नाही. तसं झालं असतं तर आजवर अगणित वेळा यांना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली असती.
आठवतंय? आठवतंय.... लहानपणी खूप खेळायचो आपण, दंगा-मस्ती, धमाल करायचो अगदी. ठेचकळायचो, पडायचो अन लागायचंही भरपूर. पण पडायच्या भीतीनं धावणं, खेळणं सोडून दिलं का आपण कधी? नाही ना? बरीच स्वप्नं बघतो आपण, काही पूर्ण होतात तर काही अधुरी राहतात. पण म्हणून स्वप्न बघणं सोडून द्यायचं का, प्रयत्न करणं सोडून द्यायचं का अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे "जगणं" सोडून द्यायचं का? रोज संध्याकाळी दिवालवतो आपण, आपल्या आजूबाजूचा परीसर उजळवून टाकतो तो. पण त्या प्रकाशाची पाठराखण अंधारंच करत असतो. अंधार आहे म्हणून दिव्याला आणि त्याच्या प्रकाशाला महत्व आहे. अगदी तसंच आपल्या जीवनांत आपल्या यशाची पाठराखण अपयश करीत असतं.
आईची माया, बपाचा आधार, भावंडांच्या खोड्या, मित्रांसोबतचे सोनेरी दिवस... या सगळ्या गोष्टींना मागे सोडून आयुष्य संपवण्या ईतकं का अपयश मोठं आहे? नक्कीच नाही... माहित्येय मला, असं वाटतं कधी कधी कीयशाकडे जाणारे सगळे रस्ते संपले. पण आपल्या विचारांपलिकडेही नव्या वाटा आहेत. फक्त त्या शोधण्याची, त्यातलीच एक मनापासून निवडण्याची आणि त्या वाटेवर यशस्वी होईपर्यंत चालण्याची जिद्द मनात असायला हवी. आत्महत्या तर एक पळवाट आहे. शेवटी निर्णय आपल्या हाती आहे, नवी वाट शोधायची की फक्त एकपळवाट आपलीशी करायची? सारं धाडस एकवटून आत्महत्या करायचा निर्णय घेण्यापेक्षा, तेच सारं धाडस, जिद्दएकटून आयुष्य घडवायचा निश्चय करा मग बघा यश कसं जोमानं बहरतं आयुष्यात.
शालेय परीक्षांमधे नापास झालेले/न चमकलेले आपल्यातले कित्येक चेहरे आज आयुष्याच्या परीक्षेत पास होऊनयशाच्या शिखरावर आहेत.
सचिन तेंडूलकर - महविद्यालयाचं कधीही तोंड न पाहिलेला हा मनुष्य क्रिकेट जगतात आज साऱ्या मोजमापासाठी परिमाण ठरतोय.
अब्राहम लिंकन - आयुष्यभर ज्या अपयशानं त्याची पाठ सोडली नाही त्याच अपयशाला चितपट करुन त्या अपयशाच्या छाताडावर लोकशाहीचा यशस्वी झेंडा रोवला त्याने जगासाठी.
गुलजार - उर्दूमध्ये नापास (विश्वास बसतंच नाही ना) गेली चार दशकं यांच्या शायरीनं तमाम रसिकांना वेडलावलंय.
इंदिरा गांधी - "गुंगी गुडिया" म्हणून याच "आयर्न लेडी"ला विरोधकांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला हिणवलं होतं.
या सर्वांनी यश मिळवलं कारण त्यांचा स्वतःवर, त्यांनी निवडलेल्या वाटेवर विश्वास होता, अन सर्वात महत्वाचंम्हणजे त्यांच्यात अपयशातून सावरून जिंकण्याची जिद्द होती. स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्या पायावर लोळण घालेल.
कॉलेजात असताना पहिल्यांदाच बाईक घेऊन दिली होती घरच्यांनी. अन एकदा बेदरकारपणे वेगात बाईक चालावाताना एका वळणावर बोर्ड वाचला, "वाहन जपून चालवा, घरी कोणीतरी वाट पहात आहे"... त्या दिवासानंतर निष्काळजीपणे गाडी चालवायला मन धजावलंच नाही कधी... तुमच्या आई-वडिल, भावंड, मित्रमंडळींच्या वतीनं एकंच प्रेमळ विनंती आहे मित्रांनो "घरी कोणीतरी वाट पहात आहे" हा बोर्ड शाळा कॉलेजात लावायची वेळ येऊदेऊ नका.
कुणाल प्रकाश रुद्राके.
No comments:
Post a Comment