Thursday, April 10, 2014

अतिपरीचयात अवज्ञा



पूर्वी म्हणजे लहानपणी माझी आई, मोठ्या बहिणी मला पत्र कसं लिहितात हे शिकवायच्या. आम्ही आमच्या आजीला पत्र लिहायचो. आमच्या आजीला वाचायला येत नव्हतं. ती तिच्या घरासमोर रहाणाऱ्या एका जणाकडून त्याला जसा वेळ होईल तसं पत्र वाचून घ्यायची, त्याला वेळ मिळेपर्यंत ते पत्र तिच्या कमरेला लावलेल्या चंचीमधे (बटव्यात) जपून ठेवायची अन त्याला वेळ मिळेल तेव्हाच त्याच्याकडून पत्र लिहून घेऊन आम्हाला पाठवायची. आमचं पत्र तिच्याकडे पोहोचायला ३-४ दिवस जायचे, पत्र वाचून घ्यायला अजून एखाद दुसरा दिवस जायचाच आणि मग ऊत्तर लिहून घेण्यासाठी एखादा दिवस आणि मग ते पत्र आमच्याकडे पोहोचेपर्यंत अजून चारेक दिवस जायचे. म्हणजे आम्ही पाठवलेल्या पत्रावर ऊत्तर येण्यासाठी जवळपास पंधरा एक दिवस लागायचे. तेव्हा त्या पत्राची वाट बघायची, शाळेतून घरी आल्यानंतर जेवायला बसल्यावरंच नेमका पोस्टमन येयचा आणि मग जेवण सोडून धावत जाऊन आलेली पत्र चाळायची त्यात आजीचं पत्र आहे का हे बघायचं. अगदी तसंच आमच्या शेजारचे काका गुजरातला असताना व्हायचं. एकतर महाराष्ट्रातून गुजरातला आणि तिकडून ईकडे असं पत्रव्यवहार होयला वेळ लागायचा. पण ती वाट बघण्यात आणि ते पत्र जपून ठेऊन परत परत वाचण्यात खूपंच मजा होती. पत्रातून व्यक्त होणं, छोट्याश्या त्या पोस्टकार्डावर पाठपोट मजकूर लिहिणं, काही राहिलंच तर ता.क. म्हणून एका ओळीत लिहिणं अन पत्राची वाट बघतानाची ती रोजची हुरहुर शब्दात व्यक्त करणं तसं कठीणंच.

मग कालांतरानं आमच्या शेजारच्या नानींकडे फोन आला. काय अप्रूप वाटायचं त्या लँडलाईनंच तेव्हा, आपल्या ओळखीच्या कोणाकडे फोन आहे हे आठवून आठवून छोट्या डायरीमधे लिहून ठेवायचं, त्याशिवाय नंबर तोंडपाठ तर असायचेच माझे. आपल्याकडे फोन का नाही असं मनातून वाटत रहायचं पण घरात असं बोलायची हिम्मत व्हायचीच नाही. माझा शालेय मित्र सुजीत शिळमकरकडे तेव्हा फोन होता, दुपारच्या वेळेस कधीतरी नानींकडे जाऊन लाडीगोडी लाऊन मी सुजीतला फोन करायचो. फोनवर बोलायला विषय नसायचे तेव्हा. फार झालं तर एखादा मिनिट बोलायचो, त्यातही पहिल्यांदा त्याची बहिण फोन उचलायची मग त्याच्याकडे फोन जायचा. खूप महत्वाचं काही काम असलं कि नानींकडे नातेवाईक फोन करायचे, कंपाऊंड वॉलवरुन डोकावून नानी मोठ्यानं आवाज द्यायच्या अन मग आम्ही धावायचो फोन उचलायला. कधी मधे आईनं कोणाला फोन करुन निरोप द्यायला सांगितला कि मी लाजत लाजतंच नानींकडून फोन करायचो, खिशातून अडीच रुपये काढून, फोनच्या टेबलावर ठेवत त्यांना सांगायचो नानी पैसे ठेवलेत. मग नानी ओरडायच्या माझ्या अंगावार, आलास मोठा पैसेवाला, घेऊन जा चल ते पैसे. हो एखादा फोन करायचा म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट होती त्याकाळात आणि एका कॉलचा रेट अडीच रुपये द्यावा लागायचा. ताईला तिच्या मैत्रिणीला जरी फोन करायचा झाला तर तिच्यासोबत मी एस्टीडीमधे जायचो, नंबर डायल करुन समोरच्यानं फोन उचलेपर्यंत आपल्या कानाला लावायचा. तिकडून हॅलो ऐकू आलं कि घाईगडबडीत ताईकडे द्यायचा. बोलताना लक्ष समोरच्या डिस्प्लेवर असायचं, एक मिनिट संपण्यापूर्वी निरोप देऊन फोन ठेवायचाय हे पक्क असायचं मनात. एखाद्यावेळेस एक मिनिट क्रॉस झालाच तर मग दुसरा मिनिट होईपर्यंत काही ना काही विषय काढून बोलत रहायचं. तेव्हा पर मिनिट बिलींग असायचं, पर सेकंदचं फॅड अगदी रिसेंट. काय आकर्षण होतं त्या फोनचं, फक्त नंबर डायल करायला मिळणं हेसुद्धा सुख देऊ शकतं असं आता सांगितलं तर वेड्यात काढतील लोक. फोनचा वापर (काही अपवाद वगळता) तेव्हातरी फक्त महत्वाचे निरोप देण्यासाठीच केला जायचा.

