एकटं एकटं वाटत राहतं
सारं काही अटळ तरीही..
निश्चल भासत राहतं
तो निघतो मग... मागे पाऊलखुणा न ठेवता
एव्हाना सावलीचीही सुटलेली असते साथ
विचारांची जळमटं, जडावलेल्या भावना अन
ओथंबलेल्या पापण्यानी पडत राहतात दबकी पाऊलं
तो चालत असतो पुढे अन
आठवणी बरोबर उलट्या दिशेने
दोघांच्या दिशा विरुद्ध तरीही
रुजतात अन रुततात त्या अंगोपांगी
अजून संथ होते त्याची चाल... आपसूकंच
एकेका आठवणीचं गाठोडं बांधतो मग तो डोळ्यात
अन येऊन बसतो सवयीनं... समुद्रकिनारी
फ्फ्फस्स.. फस्स.. फेसालळेल्या समुद्राची फस फस
चालू असते ताला-सुरात
तो आता विचार करत नाही
ओल्या रेतीचा, कडक ईस्त्रीचा
अन त्याच्याकडे सरसावणाऱ्या लाटांचा
किनाऱ्यावर आपटून, फुटून, त्याला भिजवून..
घुटमळतात त्या त्याच्या अवतीभवती
परत जाण्याआधी... अन
परत परत हाच खेळ चालू राहतो... तास न तास..
अगदी आठवणींसारखा..
त्याही घुटमळतात काळजात, डोळ्यात अन
जाताना गालावर
रीत्या करतो तो सगळ्या गोड आठवणी... खाऱ्या पाण्यात
आता सुरु होतो प्रवास परतीचा... त्याचा आणि लाटांचाही
अगदी विरुद्ध दिशेने...
मागे पाऊलखुणा ठेवत निघतो तो...
किनाऱ्यावर लोक म्हणत राहतात ओहोटी आली
तो हसून म्हणतो... "आठवणींना"
समुद्राचं लयबद्ध संगीत चालूच असतं
फ्फ्फ्फस्स्स... फस्स्स..
कुणाल प्रकाश रुद्राके










