
ती निरव शांतता भंग करत फोन वाजला....
"हाय" पलिकडून आवाज तिचा.
कुठे आहेस तू? आवाजातलं आश्चर्य लपवत प्रश्न माझा.
मी???? मी अजूनही ऊभी आहे रे तिथेच वाटेकडॆ डोळे लावून.
ऊत्तरादाखल फक्त एक सुस्कारा सोडू शकलो मी, न रहावून.
सोड, नको तो विषय, तू कसा आहेस बोल.
हं..... मस्त मजेत, खोटंच बोलताना आवाज गेला खोल.
दोन मिनिट दोघेही शांत, स्तब्ध.
भेटशील का रे एकदाच, शांतता चिरत कानावर, अहं.... काळजापर्यंत पोहोचले ते शब्द.
मी खूप खूप दूर गेलोय गं, परतणं आता शक्य नाही.
अरे जाण्याआधी चार क्षण हवे तुझ्या सहवासाचे,नाहीतरी मलाही माहित्येय आता परतण्यात तसं तथ्य नाही.
ती... माझ्या मनावर गोंदून ठेवीन मी, शेवटचे हे क्षण.
मी.... बर भेटूया, नाही तरी यापेक्षा काय देऊ शकतो मी तुला, या आठवणीच तुला माझ्याकडून आंदण.
ती संभ्रमावस्थेत.... आपली ही शेवटची भेट????
मी.... काय समजावं मी, हा एक प्रश्न कि तुझा निर्णयच थेट?
तिच्या नजरेतील असहायता सारं काही सांगून गेली.
पहिल्यांदाच शब्दाच्या भाषेवर नजरेची भाषा मात करुन गेली.
भेट तर आम्ही काळाशी लढून घडवून आणली...
मात्र नियतीने विरहाची बीजे पेरली...
आगतिकता डोळ्यांत, शब्द मनाच्या कोपऱ्यात...
विचारांची आणीबाणी...अन कर्तव्य हृदयात...
मग कर्तव्याची अबोल शाल पांघरुन,ती निघाली...
न रॊखता तिला, मीही माझी परतीची वाट धरली....
....कुणाल.
1 comment:
no words to explain............
ur the simply the great........
thanks for these poems........
Post a Comment