हो नाही हो नाही करत आमच्याकडेही फोन आला.. कॉर्डलेस आला.. मग मोबाईलची एंट्री झाली. हळूहळू पत्र मागे पडू लागलं. नंबर कागदाच्या डायरीमधून, डिजीटल डायरीमधे अन मग मोबाईलमधे सेव्ह होऊ लागले. पूर्वी तोंडपाठ असणारे नंबर आता मोबाईलमधे बघितल्याशिवाय आठवेनासे झाले. पत्रात मनमोकळं लिहिणं संपलं, काही भावना पत्रातंच उतरु शकतात हेच खरं. कॉल रेट्‌स न भूतो न भविष्यती ईतके कमी झाले, तास्‌न तास बोलूनही पत्राचा अवाका फोनला जमू शकलाच नाही कधी. इंटरनेटचं जाळं सगळीकडे पसरलं संपर्क साधणं खूप म्हणजे खूपंच सोपं झालं, अन मुख्य म्हणजे एका क्लिकवर पत्र (मेल) पाठवता येऊ लागले. आता खऱ्या अर्थानं कागदी पत्रांना तिलांजलीच मिळाली.

आतातर काय, फेसबूक आलं आणि त्याच्यावर कडी म्हणून की काय स्मार्ट फोन्‌सचा अन पर्यायानं व्हॉट्‌स अ‍ॅपचा जन्म झाला. इंटरनेट, मेल, फेसबूक यांचा जन्म आणि आजवरची ग्रोथ होयला तसा बऱ्यापैकी कालावधी लागला पण व्हॉट्‌स अ‍ॅप नामक अपत्य काँग्रेसचं गवत कुठेही फोफावतं तसं अनिर्बंध वाढू लागलं. स्मार्टफोननं फेसबूक अन व्हॉट्‌स अ‍ॅप सगळ्यांच्या हातात चोवीस तास दिलं. माकडाच्या हाती कोलीत हि म्हण खरी करुन दाखवायचा चंगच एकेकानं बांधला. खऱ्याखुऱ्या आयुष्यात मग कोणाशी अन किती संपर्क आहे यापेक्षा ऑनलाईनच्या व्हर्च्युअल जगात आपलं अस्तित्व दाखवण्याची धडपड सुरु झाली. पूर्वी वेळ मिळेल, म्हणजे खरोखरंच मोकळा वेळ मिळेल तेव्हा ऑनलाईन येणारी मंडळी आता ऊठसूट स्टेटस अपडेट करु लागली. जगानं आपली दखल घ्यावी या नादात काही बाही बरळू लागली, वादग्रस्त आणि संवेदनशील विषयांवर अभ्यास अथवा काहीही संदर्भ नसताना हिरीरीनं मतं मांडू लागली. व्हॉट्‌स अ‍ॅपवर ग्रुप्स आले, सुरुवातीच्या काळात खूप वर्षानी संपर्कात आल्यामुळे बऱ्याचजणांना मस्त, फ्रेश वाटू लागलं. मग न पटणाऱ्या गोष्टी लोक फॉरवर्ड करु लागले. महिलांवरचे अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार, धार्मिकता वगैरे वगैरे गोष्टींवर विवेकशून्य पद्धतीनं बोलू लागली. किळसवाणे मेसेजेस, बलात्काराचे, दंगलीचे व्हिडिओज संवेदनाशून्य मनानं पाठवू लागली. जग नको तेवढं जवळ आलं, बोटाच्या एका स्पर्शानं कोणाच्याही आयुष्यात डोकावता येऊ लागलं अन मग कळेना आपली नेमकी वाटचाल कुठे चालूए. प्रत्येक माणसाची मतं वेगळी, प्रत्येकजण काही १००% चांगला किंवा वाईट नसतो. जे चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं हि आजवरची शिकवण काही केल्या अंगिकारता येईना. कारण जोवर लिमिटेड संपर्क होता तोवर हे शक्य होतं. एकेकाची थेरं क्षणाक्षणाला समोर येत नव्हती, झाकली मूठ सव्वा लाखाची होती. अन ती मूठ सगळ्यांसमोर ऊघडली गेल्यावर कवडीमोल ठरु लागली, मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले. हेल्दी डिस्कशनचं रुपांतर हमरीतुमरीमधे होऊ लागलं. मीच कसा बरोबर, माझीच भूमिका कशी बेस्ट हे लोक एकेकावर थोपवू लागले. सामाजिक भान न बाळगता सनसनाटी बोलू वागू लागले. समोरच्याचं पटतंय म्हणूनंच नाही तर प्रसिद्ध व्यक्तींचं लांगूलचालन करण्यासाठी, पर्यायानं प्रसिद्धीत राहण्यासाठी आणि असुरक्षिततेची भावना वाढल्यामुळे की काय पण लोक कोणाच्याही चुकिच्या अन फुटकळ गोष्टींनाही दुजोरा देऊ लागले, डोक्यावर घेऊ लागले आणि खऱ्या आयुष्यात एकाकी वाटत असल्यामुळे ऑनलाईन कंपू बनवून राहू लागले, म्युच्युअल अ‍ॅडमायरेशन क्लब्ज वाढिला लागले. म्हणजे चार हात लांब असलेलंच चांगलं होतं असं वाटू लागलं. प्रत्येक माणसाचा हरेक पैलू दिसू लागला, नको ती बाजूही समोर येऊ लागली. सार्वजनिक जीवनात काय बोलावं अन काय नको याचा साधा विधिनिषेध लोक पाळेनासी झाली. प्रत्येकाची सगळीच मतं चांगली असतात किंवा १००% पटू शकतातंच असं नाही पण त्या सगळ्याच मतांचा मिनिटा मिनिटाला भडीमार होऊ लागला, समोरच्यावर बिंबवायचा केविलवाणा प्रयत्न होऊ लागला अन आपोआपंच तिरस्कार, तेढ वाढू लागली. खरंच काय करतोय आपण असा प्रश्न मलाही पडतोय, म्हणूनंच कि काय गेल्या महिना दिड महिना मी व्हॉट्‌स अ‍ॅप वापरलंच नाहीये. नाही.. ते माध्यम वाईट निश्चितंच नाही, त्याचा वापर चुकिच्या पद्धतीनं होतोय अन माझा तोल, संयम ढळू लागलाय म्हणून मी ब्रेक घेतलाय ईतकंच. हा अल्पविराम आहे पूर्णविराम नक्कीच नाही. आत्मपरिक्षण करतोय, काय, किती, कसं वापरायचं आणि कशाच्या किती आहारी जायचं हे ठरवतोय मनात. हे करतानाची चलबिचल, उद्विग्नता, राग यामुळे बाकिचे अफेक्ट होऊ नयेत म्हणून हा अल्पविरामाचा पर्याय.
बऱ्याचजणांनी मला विचारलं अरे ते सब्यॅटीकल स्टेटस का? तर ते अशाच साठी.. माझा मला शोध घेण्यासाठी, अन कोणत्या वाटेवर चाललोय हे जोखण्यासाठी.

पत्र कालबाह्य झालं, त्याच्यासोबत हुरहुर, आपुलकीची भावना, संयम सगळंच कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आता अतिपरीचयात अवज्ञा करुन घ्यायची कि या साधनांचा जाणीवपूर्वक, संवेदनशीलपणे चांगला वापर करायचा हे ज्याचं त्याला ठरवायचं आहे.

के.पी. आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...